१५ मार्च २०२६ रोजी आमचे वडील प्रकाश अहिरे यांचे आजारपणामुळे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. त्यादरम्यान, मला एका व्यक्तीने लेखासाठी फोन केला. वडिलांच्या निधनामुळे मी गावी आहे आणि लेख लिहू शकत नाही असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी वडिलांविषयी आणि त्यांच्या आजारपणाविषयी चौकशी केली आणि शेवटी फोन ठेवतांना म्हटले कि, खूपच कमी वयात वडील गेले. अजून, दोघातिघांनी बोलतांना ६१ हे जाण्याचे वय नाही असे म्हटले. हे सगळं ऐकून वाईट वाटत होते. वडील अधिक जगायला हवे असेही वाटत होते. सगळ्या मुलांना म्हणजे माझ्यासह भावडांना मुलेही झाली आहेत. त्यांना मोठे होतांना त्यांनी पाहायला हवे होते असेही वाटत राहते. मात्र, ते आता नाहीत हीच वस्तुस्थिती आहे. ते जिवंत होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या त्रासामुळे आणि आईला केलेल्या मारझोडीमुळे हा माणूस मरून गेला तर बरे होईल असेही वाटत होते. मात्र आता खरंच मरून गेल्यावर मात्र त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा येत आहेत. काल परवाच धनश्री म्हणाली कि, “आजारपणात जास्त दिवस राहून, इतरांना त्रास देवून जाण्यापेक्षा कोणालाही जास्त त्रास न देता वडील गेले हे बरे झाले. नाहीतर, काही लोक आजारपणात खूपच दिवस पडतात आणि त्याचा सगळ्यांना त्रास होता.” हे सगळे बरोबर असले तरी ते लवकर गेले हे एका दृष्टीने दुख्खदायक आहे. एका दृष्टीने म्हटलो कारण, मागील आठ वर्षांपासून त्यांना मानसिक आजारांनी ग्रासले होते आणि त्यांचा सगळ्यांना त्रास होत होता. आईला सगळ्यात जास्त मात्र माझ्या भावांनाही त्याचा काहीसा त्रास होतच होता. त्यामुळे वडिलांचे निधन झाल्यामुळे दुख्ख झाले. त्यांच्या आठवणी येतात हे सगळे खरे आहेत. मात्र त्यासोबतच, त्यांच्या निधनामुळे वडीलही मानसिक आजाराच्या जाचातून मुक्त झाले. आमची आईही वडिलांच्या जाचातून आणि वडिलांच्या चिंतेतून काहीसे मुक्त झाले असेही वाटते.
वडिलांविषयीच्या चांगल्या-वाईट अशा अनेक आठवणी आहेत. त्यामुळे वडिलांकडे कसे पहावे?
त्यांना कसे समजून घ्यावे? आईला त्रास द्यायचे म्हणून ते वाईट होते का? या
प्रश्नांच्या सोबतच त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि इतर लोकांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या
आठवणी या सगळ्यांना एकत्र विणूनच त्यांचे समग्र चित्रण करता येते. प्रत्येक व्यक्ती
आणि त्याचे विचार समाजात घडलेले असतात. त्याचप्रमाणे आमच्या वडिलांचीजी सामाजिक आणि
वैचारिक जडणघडण झाली होती. म्हणूनच, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती कशी
होती हे समजून घेतल्याशिवाय त्यांचे मनोविश्व समजून घेता येत नाही. सामाजिक-आर्थिक
परिस्थितीचा परिणाम व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तन यांच्यावर मोठा परिणाम होतो
असे सामाजिक मानसशास्त्रात सिध्द झालेले आहे. आमच्या वडिलांचा जन्म एका भूमिहीन गरीब
आणि महार जातीच्या कुटुंबात झाला. महार जातीचे म्हणण्याचे कारण कि, जरी वडिलांना आपण
जयभीम वाले आहोत याची जाणीव असली तरी बौध्द असणं हे महार असण्यापेक्षा सामाजिक,
धार्मिक आणि वैचारिक पातळीवर पूर्णत: वेगळे आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती.
त्यामुळे माझे वडील महार होते. मी मात्र ‘इहवादी बौध्द’, (secular buddhist) आहे अशी
माझी ठाम भूमिका आहे. वडिलांच्या कुटुंबाच्या
धार्मिकविश्वाचा मागोवा घेतला तर धार्मिक संमिश्र परंपरा दिसतात. मी लहानपणी वडिलांच्या
जुन्या घरात भिंतीत एक छोटेसे देवघर होते. त्यामध्ये दाढीमिश्या असलेला महादेवाचा एक
फोटो होता. नवनाथांचा एक फोटो होता आणि काही लोखंडी देव होती. ती कोण होती मला माहिती
नाही. तसेच, वडिलांच्या कुटुंबाचे कुळदैवत हा पीर बाबा होता. आमच्या घरात पीरबाबाच्या
काही गोष्टी करायची प्रथा होती. ती घरातील मोठ्या मुलाने करायची असते. माझे वडील मोठे
होते पण त्यांनी कधी केले नाही म्हणून माझी आज्जी आणि मला करायला सांगायची. दर गुरुवारी
चार पाच लोकांच्या घरी जाऊन पीठ मागावे लागत असे. ते मागतांना ‘दोम दोम शादा’ असे म्हणावे
लागत असे आणि त्या पीठापासून भाकरी बनवून ती मीच खावी असे कर्मकांड होते. मी लहान असतांना
काही दिवस केले मात्र मोठा झाल्यावर लाज वाटू लागली. त्यामुळे केले नाही. अलीकडे आमच्या
घरातील सगळ्यात मोठा नातू म्हणून रवीच्या मुलाला आई-वडिलांनी तसे करायला लावले होते.
तो तीन वर्षाचा असतांना त्याने काही दिवस केले आता तोही करत नाही.
वडिलांच्या कुटुंबात कोणालाही शिक्षणाची परंपरा नव्हती.
आमचे आजोबा पुना अहिरे यांना चार भाऊ होते. परंतु पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
आपल्या मुलाबाळांना घेवून अनेकजण वेगवेगळ्या दिशेला निघून गेली होती. जळगाव जिल्ह्यातील
चाळीसगाव तालुक्यातील जामडी हे आमचे मूळ गाव. आजोबा आणि त्यांचे भाऊ हे सगळे तरुण झाल्यावर
त्यांनी गाव सोडले. आजोबा जवळच्याच नागद या गावी येऊन स्थाईक झाले. जामडी आणि नागद
यांच्यामध्ये चार पाच किलोमीटरचेच अंतर आहे. अंतर तसे जास्त नाही मात्र दोन्ही गावे
ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधीलच नव्हे तर विभागातीलही आहेत. जामडी हे उत्तर महाराष्ट्रातील
शेवटचे गाव आहे आणि नागद हे मराठवाड्यातील शेवटचे गाव आहे. त्यामुळे नागद या गावाला
कन्नड हा तालुका आणि संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हा जिल्हा आहे. ही झाली प्रशासकीय
बाब. सांस्कृतिकदृष्ट्या मात्र नागद हे गाव अहिराणी भाषिकच आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक
खानदेशाचा भाग आहे. पुना अहिरे या आमच्या आजोबांना दोन बायकांनापासून एकूण चार मुले
आणि एक मुलगी होती. पहिल्या बायकोपासून त्यांना पोपट हा मुलगा झाला होता. मात्र,
मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी बायकोचे निधन झाल्यामुळे पुना अहिरे यांनी दुसरे
लग्न केले. ज्यांच्याशी लग्न केले ती आमची
आज्जी होती. तिला मैंनामाय आणि गोजरामाय असेही म्हणायचे. त्यामुळे मला कधीही तिचे खरे
नाव कोणते हे कळले नाही. कदाचित माझ्या आईवडिलांना माहिती असेल. त्यांनाही मी कधी विचारले
नाही. जुन्या काळी पहिली बायकोचे निधन झाले आणि दुसरी बायको करून आनली जायची मात्र
दुसऱ्या बायकोला पहिल्याच बायकोच्या नावाने हाक मारली जायची. आमच्या मावशीचेही दुसरे
लग्न झाले आहे. तिचे खरे नाव शोभा आहे मात्र तिला तिच्या दुसऱ्या लग्नाच्या घरी शांती
म्हंटले जाते.
