गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

पुरोगामी कोणास म्हणावे? मराठी विचारविश्वातील काही नोंदी


पुरोगामी कोण आहे?

१९४१ मध्ये पुरोगामी वाड्मय म्हणजे काय? याविषयी आचार्य जावडेकरांनी मुंबईमध्ये भाषण दिले

होते. त्या भाषणाची चिकित्सा ना. सी. फडके यांनी केली होती आणि पुरोगामी वाड्मय निश्चित काय हे

आचार्य जावडेकरांनी सांगितलेच नाही असा आरोप केला होता. चिकित्सेची चिकित्सा करतांना आचार्य

जावडेकरांनी म्हटले होते कि, प्रो. फडके यांच्या पुरोगामी वाड्मयविषयीच्या कल्पना आणि माझ्या

पुरोगामी वाड्मयविषयीच्या कल्पना या भिन्न आहेत.’ या उदाहरणापासून लेखाची सुरुवात करण्याचे कारण

आहे – समकालीन काळात पुरोगामी या शब्दाविषयीच्या गैरसमजुती आणि गोंधळ. काही महिन्यांपूर्वी

महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध साहित्य समीक्षक व्यक्तीशी बोलत असतांना जाणवले, कि ते जातीअंतक विचार

करणाऱ्या मंडळीला पुरोगामी हा संकल्पनेत समाविष्ट करत नाही. अधिक विचारले असता ते म्हणाले, कि

माझ्या समजेनुसार पुरोगामी म्हणजे समाजवादी, डावे आणि प्रामुख्याने मार्क्सवादी आहेत. मागील एक

दशकात समाज माध्यामावरही ‘ यांना पुरोगामी म्हणावे का?’ किंवा ‘यांना पुरोगामी कसे म्हणावे?’ किंवा

‘ खरे पुरोगामी आहेत का?’ अशा मुद्यांवर बऱ्याचवेळा तात्कालिक चर्चा होतांना पाहिली आहे. मात्र, या

चर्चेमध्ये कोणी मुद्द्याच्या तळाशी गेलेले दिसत नाही. हिंदुत्ववादी चर्चाविश्वात तर पुरोगामी शब्दाला

‘फुरोगामी’ म्हणून हिणवले जाते. या मागे दोन उद्देश असण्याची शक्यता आहे असे मला वाटते. त्यातील

पाहिला म्हणजे पुरोगामी म्हणून जे काही मांडले जाते, सांगितले जाते. त्या सगळ्यांची टिंगलटवाळी करणे

आणि दुसरा काहीसा गंभीर आहे. तो म्हणजे हिंदुत्ववादी मंडळींच्या दृष्टीने तथाकथित पुरोगामी हे खरे

पुरोगामी नाहीतच. म्हणून, त्यांना फुरोगामी म्हणत असावेत. मात्र, फुरोगामी म्हणजे नेमकं याचीही चर्चा

हिंदुत्ववादी मंडळींनी कधी केलेली दिसत नाही.

आपण वरील चर्चेत पाहिले आहे, कि पुरोगामी म्हणजे नेमकं कोण याविषयी निश्चित असे ठोकताळे

आपल्याकडे नाहीत. त्यामुळे कोणीही स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वैचारिक

गोंधळ होण्याचीही दाट शक्यता आहे असे आपणास दिसते. कोणीही स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असेल

तर मग त्याचा अर्थ पातळ होण्याचीही शक्यता आहे. अलीकडे माझ्या निरीक्षणात असे आले आहे, कि

सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी असलेली काही मंडळी ही लैंगिक बाबतीत पुरोगामी नसते.

