बुधवार, ३ जून, २०२०

तीन मुद्द्यांची चर्चा!

१. अल्पसंख्याक: 
          सातत्याने अल्पसंख्याक लोकांच्या बाजूने बोलले जाते. परंतू अल्पसंख्याक या शब्दांची आणि समूहाची व्यामिश्रता लक्षात घेतली की त्यातील प्रश्न आणि समस्या आपणास समजू लागतात. मुळात अल्पसंख्याक बहुसंख्याक हे बायनरी इंग्रजांनी आपल्या देशात रुजवली आहे त्यामुळे अनेक वैचारिक आणि सामाजिक प्रश्न सुध्दा निर्माण झालेत. लोकशाहीने निवडणूकांमध्ये या बायनरीला यशस्वीरित्या रुजवले त्यामुळे जमातवादी राजकारणाला चालना मिळाली.
        अल्पसंख्याक म्हटले की नेहमी आपल्यासमोर मुस्लिम लोकांचा विचार येतो. यामागे वसाहतवादाने पेरलेल्या तत्वांचा आणि हिंदु मुस्लिम जमातवाद्यांचा आणि कॉंग्रेसचा मोठा वाटा आहे. आंबेडकर अल्पसंख्याक या शब्दाला धर्माच्या नव्हे तर जातीच्या स्वरूपात पाहत होते. म्हणून अल्पसंख्याक जातींच्या भवितव्याचा ते सातत्याने विचार करायचे. आज आपणास वांशिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याक यांचाही गांभिर्याने विचार करावा लागेल. 
          बहुसंख्याकांच्या देशात अल्पसंख्याकांना विशेष प्रावधान असायला पाहिजे. पंरतू वेगवेगळ्या स्तरातील अल्पसंख्याकांनी आपसात कसे संबंध ठेवायला हवे किंवा त्यांच्यातील संबंध कसे असावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धार्मिक , जातीय, वांशीक आणि लैंगिक अल्पसंख्याक समूहांनी आपल्या अधिकारांची चर्चा करत असतांना इतर अल्पसंख्याक समूहांशी किंवा आपसात आपली अल्पसंख्याक सॉलीडॅरीटी विकसित करायला हवी तेंव्हा कुठे अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे हनन आणि दमन थांबेल.
२. जात: 
          जातीमुळे आरक्षण की आरक्षणामुळे जात , जातीमुळे लोकशाही फसली कि लोकशाहीमुळे जात टिकली अश्याप्रकारचे अनेक प्रत्येक सातत्याने विचारले जातात. अनेक विचारवंतानी जातीय शोषण विरोधी लढाई लढली आहे. काहीनी जाती व्यवस्था चांगली पण जातीय शोषण वाईट असे म्हटले, काहीनी जातीव्यवस्थाच वाईट आहे असे म्हटले आहे तर काहींनी जातीव्यवस्था ही उत्कृष्ट समाजरचना होती असेही म्हटले आहे. 
          जन्मांपासून मरणापर्यंत आणि म्हसनापर्यंत जात काही पिच्छा सोडत नाही. लग्नात जात, जेवनात जात, पेहरावात आणि बोलण्यात सुद्धा जात असते. म्हणजे भारतात असतांना तुम्ही जातीविना जगू शकत नाही.तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला लोक जातीशिवाय जगू देत नाहीत. यामुळेच आंबेडकरांनी जात ही एक एकक नसून एक समग्र व्यवस्था आहे असे तिचे वर्णन केले आहे.
          आजच्या काळात विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात प्रत्येक जात एक वोट बँक बनल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जातींच्या संख्येनुसार सत्तेत वाटा मिळत असल्यामुळे काही जाती या बेदखल होत आहेत. तर काही जाती या वरचड होत आहेत. अश्या काळात जातींचे आपसात संबंध हे तणावग्रस्त होत आहेत. आधीच जातीय विषमता असल्यामुळे समाजात त्याला प्रतिसाद मिळत आहे.
           जातीअंत करायचा की फक्त जातीय शोषण नष्ट करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जात जर एक अस्मिता असेल तर ती कशी नष्ट होईल हाही यक्षप्रश्न आहे. धर्मांतर आणि आंतरजातीय विवाह हे महत्वाचे असले तरी त्यामुळे जातीअंत काही होत नाही हे इतिहासाने आपणास दाखवून दिले आहे. धर्मांतर करतांना कोणत्या धर्मात करायचे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.  बौध्द, इस्लाम, शिख, जैन आणि ख्रिश्चन या धर्मांमध्येसुध्दा जाती दिसून येतात. जसे की सर्वधर्मिय ओबीसी संघटना, मुस्लिम दलित, ख्रिश्चन दलित आणि शिख दलित. काहींचे म्हणणे आहे की ही सर्व हिंदू धर्माची देण आहे तर काहींचे म्हणणे आहे की जातीचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. त्यामुळे इस्लाम आणि ख्रिश्चन धार्मिक ग्रंथात जातीचा उल्लेख जरी नसला तरी भारतात जातवार चर्च आणि मस्जिद आहेत. हिंदुत्ववादी लोकांना हे कळत नाही.