मैनाबाईपासून एक मुलगी आणि तीन मुले झाली. मुलगी सगळ्यात मोठी, त्यांनतर प्रकाश
म्हणजे आमचे वडील, नंतर भगवान आणि सगळ्यात शेवटी ईश्वर. पुना बाबांनी संसाराचा संपूर्ण
गाडा लोकांकडे सालदारी करूनच चालवला. कुटुंबकबिला मोठा असल्यामुळे मुलांनाही कामे करावी
लागली. शाळा शिकण्याचा प्रश्नच नव्हता. शाळेत त्यांना टाकले होते. मात्र घरातील गरिबी
आणि शाळेतील शिक्षकांचा मार यामुळे त्यांनी शाळा सोडली होती. त्यांच्या समवयस्क मंडळींना
विचारले असता कळले कि, त्याकाळी शाळेत गरिबांच्या, दलितांच्या, कष्टकरी लोकांच्या मुलांना
शिक्षकांकडून खूपच मारझोड केली जायची. यामध्ये कधीही शिक्षक मंडळी जातीवाचक शिवीगाळही
करायची. यातून आपणास असे स्पष्टपणे दिसते कि, त्याकाळी काही शिक्षकांमध्ये जातीय
पूर्वग्रह असायचे आणि त्यांना दलितांची, गरिबांची मुले शिकतात हे पाहवले जात नव्हते.
म्हणूनच, एकोणिसाव्या शतकात ब्रिटीश सरकारला महात्मा जोतीराव फुल्यांनी शाळेमध्ये शूद्रातिशूद्र
शिक्षक मंडळींची नेमणूक केली पाहिजे असे म्हटले होते. अजूनही शाळेमध्ये अशा गोष्टी
घडतात. मग, पन्नास वर्षांपूर्वीची कल्पनाच करायला नको. आमच्या वडिलांनी शाळेतील मारझोडीमुळे
शाळा सोडली आणि मग लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. मला आठवते जवळपास दहा-बारा
वर्षांपूर्वी कधीतरी एकदा आम्ही बोलत असतांना वडील म्हणाले होते कि, “तुम्हाला काय
कळणार, तुम्हाला सगळे मिळते. मी ज्यावेळी एका हाताने शेंबूड पुसायचो आणि दुसऱ्या हाताने
खाली सरकणारी चड्डी पकडायचो तेव्हापासून सालदारी करतोय. ज्यांच्याकडे सालदारी करायचो
त्यांच्या गच्चीवर वेगवेगळ्या डाळी वाळवत घातलेल्या असायच्या, त्या खिशात घालत आणत
जा अशी माझी माय सांगायची आणि नाही आणले तर मारायची.” त्यांनी सांगितलेल्या या आठवणीवरून
त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा आपण अंदाज करू शकतो आणि त्यावेळी त्यांचे
वय किती असू शकते याचीही आपण कल्पना करू शकतो. अलीकडेच मी बाप झालो आहे आणि लवकरच माझा
बाप मला सोडून गेला आहे. बाप झाल्यामुळे आपण आपल्या बापाला चांगले समजून घेवू शकतो
असे म्हटले जाते. ते खरेही आहे. माझ्या बाळासाठी जसा माझा जीव कासावीस होतो तसाच कधीकाळी
माझ्यासाठी माझ्याही बापाचा जीव कासावीस झालाच असेल. माझ बळ आजारी पडल तर मी जसा सैरावैर
होतो तसाच माझाही बाप झाला असेल. या कल्पनेनेच मन भरून येते. मात्र, मी रडत नाही.
मृत्यू आपण स्वीकारला पाहिजे हे आपणच लोकांना सांगतो. मात्र, ते पचवणे किती कठीण असते.
हे ‘जीस तन लागे वही तन जाने, बिजा क्या जाने गव्हारा रे’ हा कबीर समजून घेतल्यावर
कळते.
आईवडिलांचे लग्न कधी झाले याविषयी आम्हाला कोणालाही काहीही माहिती नाही. आईशी बोलतांना
एकदा आईने सांगितले होते कि, कुठलातरी रोडनिर्मितीचे काम चालू होते. त्यावेळी आई
आणि तिचे आईवडील आणि भावंडे आणि वडिलांचे आईवडील हे एकत्र काम करत होते. त्यातून पुढे
संबंध जुळले. लग्नाच्यावेळी तुझे आणि वडिलांचे वय किती होते असे विचारले असतात.
तिला निश्चित सांगता आले नाही. गल्लीतील त्या मुलाच्या वयाचे तुझे वडील असतील आणि त्या
मुलीसारखी मी असेल असे म्हणाली. त्यावरूनही वय निश्चित होत नव्हते. म्हणून मी तिला
तिच्या पाळीविषयी विचारले. ती म्हणाली, “लग्न झाल्यांनतर एक दोन वर्षांनी मला शेतात
काम करतांना पाळी आली होती. ज्यावेळी पाळी आली त्यावेळी मी रडायलाच लागली होती.
सोबत काम करणाऱ्या मोठ्या बायकांनी पाहिले आणि मग समजावून सांगितले.” यावरून बारा
–तेरा वर्ष हे आईचे लग्नाच्यावेळी वय असेल आणि वडिलांचे सोळा- सतरा वय असावे असा आमचा
अंदाज आहे. आई एखादा असेही म्हणाली होती कि, लग्न झाल्यावरही तुझे वडील मुलांमध्ये
खेळायला जायचे. या सगळ्यावरून असेच दिसते कि, खेळकर वयातच त्यांचे लग्न झाले असावे.
लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी, आईच्या म्हणण्यानुसार माझ्या जन्माच्या म्हणजे
१९९० च्या आधी त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची दुर्घटना घडली आणि त्याने त्यांच्या
आणि त्यामुळे आमच्या पुढील संपूर्ण कुटुंबाला एक वेगळ्या समस्येतून जावे लागले.
याविषयी आईसोबत मी बोललो आहे. तसेच, काही इतर लोकांनीही मोकळ्या चर्चेत याविषयी सांगितले
होते. एकदा आई-वडील कामावरून घरी आले. जेवणाच्या पूर्वी संडासला जावून येतो म्हणून
वडील निघाले. त्याकाळी बहुतेकांच्या घरी संडास नसायचा. अजूनही ग्रामीण भागात बऱ्याच
लोकांच्या घरी संडास नाहीये. त्यामुळे लोक सार्वजनिक जागेवर संडासला जातात. वडील त्यांच्या
गल्लीतून संडासला जात असतांना खालच्या गल्लीतील एका घराजवळून जात असतांना त्यांना घरातून
दूर येतांना दिसला आणि कोणीतरी जळते आहे असे दिसले. त्यावेळी, त्या घरातील कोणीही घरी
नव्हते. त्यामुळे वडील पळतपळत तेथून जवळच असलेल्या शाळेकडे पळत गेले आणि त्यांनी त्या
घरातील लोकांना घराला आग लागली हे सांगितले. त्या घरात एका स्त्रीने स्वतःला जाळून
घेतले होते. गावातील काही लोकांच्या मते आणि
आमच्या आईच्या मते त्या स्त्रीच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यानेच तिला पेटवली होती
आणि ते पळून गेले होते. खरे काय मला माहिती नाही. वडिलांना विचारावे असा विचार डोक्यात
आला होता मात्र हिम्मत झाली नाही. त्यानंतर पोलिसांनी मृत स्त्रीच्या घरांच्या लोकांना
अटक केली. त्यांनी आम्हाला माहितीच नव्हते, आम्ही घरी नव्हतो असे सांगितले आणि आम्हाला
प्रकाशने पहिल्यांदा सांगितले असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी वडिलांना
पडकले. वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदा पोलीस पाहिले होते. त्यामुळे पोलिसांच्या समोर
त्यांना काहीही बोलता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना खूप मारझोड केली.