तसेच, हे उलटेही होते. काही मंडळी असेही असतात, कि ते सार्वजनिक ठिकाणी पुरोगामी असतात मात्र

खाजगी आणि कौटुंबिक स्तरावर पुरोगामी नसतात. हेही उलटे असते. एकाच कुटुंबात किंवा समाजात

वेगवेगळ्या पिढ्यांमधील पुरोगामीपणाही वेगवेगळा असतो. या सगळ्या चर्चेतून एकच गोष्ट स्पष्ट होते. ती

म्हणजे पुरोगामी असणं किंवा पुरोगामित्व/ पुरोगामीपणा हा एकरंगीय, एकरेषीय आणि एकसाची नाहीये.

व्यक्ती, समाज, काळ, आर्थिक स्थिती, संस्कृती आणि वैचारिकता या नुसार पुरोगामित्वाच्या कल्पना आणि

धारणा बदलतात. म्हणूनच, आपण एकच एक निकष सरसकट सगळ्यांना लावू शकत नाही. असे असले

तरी, सगळ्यांना सामावून घेतील असे पुरोगामी असण्याचे निकष काहींनी करण्याचा प्रयत्न केला आहे.

संदीप ताम्हणकर यांनी अक्षरनामा या वेबपोर्टलवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, कि “पुरोगामी म्हणजे

वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी,

सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून

चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी,

मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल

मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं

की, या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.” पुरोगामी म्हणजे कोण हे सांगण्याचा चांगला प्रयत्न

आहे. मात्र, यावरून एक ठोस अशी पुरोगामी असण्याची व्याख्या करता येत नाही. पुरोगामी शब्दाच्या

अति व्याप्त धारणेमुळेही निश्चितपणे पुरोगामी म्हणजे नक्की कोण यावरून मतभेद आणि वैचारिक गोंधळ

होण्याची शक्यता असते. काहीवेळा जो प्रतिगामी नाही तो पुरोगामी असेही म्हटले जाते. मात्र, प्रतिगामी

म्हणजे नेमकं काय? सामाजिक प्रतिगामी, धार्मिक प्रतिगामी आणि लैंगिक प्रतिगामी यांच्यामध्ये काही

फरक असतो का? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

आधुनिक मराठी विचारविश्व सुधारक, सत्यशोधक, राष्ट्रवादी, समाजसत्तावादी, नवमतवादी,

बुद्धिवादी, हिंदुत्ववादी, जातीअंतक अशा अनेक प्रवाहांनी घडवले आहे. त्यातील अनेक मुद्दे समकालीन

पुरोगामी चर्चाविश्वाशी संबंधित होते असेही म्हणण्यास बराच वाव आहे. किंबहुना, आपण असेही म्हणू

शकतो कि, समकालीन पुरोगामी चर्चाविश्व हे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात घडलेल्या मराठी

विचारविश्वाच्या गुणदोषांचे अपत्य आहे. म्हणूनच, आधुनिक मराठी विचारविश्व आणि पुरोगामी संज्ञा-

संकल्पना संबंध तपासणे आवश्यक ठरते.

समाजसुधारक पुरोगामी होते का?

महाराष्ट्राला समाजसुधारणेची एक दीर्घ परंपरा आहे. पेशवाई अस्तामुळे आणि इंग्रजी सत्तेची

स्थापनेमुळे मोठे स्थित्यंतर मराठी समाजजीवनात घडले. या स्थित्यंतराने धर्मजीवन, समाजजीवन,

अर्थजीवन, कौटुंबिकजीवन, दैनदिन जीवन अशा सगळ्याच जीवनअंगांवर प्रभाव टाकला. त्यामुळेच,

इतिहासकार ज्ञानेंद्र पांडे यांनी इंग्रजी राजवटीने वर्तन आणि विचार पद्धतीच बदलून टाकली असे म्हटले

आहे. इंग्रजी सत्तेने, ख्रिस्ती मिशनरींनी एक मोठे नैतिक आव्हानही मराठी समाजापुढे उभारले होते.