            आजकाल प्रत्येक जात ही जातीवादी आणि ब्राम्हण्यग्रस्त होत आहे. अश्या काळात जातीअंत आणि जातीय शोषण विरोधी विचार कमकुवत होतांना दिसतोय. अनेक लोक आंतरजातीय विवाह करतात पण आंतरधर्मिय विवाहांना विरोधही करतात. 
३. लैंगिकता: 
            बर्याचदा भारतीय लोक लैंगिकदृष्ट्या दांभिक आहेत असे म्हटले जाते त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडतो की, हे खरच आहे का? कामसुत्र, खजूराहो, तंत्रयान, लिंग योनी पुजा असणार्या देशात अशी लैंगिक दांभिकता कशी निर्माण झाली हा प्रश्न पडतो. संस्कृती रक्षकांना खजूराहोच्या मंदिरात घेवून जावे असेही वाटते. काही लोकांना इस्लाम इथे आल्यावर लैंगिक दांभिकता वाढली असे वाटते मग मनुस्मृतींमध्ये वर्णसंकराविषयी काय लिहिले आहे हाही प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. इंग्रजांनी विक्टोरीयन नैतिकतेच्या माध्यमातून अनेक कौटुंबिक आणि स्त्री विषयक सुधारणा केल्या त्यामध्ये संभोग कधी करायचा आणि कोणाशी करायचा याचेही कोडीफीकेशन झाले. काही लैंगिक संबंधाना अनैसर्गिक ठरवले गेले. समलैंगिक संबधांना कायद्याच्या माध्यमातून बेकायदेशीर ठरविले गेले. वस्तूत: खजूराहोच्या चित्रांमध्ये समलैंगिक पुरुषांचे चित्रण आहे त्यावरून त्या काळात असे संबंध समाजमान्य असावेत किंवा चालू असावेत असा तर्क आपण लावू शकतो.
           स्त्री पुरुष संबंधांचा नेहमी लैंगिक अर्थाने विचार केला जात असल्यामुळे अनेक प्रत्येक निर्माण झाले आहेत. गे, लेस्बीयन, बायोसेक्सूल लोकांविषयी संशयी आणि गुन्हेगारी दृष्टीने पाहिले जाते. आणि स्त्री पुरुष लैगिंक संबंधाचे नैसर्गिकीकरण केले गेले आहे. पितृसत्ताक जातीय समाजात स्त्री ची लैंगिकता ही नेहमी रणक्षेत्र बनते. म्हणून मुलींनी कोणासोबत लग्न करावे, कोणते कपडे घालावेत, किती मुले जन्माला घालावीत या विषयी लैंगिकतेचे ठेकेदार आदेश सोडत असतात. 
           काचेच भांड, पेटी पॅक, शील पॅक असे शब्दप्रयोग स्त्री च्या कौमार्यासंदर्भात वापरली जातात. आणि मुलांनी जास्त मुली फिरवणे ही त्याची पुरुषत्वाची निशाणी मानली जाते.  स्त्री ला बदनाम करण्यासाठी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की आपोआप ती स्त्री संपते अशीही धारणा समाजाची आहे. सिनेमा, खेळ आणि राजकारणातील स्त्रीयांवर नेहमी त्यांच्या लैंगिकतेवरून घाणेरडे जोक्स केले जातात. विवाहीत स्त्री आणि साध्वी स्त्रीच्या तुलनेत अविवाहीत स्त्री ही प्रथम लक्ष असते. प्रशासनातील स्त्रिया विषयी सुध्दा असाच विचार होतो. परिवर्तनवादी चळवळीमध्ये सुद्धा लैंगिकतेसंदर्भात खुपच गोंधळ आहे. फुले आंबेडकरी चळवळीपासून ते मार्क्सवादी माओवादी चळवळी पर्यंत याचे अनेक घोळ आहेत. हिंदुत्ववादी संस्था संघटनामध्ये तर झाकली मुठ सव्वा लाखाची आहे.  शिक्षण क्षेत्रात तर लैंगिक शोषणाचे मोठे प्रमाण वाढले आहे.
          सध्या कुमारी मातांचे प्रमाण वाढले आहे. प्रोनोग्राफी ही आता खेड्यातील गळ्ळी बोळात तुम्हाला सापडू शकते.  

२०१६ सालची नोंद. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Maharshi Vittal Ramji Shinde- Individual, Institutional, and Intellectual Life

              In his book, Philosophical Trends in Modern Maharashtra, Matthew Lederle used the word, ‘Maratha Intellectual’ for Maharshi S...