त्यांच्या कानावर खूपच मारले. गावातील सरपंच यांनी वडिलांना व्यवस्थित समजावून सांगितले
तेव्हा बोलले आणि मग त्यांना पोलिसांनी सोडले. मृत स्त्रीच्या घराच्या लोकांना
शिक्षा झाली. वडिलांचा काहीही दोष नसतांना त्यांना या प्रकरणात खूप मारझोड झाली त्यामुळे
त्यांचे दोन्ही कान कायमचे निकामी झाली. पुढील संपूर्ण आयुष्यात त्यांना स्पष्ट ऐकू
आले नाही आणि या गोष्टीचा त्यांच्या मनावर कायमचा परिणाम पडला. एखाद्या व्यक्तीला ऐकू
येते आणि एखाद्या घटनेमुळे पुढील आयुष्यात तुम्हाला ऐकू येत नाही याचा एक मोठा मानसिक
परिणाम त्यावर व्यक्तीवर होता. हे आम्ही आमच्या वडिलांच्या आयुष्यात पाहिले.
चारचौघांमध्ये बसलेले असतांना कोण काय बोलते हे त्यांना ऐकू येत नसल्यामुळे कळत नव्हते.
तसेच, कोणी काहीही बोलले तर त्याचा वेगळाच अर्थ ते लावत होते. काहीवेळा लोक बोलतही
असतील मात्र तू असा का बोलतोस असे वडिलांनी म्हटल्यावर मी तसे म्हटलोच नाही आणि तुला
ऐकू येत नाही त्यामुळे तू काहीही अर्थाचा अर्थ लावतो असे लोक म्हणायचे, या सगळ्या गोष्टींचा
परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि वर्तनावर झाला. त्यांनतरच्या काळात ते स्वतः आणि आईलाही
कोणाच्या घरी जाऊ देत नसत. तसेच, त्यांच्या घरी कोणी दुसरे आलेलेही त्यांना आवडत नसत.
ऐकू येत नसल्याने कुटुंबात आणि नात्यांमध्ये बऱ्याचवेळा ताणताणाव निर्माण झाला होता.
आई-वडिलांना माझ्या आधी एक मुलगी झाली होती. तिचे नाव राधा होती. तिच्यानंतर माझा
जन्म झाला. मी वर्षभराचा होता आणि ती दोन-अडीच वर्षांची असेल तेव्हा आईवडिलांनी ऊसतोडीला
जाण्याचे ठरवले. राधाला आजीजवळ ठेवले. ती दोन अडीच वर्षांची मुलगी होती. आई-वडील ऊसतोडीला
गेल्यावर पुढील तीनचार महिन्यात राधा आजारी पडली आणि मरून गेली. तिकडे ऊसतोडीवर हे
माहितीच नव्हते. राधाच्या निधानंतर महिन्याभरात टोळी मुकादम हा गावी आला होता.
त्यावेळी त्या कळले. तो काही दिवसांनी ऊसतोडीच्या ठिकाणी परत गेला आणि त्यावेळी आईवडिलांना
राधाच्या मृत्यूची बातमी कळली. आमच्या आईच्या काळजालाही गोष्ट लागलेली आहे.
त्यामुळे बऱ्याचवेळा रागात आणि भावनेच्या भरात
वडिलांना आणि आजीला जबाबदार धरले आहे. राधाच्या अनेक आठवणीही ती अजूनही सांगते.
वडिलांना राधाविषयी बोलतांना मी जास्त पाहिले नाही. मात्र, जेव्हा ते राधाविषयी बोलते
तेव्हा ते भावनिक झालेले दिसले. आपल्याला मुलगी पाहिजे असे म्हणण्यासाठी जीवाला एखादी
मायबहीन पाहिजे असे म्हणायचे. आपली मुलगी दोन महिन्यापूर्वीच मेली ही बातमी आईवडिलांच्या
कानावर दोन महिन्यांनी जाते तेव्हा त्यांना काय वाटत असेल याची आज कल्पनाही करवत नाही.
त्याकाळी संपर्काचे कोणतेही साधन नसल्यामुळे अशा गोष्टी व्हायच्या. माझ्यानंतर राजधरचा
जन्म झाला. राधाच्या आठवणीमुळे दुसरया मुलाचे नाव राजधर ठेवले. राजधर नंतर मुलीच्या
आशेने रवी झाला आणि शेवटी अमोल झाला. आई नेहमी म्हणते शेवटचे दोन्ही हे मुलीच्या आशेने
झाले आहेत. आम्हाला मुलगी पाहिजे होती. रवीच्या जन्माच्या नंतर वडील दारू पितात.
मारहाण करतात म्हणून आजीआजोबा आईला माहेरी घेवून गेलेले. ती पुढील दोन-तीन वर्ष तिकडेच
राहिली. वडील नागदला त्यांच्या आईवडिलांसोबत राहत होते. शेवटी, काही लोकांनी मध्यस्ती
करून आईला पुन्हा नांदायला घेवून आले. काही दिवसानीच आईवडील आजीआजोबांपासून वेगळे राहायला
लागलो. मला थोडे थोडे कळत होते. कारण, तेव्हा पहिलीला गेलो होता. मला त्यावेळच्या जास्त
गोष्टी आठवत नाही. पुना बाबा हेही थोडेच आठवतात. त्यांचा आमच्यात जीव होता. आजी-आजोबांची
भांडणे झाली कि आजोबा आमच्याकडे यायचे. हे आजीला आवडत नव्हते. एकदा आजोबाला घर सोडून
निघून गेले होते. त्यावेळी सगळी मंडळी त्यांना शोधत होते. तेव्हा मी आणि आमच्या एका
चुलत आत्याचा मुलगा त्यांना ते ज्या शेतावर सालगडी म्हणून काम करायचे तिकडे शोधायला
गेलो होतो. तेव्हा ते निवांत झाडाखाली बसून होते. हि एक ठळक आठवण आहे. दुसरी एक अशीच
आठवण त्या काळातील आहे. मी पहिलीत असतांना शाळेत १५ ऑगस्टसाठी सगळ्यांनी गणवेश घातला
पाहिजे असे शिक्षकांनी सांगितले. माझ्याकडे गणवेश नव्हता. मी आईच्या मागेच लागलो.
ती म्हणाली कि, मी नंतर घेवून देईन आता पैसे नाहीत. मी तिच्या मागेच लागलो तेव्हा ती
मला आजीकडे घेवून गेली. आजी आमच्या चुलत कल्पना आत्या यांच्याकडे घेवून गेल्या.
त्यांच्या मुलाचा एखादा जुना शाळेचा ड्रेस असेल तर याला द्या असे म्हणाल्या.
त्यांच्याकडे एक ड्रेस होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी उश्या शिवल्या होत्या
आणि त्यामध्ये तो टाकला होता. मी रडत होता. माझ्याकडे पाहून त्यांनी ती उशी उसवली आणि
त्यात टाकलेला ड्रेस मला दिला. आईने तो धुतला आणि मी १५ ऑगस्टला तो घातला होता हे अजूनही
मला आठवते. जेव्हा जेव्हा १५ ऑगस्ट येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या तळाशी ती आठवण
जागृत होते. त्यामुळे १५ ऑगस्टविषयी उत्साह वाटत नाही. हा दिन महत्वाचा आहे. मात्र,
बालपणाच्या अशा आठवणी जोडल्या आहेत कि, त्या त्रास देतात. वडिलांच्या आठवणी सांगता
सांगता माझ्याच आठवणी त्यात आठवत आहेत. वडील, आठवणी, मी, आमची आर्थिक स्थिती,
त्यातून घडलेली माझी मानसिकता या सगळ्या अशा एकमेकात घुसलेल्या आहेत. त्यांना वेगवेगळे
करता येत नाही आणि केले तर ते समजून घेता येणार नाही असे मला वाटते.
आता थोड वडिलांच्या श्रमिकविश्वाविषयी लिहितो. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी
आम्ही बसलेलो असतांना बरीच मंडळी भेटायला येवून जात होती. बोलत होती. वडिलांच्या आठवणी
सांगत होती. या सगळ्यांमध्ये त्यांचे कष्टकरी असणे, ढोरमेहनत करणे, जड कामे करणे हे
सगळेच लोक सांगत होती. काम करण्यामध्ये ते अग्रेसर होते. अनेक मेहनतीची कामे त्यांनी
केली. विहीर खोदणे, बेने काढणे, लावणे ( केळी संबधित कामे आहेत), ऊसतोडीला जाने,
खोदकाम करायला जाणे, सालगडी म्हणून जमीन मालकाच्या शेतातील आणि घरचे सगळी कामे करणे,
कापूस गाडीत भरायला जाने, वाळू, माती मरणे अशी बरीच कामे त्यांनी केली. या सगळ्यांमध्ये
ते नेहमी पुढे असायचे. काम चुकारपणा ते करत नसत आणि कोणी केला तर तो पचवून घेतही नसत. कष्टाच्या कामाचा मोबदला जर कोणी वेळेत देत नसेल
तर त्याला शिवीगाळ करायला आणि धमकावयाला ही मागेपुढे पाहत नसत. त्यांचे म्हणणे असे
कि, आम्ही कष्ट केले, तर बाजाराच्या दिवशी आमच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. मी खूपच
लहान असतांना वडिलांनी सालगडी म्हणून काम केले होते. त्याविषयी मला आठवत नाही.
मात्र, २००३-४ जवळपास जेव्हा मी सातवी-आठवीत होतो. त्यावेळी वडिलांनी संभाजी पाटीलकडे
सालगडी म्हणून काम केले होते. संभाजी पाटीलचे शेत हे आमच्या शाळेच्या रस्त्यावरच होते.
त्यामुळे मी कधी कधी वडिलांकडे शेतावर जात असे. शेतातील सगळ्याच प्रकारचे कामे वडील
करत असे. अलीकडे लोक सालगडी म्हणून अपवादानेच काम करतात. कारण, ही मोठी शोषणकारी व्यवस्था
आहे. त्यामध्ये कामगाराला मेहनत खूप करावी लागते मात्र त्याबदल्यात मिळणार मोबदला पुरेसा
नसतो. सालगडी व्यक्तीला सकाळीच उठून गुराढोरांचे
शेण काढायला जावे लागते. जमीनदाराच्या घराची आणि गोठ्याची झाडझूड करावी लागते. घरी
येवून आंघोळ आणि नाश्ता करून पुन्हा कामावर अंधार होईपर्यंत थांबावे लागते. आमचे वडील
हे सगळे करत होते. त्यावेळी त्यांना वर्षाला १८००० हजार रुपये आणि दोन पोती ज्वारी
मिळत होती. एवढा मोबदला संपूर्ण वर्षासाठी असायचा. हळूहळू ही पध्दत बंद पडली कारण कामगार
पूर्ण वर्षभर बांधील असायचा. आजारपण, दुखणखुपण काहीही बघितले जात नसे. काहीवेळा सालगड्यांनी
काही चुका किंवा नुकसान केले तर मालक लोक मारतही असायचे असेही मी जुन्या लोकांकडून
ऐकले आहे. आमचे वडील मात्र खूपच मेहनती आणि कष्टकरी असल्यामुळे मालक लोकांची विशेष
मर्जी असायची तसेच त्यांना हेही माहिती होते कि हा माणूस कामचुकारपणा करत नाही.
त्यामुळे मालक मंडळी चांगले वागवायचे मात्र या चांगल्या वागवाण्याला ही मालक आणि कामगार
याची मर्यादा असायची. आमचे वडीलच सालगडी म्हणून काम केले असल्यामुळे सालगडीच्या दृष्टीकोनातून
जमीनदार आणि मालक कसा असतो याची मला कल्पना होती. म्हणूनच, अलीकडच्या एका चर्चेत जमीनदार
कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली सहकारी म्हणाली कि, सालगडी हे कसे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा
भाग असतात. आम्ही मुले आमच्या सालगड्याला ‘मामा’ म्हणायचो. त्यामुळे तिकडे भेदभाव असा
काही नसतो. त्यावेळी मी लगेच तिला म्हणालो कि, हे तेवढे खरे नाही. तुम्ही शेतकरी/जामीनदार
यांची मुलगी आहात म्हणून तुम्हाला तसे वाटते मात्र मी सालगडी असलेल्या व्यक्तीचा मुलगा
आहे. मला आमच्या वडिलांच्या अनुभवावरून माहिती आहे कि, त्यामध्ये कसा भेदभाव असतो.
कुटुंबांसारखे मानत असलो तरी ते कुटुंबांसारखे नसते. त्यात मालक आणि सेवक हा भाग असतोच.
याच्याशी संबंधित २००७ मधील गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही पहिल्यांदा पक्के घर बांधले
होते. त्याच्या आधी आमचे पत्र्यांचे घर होते आणि त्याला घाणेरीचे कुड होते.
त्याच्याही आधी आमची झोपडी होती. १९९७ -२००७ या दहा वर्षात आमचे घर चार- पाच प्रकारचे
होते. झोपडी ते सिमेंट-विटाचे पक्के घर असा आमच्या घराचा प्रवास झाला. २००७ मध्ये इंदिरा
आवास घरकुल योजनेत आम्हाला घरकुल मिळाले होते. मात्र त्यावेळी घरकुल बांधण्यासाठी २७
-२८ हजार रुपयेच मिळत होते. मात्र घर बांधणीसाठी कमीत कमी साठ- सत्तर हजार रुपये खर्च
येत होता. अजूनही घरकुलांसाठी मिळणाऱ्या शासकीय निधीपेक्षा खर्च हा अधिकच असतो.
त्यामुळे लोक स्वत: खिशातील पैसा खर्च करतात किंवा कर्ज काढतात. २००७ मध्येही घरासाठी
कर्ज झाले म्हणून वडील वर्षभरासाठी सालगडी म्हणून राहिले. त्या दरम्यान एकदा मी औरंगाबादवरून
सुट्टीसाठी गावी गेलो होतो. एकेदिवशी जमीनदार घरी आला. मी दारात उभा राहून दात घासत
होतो. त्यावेळी, तो व्यक्ती मला म्हणाला कि, पक्या कुठे शे? ते ऐकून मला राग आला.
शिक्षण घेत असल्यामुळे स्वाभिमान, सन्मान आणि आंबेडकरी आत्मभान येवू लागले होते.
त्या व्यक्तीचे नाव रुपचंद असल्यामुळे मी त्याला म्हणालो रुप्या माझ्या वडिलांचे प्रकाश
आहे. त्यामुळे नीट बोल. त्यावर तो व्यक्ती म्हणाला तुला मोठ्यांशी कसे बोलायचे हे कळत
नाही का? मग मी म्हणालो माझ्या वडिलांचे नाव प्रकाश असून तू पक्या म्हणतो आणि तुला
रुप्या म्हटले तर काय वाईट वाटते. तेवढ्यात वडील बाहेर आले आणि मी घरात निघून गेलो.
ग्रामीण भागात कोणाला कसे बोलायचे?
कोणाला आदर द्यायचा आणि कोणाला एकेरी बोलायचे यातही बरेच सामाजिक, आर्थिक आणि जातीय
राजकारण दडलेले असते. औरंगाबादच्या वैचारिक वातावरणात शिकत असल्यामुळे आणि आंबेडकरी
विचारविश्वाची खऱ्या अर्थाने ओळख झाल्यामुळे आत्मसन्मान हा खूपच महत्वाचा असतो.
याची जाणीव मला होत होती. आम्हाला तुम्ही सन्माने वागवत नसाल तर आम्ही का तुम्हाला
सन्मान द्यावा असे माझे बंडखोर मन त्यावेळी मला सांगत होते. आज मागे वळून पाहतांना
वाटते कि, माझ्या सारख्या विद्यार्थ्याला हि आत्मसन्मानाची जाणीव झाली तर या गावातील
गोरगरीब-कष्टकरी लोकांना का होत नसेल? त्यानांही सन्मानाचे जगणे पाहिजेच होते मात्र
त्यासाठी आर्थिक-सामजिक स्वातंत्र्य पाहिजे. दुसऱ्यांच्या शेतावर जर आपला उदरनिर्वाह
चालत असेल. आपले पोट भरण्यापुरतेही शेत आपल्याकडे नसेल तर सन्मानाची अपेक्षा बाळगता
येत नाही. अपमान गिळत गिळत जगायचे असते. अजूनही आपल्या देशात अनेक ल;लोकांना सन्मानाने
जगता येत नाही. त्यासाठी पर्यायी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवस्थाच नाहीये. हे सगळे
पाहून खूप राग येतो. वाईट वाटते. वडिलांच्या श्रमिक असण्यामुळे श्रमाची कधी लाज वाटली
नाही अजूनही वाटत नाही. सोबतच, हेही जाणवले कि, श्रमिक हे जातीमध्ये विभागलेले असले
तरी श्रमिक म्हणून लोक येतात. गरिबाचे लेकरू, गरीबाचा पोरगा म्हणून गरीब लोक गरिबांशी
नाते जोडतात. आमच्या वडिलांचेही विविध जातीतील मित्र होते. एकत्र काम एकच काम करत असल्यामुळे
या मैत्र्या झाल्या होत्या. काही तर जीवाभावाचे मित्र होते. त्यामध्ये सुतार जातीचे
संपत काका हे एक त्यांचे खास मित्र होते. आमच्या आईचे वडील कधी काही ऐकत नसले तर कधीकधी
आई संपत काकांच्या माध्यमातून त्यांना सांगत असे. संपत काका भेटायला आले कि वडिलांच्या
चेहरा खुललेला मी पहिला आहे.
वडिलांची पुरुषी मानसिकता – माझ्या सहजला सांभाळण्यासाठी आई काही दिवस पुण्याला
माझ्याकडे आली होती. अनेक वर्षांनतर आई आणि मी सलग तीन चार महिने एकत्र राहिलो.
त्या काही महिन्यांमध्ये आई दररोज वडिलांच्या तक्रारी करायची. त्यांनी कसा त्रास दिला,
तुम्ही लहान असतांना कसे वागायचे आणि आता तुम्ही मोठे झाले तर सुधारत नाही असे बरेच
म्हणायची. यामुळे कधी कधी धनश्रीला वाटायचे कि आई फक्त वडिलांना व्हिलन करते. मीही
अनेक वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहिलो असल्याने आणि व्यवसायाने इतिहाकार असल्यामुळे
कोणत्याही गोष्टीकडे तटस्थदृष्टीने पाहण्याची सवय लागल्यामुळे आईच्या म्हणण्यात काही
तथ्य आहे. मात्र आई जसे वडिलांचे चित्र रंगवते तसे पूर्णत: नाही असे मलाही माहिती आहे.
तरीही, वडिलांची मानसिकता ही पुरुषी होती. पितृसत्ताक समाजात पुरुष, स्त्री कसे असले
पाहिजे अशी जी धारणा असते तशीच त्यांची धारणा होती. बायकांच्या विषयी पारंपारिक मते,
बायकोला कमी समजणे, शिवीगाळ करणे आणि वेळप्रसंगी मारहाण करणे हे सगळे त्यांच्या स्वभावाचा
भाग होते. पुरुषांनी असेच करायचे असते. जे पुरुष असे करत नाहीत. बायकांचे ऐकतात,
ते मर्द नाहीत असेच मते त्यांची होती. फार दूरचे नाही. निधनाच्या पाच –सहा महिन्यांच्या
पूर्वीच आईला एकटे पाहून त्यांनी मारझोड करून तिच्या डोक्यात एक दगड घातला होता. पुण्याला असतांना आईला एकदा मी म्हटले होते कि,
तू नेहमी म्हणते कि, मला मारले, मारझोड केली तर मग एखाद्या दिवशी तू त्यांना का मारले
नाही. यावर आईशी प्रतिक्रिया विचार करायला लावणारी होती. नवऱ्याने मारले मारले म्हणणारी
बाई नवऱ्याला का मारले नाही असे म्हणाल्यावर म्हणते, “तो माझा महादेव आहे. मी कशी मारणार
त्याला.” पती हा परमेश्वर असतो. त्याने मारहाण केली तरी सहन करायची ही धार्मिक आणि
पारंपारिक समजूत स्त्रियांशी मानसिकता कशी घडवते हे आमच्या आईच्या उदाहरणावरून स्पष्टपणे
दिसते. इथेच ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीपुरुष तुलना या ग्रंथाचीही आठवण येते.
त्या ग्रंथात ताराबाई शिंदेंनी स्त्रियांची मानसिकता स्त्रीधर्माच्या माध्यमातून कशी
घडवली जाते हे दाखवले आहे.
काहीवेळा आई असेही म्हणाली आहे कि,
तुझ्यामुळे मी तुझ्या वडिलांचा संसार केला नाहीतर आजोबा म्हणत होते कि, काडीमोड घेवू.
पण तुझा जन्म झाला आणि मला यातून बाहेर पडणे अशक्य बनले. आमच्या आईची मैत्रीण बेबामावशी
आणि आई या नेहमी संडासला गेल्या कि, सासूरवासामुळे जीव द्यायच्या गोष्टी करायच्या.
आई म्हणाली होती कि, दोन तीनदा तर मी बेबीसोबत
विहिरवर जीव द्यायला गेले होते. मात्र, तुझी आठवण आली आणि परत आले. अशा अनेक गोष्टी
मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आई- वडिलांचे भांडण झाले कि, आई रागाच्या भरात पूर्वीच्या
गोष्टी सांगत असे किंवा बोलत अस. त्या बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या आहेत. ऊसतोडीला गेल्यावर
एकदा दोनदा तर ऊसाची गाडीच आईच्या अंगावर उसांसह उलटी केली होती असेही आई सांगते.
एकदा तर रात्री आईला मारून टाकायचे ठरले होते आणि आईला तिच्या एका दुसऱ्या मैत्रिणीनी
सांगितले होते. त्यामुळे रात्री कोपीत झोपतांना ती जागीच राहिली होती. मी लहान होतो.
मला ती घेवून झोपली होती. ती सांगते कि, “तुझ्या वडील कोपीच्या बाहेर झोपले होते.
त्यांचा हात किंवा पाय जरी हलला तर मी तुझ्या पाठीला चिमटा काढत होते. त्यामुळे तू
रडत होता आणि आजोबा म्हणजे वडिलांचे वडील उठत होते. तुझ्या पाठीला चिमटे काढून काढून
ती लालसर करून टाकली होती. दुसऱ्या दिवशी इतर बायकांनी तुझी पाठ पाहिल्यावर त्या मला
खूपच बोलल्या. त्यावेळी, मी तुला पोटाशी धरून खूप रडले होते.”
ऊसतोडीला असतांनाच तुझ्या बाप
बंगाली बाईच्या नादी लागला होता. त्यावेळी, मला बंगाल हे राज्य आहे असे काहीही माहिती
नव्हते. बंगाली बाया कशा असतात ? असा प्रश्न माझ्या मनात यायचा. बंगाली बाया या जादुगरी
करतात. पुरुषांना मोहात पाडून घेवून जातात. अशाच गोष्टी मी ऐकल्या होत्या.
त्यामुळे आईने ज्यावेळी बंगाली बाईविषयी सांगितले होते. त्यावेळी दुसरे काहीही कळले
नव्हते मात्र आपले वडील दुसऱ्या बाईच्या नादी लागले होते हे कळले होते. आईकडूनच माझ्या
वडिलांची एक मैत्रीण होती हेही कळले होते. ती आली माहेराला आली का. ती कधीतरी भेटायलाही
यायची. ती वडिलांच्या एका मित्राची बहिणच होती. गावात असे प्रेमप्रकरणे अनेक असतात.
अलीकडच्या काळात तर एका बाईला माझ्या नवऱ्यापासूनच मुले झाली आहेत असा तिचा आरोप होता
आणि त्यामुळे त्या बाईला ती काहीही बोलायची. हे किती खरे आहे, किती खोटे याची मला कल्पना
नाही. मात्र, धनश्रीने हे मला सांगितले. तिला माझ्या भावांच्या बायकांनी सांगितले असे
ती सांगते.
एकदा मी पाचवीला असतांना आमच्या
परिसरात एक बंजारा कुटुंब राहायला आले होते. त्या कुटुंबातील स्त्री सुंदर होती.
तसेच, तिचे काही पुरुषांची संबंध होते अशी तेव्हा लोक चर्चा करायचे. आम्ही लहान
मुले ती सगळी चर्चा ऐकायचो. एके दिवशी ती स्त्री माझ्या आईकडे आली आणि आईला म्हणायला
लागली कि, तुझ्या नवऱ्याने मला इशारा केला. येतेस का असे म्हणत होता असे ती म्हणाली
होती. त्यावर माझ्या आईने तिला खूपच शिवीगाळ केली होती. तू किती लोकांशी चाळे करते
आणि माझ्या नवऱ्याला आळ लावते असे बरेच काही आई म्हणत होती असे सगळे मला आठवते आहे.
वडिलांवर आरोप करणारी आई, वडिलांवर इतरांनी केलेले आरोप नाकारातांनाही मी पाहिली आहे.
आम्ही चारही मुले असल्यामुळे वडिलांना
मुलगी नसल्याची खंतही होती. पण बऱ्याचवेळा ती खंत घरकाम करायला मुलीने मदत केली असती
अशा भावनेतून यायची. कारण, अनेकवेळा लवकर जर कामावर जायचे असेल तर वडील आईला कामात
मदत करू लागायचे. आम्ही लहान असतांना आई आजारी असली तर कच्चा पक्का भात बनवायचे.
सकाळचे पाणी भरायचे अशा अनेक गोष्टीही करायचे.
आम्ही शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांना
वाटायचे. त्यांना शिक्षणाचे काहीही येत नसले तरी आम्ही दररोज शाळेत जातो कि नाही याकडे
त्यांचे लक्ष असायचे. आमच्या शिक्षणाची विचारपूस करायला मात्र ते कधीही शाळेत आले नाही.
मी दुसरी आणि तिसरी असतांना आई वडील ऊसतोडीला गेले होते. त्यावेळी माझे दोन्ही लहान
भाऊ रवी आणि अमोल हे त्यांच्यासोबत गेले होते. राजधर आणि मी घरी होतो. आम्हाला सांभाळायला
आईचे आईवडील होते. त्यावेळी, एकदा आई शाळेत आली होती. आमच्या शिक्षिकेला माझ्याकडे
लक्ष ठेवा. मी ऊसतोडीवरून आली कि काही पैसे लागतील तर देईल असेही म्हणाली होती.
पुढे चौथीला असतांना आजोबांचे निधन झाले आणि आजीला दिसत नव्हते म्हणून आम्हाला सांभाळण्याचा
प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी, माझे चुलते पोपट अहिरे यांनी आम्हाला सांभाळले. ते
एकटेच राहायचे आणि सालगडी म्हणून काम करायचे.
आई वडिलांनी त्यांना विनंती केली कारण आमची आजी, वडिलांची आई नाही म्हणाली होती.
मी आणि राजधरने शिक्षण घ्यावे म्हणून आई वडील लहान भावांना घेवून गेले. रवी आणि अमोल
दोघांनीही आई-वडिलांसोबत लहानपणी बरेच काम केले आहे. विशेषत: रवीच्या शिक्षणावर त्यामुळे
परिणाम झाला. मी शाळेत असतांना परिस्थिती बेताचीच
होती. शनिवारी-रविवारी आई सोबत कामाला जावे लागायचे. वडील कधी कामाला जा असे म्हणायचे
नाही मात्र आई म्हणायची कि तू कामाला आला तर तेवढीच बाजारहाटला मदत होईल.
माझ्यासारखेच माझ्या भावांनीही रोजंदारीवर कामे केली. असे असूनही, मी मात्र शाळेत नेहमीच
पहिला – दुसरा असायचो. अपवाद फक्त आठवीचा आहे. कारण, त्यावर्षी मी बराच काम कावीळमुळे
आजारी होतो. दहावीच्या वर्षी तर कदम बाबाच्या सांगण्यावरून वडिलांनी माझ्या शिक्षणाकडे
अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांना बाकी काहीही यायचे नाही मात्र कदम बाबा म्हणतात
म्हणून तेही महत्वाचे वर्ष आहे. काही लागले कि सांग असे म्हणायचे. त्यावेळी, मी इंग्रजी
विषयाची ट्युशन ही लावली होती. गणिताचे ट्युशन घेणारे शिक्षकही माझ्या वर्गातील मुलींना
म्हणायचे कि त्याला सांगा आपल्या ट्युशनला यायला मात्र मी गेलो नाही. कारण एकाच ट्युशनचे
पैसे देणे कठीण होते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी आमच्या नागद केंद्रात ८२ टक्के
घेवून पहिला आलो होतो. त्यापूर्वी आमच्या शाळेत श्रीमंत लोकांची, पाटील परदेशी मारवाडी
यांचीच मुले पहिले यायची. मात्र माझ्यावेळी मी बोर्डात पहिला आलो होतो. त्यावेळी माझ्या
वडिलांना खूपच आनंद झाला होता. त्यांनी फटाके फोडले होते. संपूर्ण गावात गरिबाचे लेकरू
पहिले आले. त्यामुके चर्चा होती. माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटत होता.
त्यामुळेच त्यांनी माझ्या पुढील शिक्षणासाठी लागेल तेवढा खर्च करण्याची तयारी केली
होती. पुढे माझा औरंगाबादमधील संत तुकाराम या सरकारी वसतीगृहात नंबर लागला आणि देवगिरी
कॉलेज येथे मी प्रवेश घेतला. ती दोन वर्ष माझ्या शैक्षणिक आयुष्यातील सगळ्यात चांगली
होती. कारण, भरपूर खायला मिळायचे, महिन्याला वसतीगृहात दोनशे रुपये मिळायचे.
त्यामुळे खुप जेवायचे, चांगले झोपायचे, वेळेत कॉलेजला जायचे आणि भरपूर वाचायचे आणि
अभ्यास करायचा आणि कधी वाटले तर चित्रपट पाहायला जायचे. यासाठी मला एकही रुपया घरून
घ्यावा लागत नव्हता. त्यामुळे मी खूपच सुखी होतो. मी बारावीला असतांना घराच्या बांधकामामुळे
कर्ज झाले होते. त्यामुळे आई-वडील आणि दोन्ही लहान भाऊ रवी आणि अमोल त्यांच्यासोबत
चाकण, पुणे येथे ऊसतोडीसाठी आले होते. मी औरंगाबादला होतो आणि माझ्यापेक्षा लहान राजधर
हा एकटा गावी होता. त्यावेळी, तो नववीला होता. त्यावेळी, फोन नसल्यामुळे आम्ही जवळपास
सहा सहा महिने एकमेकांशी बोललो नाही. बारावीच्या परीक्षा झाल्यावर मी आई वडिलांकडे
चाकणला आलो होतो. मला ऊसाचे काहीही काम येत नव्हते मात्र माझे दोन्ही लहान भाऊ रवी
आणि अमोल हे खूपच काम करत होते. काही दिवस राहून मी पुन्हा नागदला परत गेलो. आई-वडील
काही महिन्यांनी परत आले. जून २००९ मध्ये बारावीचा माझा निकाल लागला. त्यावेळी, मी
९० टक्के घेवून माझ्या महाविद्यालयात पहिला आलो होतोच मात्र त्यासोबत मराठवाडा विभागातही
बोर्डात आलो होतो. त्यावेळी, वर्तमानपत्रांशी बोलतांना ‘मला कलेक्टर व्हायचे’ असे मी
सांगितले होते. मराठवाड्यातील बहुतेक सगळ्याच वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर बातमी
केल्यामुळे सगळीकडे माझ्या नावाची चर्चा झाली. माझ्या गावात खूपच आनंद झाला.
माझ्या आई वडिलांना, नातेवाईकांना खूपच आनंद झाला. त्यावेळी, एका चुलत शिक्षक मामांनी
डीएड करून घ्यावे असा सल्ला दिला आणि पुढे मुलगीही देऊ असेही म्हटले त्यामुळे माझ्या
वडिलांना वाटत होते कि, मी तेच करावे. माझे ठरलेले होते, त्यामुळे त्यांनी मला प्रेशर
दिला नाही. पुढे बी. ए. करण्याचा निर्णय घेतला मात्र वसतीगृहाला नंबर लागला नाही.
त्याची एक स्वतंत्र गोष्ट आहे. ती इकडे लिहित नाही. त्यामुळे नितीनसोबत रूमकरून राहू
लागलो. पहिलेच वर्ष असल्यामुळे आणि नुकतेच मी चांगल्या मार्कांनी पास झालेलो असल्यामुळे
आईवडील म्हणायचे कि तुला कितीही पैसा लागू दे आम्ही देवू. मात्र, काही महिन्यांनीच
मला हे किती अवघड आहे हे समजले. एके दिवशी मला खूप दु:ख झाले होते कारण आपला वसतिगृहाला
नंबर लागला नाही. पुढील सर्व शिक्षण आता कठीण होणारं, आई वडिलांना त्रास द्यावा लागेल.
ते खूपच मेहनत करतात. आपण त्यांच्याकडून पैसे घेतो. या सगळयांचा विचार करून मी घरी
परत जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉलेजवरून रूमपर्यंत रडत आलो. रूमवर येऊन थोडा विचार
केला आणि झोपून गेलो. उठल्यावर समजले कि, घरी जावून काहीही होणार नाही. गावी भविष्य
नाही. म्हणून, संध्याकाळी पुन्हा ग्रंथालयात गेलो.
त्याचवेळी, राजू बागुल या मित्रासोबत
पुण्याला जाऊन वकिलीचे शिक्षण घ्यावे असे वाटले म्हणून पुण्याला गेलो होतो. आय एल एस
मध्ये जाऊन फॉर्म भरला मात्र फिस जास्त असल्यामुळे आई-वडिलांशी बोलले पाहिजे असे ठरवून
पुन्हा गावी गेलो. आई वडील म्हणाले कि आम्ही कर्ज काढतो मात्र तुला शिकायचे असेल तर
तू ते कर. मात्र मला ते पटले नाही. राजूने अडमिशन घेतले मी मात्र बी ए पूर्ण करण्याचा
निर्णय घेतला. त्यानंतर एम. ए. करायला पुण्याला आलो आणि नंतर पीएचडीही केली. या सर्व
काळात वडील मात्र माझ्यावर काहीसे नाराज झालेले दिसले त्यांना वाटत होते कि, छोटी-मोठी
एखादी नोकरी पकडून घेतली पाहिजे होती. मोठ्या नोकरीच्या मागे कशाला लागायचे.
माझ्या लहान भावांपैकी कोणीतरी लष्करात गेले पाहिजे होते असेही त्यांना वाटायचे कारण
गावातील काही मुले लष्करात होती. ते घरी येतांना वडिलांना लष्कराची दारू आणतात हेही
त्यांनी ऐकले होते. मागील सहा- सात वर्षांमध्ये आमच्या घरची आर्थिक परिस्थिती तुलनेने
सुधारली होती. मात्र त्याचा म्हणावा उपभोग वडिलांना घेता आला नाही. कारण, मागील सहा-सात
वर्षांपासूनच त्यांची मानसिक स्थितीही बिघडली होती.
माझ्या वडिलांच्या मानसिक आजारपणाने
मला मानसिक आरोग्य या विषयाकडे अधिक जागरूकपणे पाहायला शिकवले. पूर्वीही मी त्याविषयी
वाचत होतो. समजून घेत होतो मात्र वाचून समजणे आणि प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात मानसिकदृष्ट्या
आजारी व्यक्ती असणं आणि ती व्यक्ती तुमची जवळची असणं, त्यातून त्याची तीव्रता समजणं
या दोन गोष्टी बऱ्याच वेगवेगळ्या आहेत. २०१७-१८ मध्ये माझ्यापेक्षा लहान भावाचे लग्न
झाले आणि काही दिवसांमध्ये त्यांचे लग्न तुटले आणि त्यामुळे थोडा गल्लीतमाशा झाला.
त्याचा परिणाम वडिलांच्या मानसिकतेवर झाला असावा असे आम्हा भावांचे निरीक्षण आहे.
ग्रामीण भागात असं काही झाले कि, आपली इज्जत गेली, लोक आपल्यावर हसत होते अशी लोकांची
भावना बनते आणि त्यातून अनेक गोष्टी उद्भवतात. २०१८-२०२० ही तीन वर्ष गावी आईसाठी आणि
भावांसाठी वडिलांमुळे जास्त कष्टाची गेली. या काळात आईला मारहाण करणे,
चारित्र्यावर संशय घेणे, भास होणे, शिवीगाळ करणे अशा अनेक गोष्टी होत होत्या. आईला
आणि भावांना घरातून हाकलून देणे, त्याकाळात आई-वडील मावशीच्या गावी निघून गेले होते.
वडील तिकडे जाऊन त्यांना पुन्हा गावाला घेवून आले. काही दिवसांनी पुन्हा पूर्वी सारखेच
करायला सुरुवात केली. त्याकाळात, मी माझे पीएचडीचे शिक्षण घेत होतो. आई आणि भावांना
पुण्याला घेवून यावे असेही ठरले. मात्र नंतर ते रद्द झाले. एका रात्री तर आईवर आणि
भावांवर वडिलांनी रॉकेल टाकून दिले होते. कोणालातरी लवकर जाग आली म्हणून घडणारा अनर्थ
टळला. सकाळी मला कळले म्हणून मी लगेच गावी गेलो. वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न
केला. मात्र, त्यांना काही कळतच नव्हते. ते आईवर काहीही आरोप करत होते. त्यामुळे रागाच्या
भरात एक चापट त्यांना मारली. मात्र, नंतर आणि अजूनही मला तसे केल्यामुळे खूपच दु:ख
होते. त्यावेळीच, मी मानसिक आरोग्यावर सर्टिफिकेट कोर्से केला होता. त्यामुळे तर वडिलांच्या
स्थितीमुळे एकीकडे त्यांची काळजी वाटायची आणि दुसरीकडे ते रागाच्या भरात किंवा भावनेच्या
भरात आई किंवा भावांना काहीतरी करतील याचीही भीती वाटायची. आमचे वडील तसे खूपच ताकतवान
व्यक्ती होते. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यामुळे ते मारामाऱ्या करायलाही तसेच होते.
राजधर आणि अमोल यांना तर ते काहीच घाबरत नव्हते. वडील जर ओरडले तर त्या दोघांना भीती
वाटायची. तीन नंबरचा भाऊ रवी हाच त्यांना उरून पुरायचा. आईला मारहाण केल्यामुळे रवीने
त्यांना काहीवेळा मारहाण केली होती. परंतु, रवीमुळेच त्यांचा आधी जीवही वाचला.
त्यांनी त्रास देण्याची सीमा ओलांडली होती. त्यावेळी, त्यांना विष देवून टाकावे असाही
विचार आला होता. मात्र, रवीने त्याला नकार दिला. त्यामुळे तसे झाले नाही आणि पुढील
सात- आठ वर्ष ते जगले. हे सगळे मोकळेपणाने इथे मी लिहितो आहे. कारण, मानसिक आजारी
व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे, त्यांना सांभाळले पाहिजे असे म्हटले जाते. ते बरोबरही
आहे. मात्र, प्रत्यक्ष मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीसोबत जगणे हे खूपच कठीण आणि आव्हानात्मक
गोष्ट आहे. कधीकधी तर त्या व्यक्तीपासुनच आपल्या जीवाला धोका असतो. म्हणूनच, मानसिकदृष्ट्या
आजारी लोकांसाठी मोठ्या पातळीवर काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकशिक्षण आणि समाजप्रबोधनही
होणे गरजेचे आहे. आमच्या वडिलांच्याच उदाहरणावरून मला असे दिसून आले आहे कि, बरेच दिवस
आमच्या आईला आणि भावांना त्यांना नेमके काय होत आहे याची कल्पनाच नव्हती. आईचे म्हणणे
होते कि, ते आधीपासून असे आहेत. त्यामुळे त्यांना काही मानसिक काहीही झालेले नाही.
भावांना मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये जाणवले. पुढे सगळ्या भावांचे आणि माझेही
लग्न झाले. आम्हाला सगळ्यांना मुले झाले. त्यामुळे थोडासा काही बदल झाला होता.
कारण, घरात सुना आल्या होत्या. सुनांना म्हणावा तसा काही त्रास दिला नाही. मात्र मुलांना
आणि बायकोला म्हणजे आमच्या आईला त्यांनी त्रास दिला. नातवांना मात्र जीव लावायचे.
त्यांच्या एकूणच मानसिक स्थितीचा अंदाज घेतल्यावर मला असे जाणवले कि,
त्यांच्या मानसिक आजारला अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात. त्यांची लहानपणची बेताची आर्थिक-सामाजिक
परिस्थिती, त्यांचे जडणघडण, त्यांचा पुरुषी दृष्टीकोन आणि बायकांच्याविषयीचे मते,
त्यांना झालेली पोलिसी मारझोड आणि त्यातून आलेले बहेरेपण आणि पन्नाशीनंतरचे लैंगिक
जीवन हे सगळेच कारणीभूत असावे. ते आईवर संशय घ्यायचे, त्यांच्याचप्रमाणे मी असे अनेक
पन्नाशीनंतरचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत कि, ज्यांच्या घरात मुलगा- सून, मुलगी-जावई
आहेत, नातवंडे आहेत तरीही बायकांवर संशय घेणारे, आमच्या बायकोचे दुसऱ्या कोणासोबत लफड
आहे असे म्हणणारे पुरुष पाहिले आहेत. मागच्या वर्षी अहमदनगर मध्ये नवऱ्याने रात्रीच
बायकोला मारून टाकल्याचे उदाहरण घडले आहे. २०१८ मध्ये कात्रज, पुणे येथे नवऱ्याने बायको
झोपेत असतांना तिचे मुंडके तोडून टाकले आणि ते घेवून रस्त्यावर फिरत होता अशी घटना
घडली होती. या घटना माहिती असल्यामुळे मला वडीलही असे कदाचित करू शकतील अशी भीती नेहमीच
वाटायची. कारण, त्या मनस्थितीत काहीही त्या व्यक्तीकडून घडू शकते. असे का होत असावे?
यावर मला वाटते कि, पन्नाशीच्या जवळपास स्त्रियांच्या लैंगिक जीवनात मोठा बदल घडतो,
शरीरात बरेच रासायनिक बदल घडतात. पाळी जाते, या सगळ्या गोष्टी एकीकडे घडतात आणि दुसरीकडे
सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातही बदल होतात, घरात सुना, नातवंडे येतात.
त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पन्नाशीनंतर संयुक्त कुटुंबात किंवा एकूणच
स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधात बरेच बदल घडतात. त्यामुळे लैंगिक संबंध घडत नाहीत.
एकमेकांचा स्पर्श पाहिजे तोही मिळत नाही. त्यामुळेच, वरील समस्या उद्भवतात. सुना,
नातवंडे घरात असूनही जर आई-वडील एकत्र झोपत असतील तर मुलेही आई-वडील जवान झाल्यासारखे
वागत आहेत. त्यांना काय म्हातरचळ लागलाय असेही समाजात म्हणतात. त्यामुळे पन्नाशीनंतर
काही लैंगिक आयुष्य असते किंवा असायला हवे अशी कल्पनाही बहुतेक स्त्रिया करत नाही.
पुरुषांसाठी मात्र हा टप्पा लैंगिकदृष्ट्या खूपच कठीण असतो. त्यातही, जर तुम्ही पारंपारिक,
पुरुषी आणि स्त्रियांना कमी समजणारे पुरुष असाल तर मग अधिक कठीण बनतो. आमच्या वडिलांच्या
बाबतीत हे झाले असावे असे मला वाटते. अलीकडच्या पाच-सहा वर्षात आमच्या आईचे आयुष्य
हे नातवंडे आणि मुलांचा संसार हेच होते. त्यामुळे वडिलांकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे.
बहुतेक कुटुंबात हे होते. त्याला अनेक कारणे असतात. जसे कि, समज नसणे, घर छोटे असणे,
कामाचा तान असणे, आजारपण इत्यादी इत्यादी. वडिलांच्या मानसिक आजारपणामुळे मात्र बऱ्याच
गोष्टी शिकता आल्या. मी पुण्याला राहत असल्यामुळे मला म्हणावा तसा त्रास झाला नाही.
मात्र आई आणि भावांसोबत ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी त्यांची कल्पनाही करता येत नाही.
आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारामुळे त्यांची मनस्थिती चांगली नसायची.
तसेच, भूतबाधा अशा गोष्टींवरही त्यांचा विश्वास असल्यामुळे, ते त्याविषयी बोलायचे म्हणून
त्यांच्याशी कमी बोलणे व्हायचे. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे, माझ्याशी बोलबच्चन करा
म्हणजे माझ्याशी बोला. मात्र, बोलतांना ते कधी कधी काहीही बोलायचे त्यामुळे त्यांच्याशी
बोलणे टाळले जायचे.
आज वडील नाहीत. लवकर त्यांना जाऊन
महिना होईल. सहजला वडिलांच्या निधनानंतर सांगितले होते कि, आजोबा हवेत, पाण्यात विरघळून
गेले. आता जेव्हा जेव्हा त्याला आठवण येते, तेव्हा तो म्हणतो, बाबा, आजोबा हवेत विरघळून
गेले. ते हवेत विरघळून गेले हे जरी खरे असले तरी ते अलीकडे मला सगळीकडे दिसतात. कदाचित,
मी बाप झाल्यामुळे माझ्या बापमाणसाला जास्त समजून घेतोय असे मला वाटतंय.