त्यातूनच एकोणिसाव्या शतकात धर्मचिंतनाला सुरुवात झाली आणि त्यातून समाजसुधारणेला प्रारंभ

झाला. देव आणि धर्मकेंद्रित समाजाची चिकित्सा करत विकसित झालेल्या प्रबोधन, ज्ञानोदय आणि

वैज्ञानिक क्रांतीचीही एकोणिसाव्या शतकातच मराठी समाजाला ओळख झाली. त्या प्रभावाखालीच

महाराष्ट्रात अनेकांनी धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. कारण, तत्कालीन समाजात रूढ असलेल्या

प्रथा, रूढी या सगळ्या धर्माचाच भाग म्हणून पाहिल्या जात होत्या. मग तो स्त्रीधर्म असो किंवा

वर्णजातीधर्म असो. बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, सक्तीचे वैधव्य या स्त्रीकेंद्री जुनाट प्रथा असो किंवा अस्पृश्यता, जातीय भेदभाव अशा अमानवी प्रथा असो. या सगळ्यांच्या विरोधात समाजसुधारकांनी लढा दिला आहे. त्या

अर्थाने सगळेच सुधारक पुरोगामी ठरतात. एक गोष्ट मात्र येथे स्पष्ट करण्याची गरज आहे. ती म्हणजे सर्व

समाजसुधारक हे तत्कालीन सामाजिक प्रथा आणि समस्या यांची चिकित्सा करत होते. मात्र, त्यांचे त्यांच्या

समाजसुधारणेच्या दिशाही आणि वैचारिक दृष्टीकोनही वेगवेगळे होते. माझ्या मते, आधुनिक महाराष्ट्रात

तीन प्रकारे समाजसुधारणेचा विचार विकसित झाला. १. आर्य समाजाच्या नेतृत्वाखालील सुधारणावादी

पुनरुज्जीवनवाद (Reformist Revivalism) २. प्रार्थना समाजाच्या प्रभावाखालील उदारमतवादी

सुधारणावाद (Liberal Reformism) ३. सत्यशोधक समाजप्रेरित जहाल सुधारणावाद (Radical

Reformism). तिन्ही सुधारणावादी प्रवाहांनी धर्माच्या नावावर जे शोषण चालते, भेदभाव केला जातो

आणि रूढी, प्रथा आणि कर्मकांड यांना पाठींबा दिला जातो. त्यांची चिकित्सा केली आहे आणि धर्माचा

वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. पुरोहितगिरी, ब्राह्मणवाद याला विरोध केला आहे आणि

स्त्रीशिक्षणाला पाठींबा दिला आहे. जातीच्या मुद्द्यावर आणि धर्माच्या स्वरूपावर या प्रवाहांमध्येही

काहीवेळा तात्पुरते आणि काहीवेळा टोकाचे मदभेद होते. काही प्रवाहांमध्ये परंपरेचे गौरवीकरण,

काहींमध्ये सुलभीकरण असले तरीही तत्कालीन प्रथांना आणि रूढींना मानवहिताच्या दृष्टीने दिलेली ती

प्रतिक्रिया होती म्हणून त्यास प्रतिगामी म्हणता येत नाही. म्हणूनच, माझ्या दृष्टीने समाजसुधारकांमध्ये

बोलते आणि कर्ते सुधारक असा फरक असला तरी किंवा समाजसुधारणेच्या नावाखाली काही मंडळी कुटुंब

सुधारणाच करत असले तरीही सगळेच पुरोगामी होते. त्यांच्यातील पुरोगामित्व हे वेगवेगळ्या

स्वरूपातील होते असे मात्र आपण निश्चित म्हणू शकतो.

सत्यशोधकीय पुरोगामित्व

१९३६ मध्ये महाराष्ट्र शाहीर संमेलनामध्ये शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी सत्यशोधक

समाजाचा पोवाडा सादर केला होता. त्या पोवाड्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही सामाजिक,

आर्थिक धार्मिक शिक्षण देण्याला झाली आहे असे संपूर्ण पोवाड्यात जवळपास पंधरा ते वीस वेळा म्हटले

आहे. यावरूनच, आपणास सत्यशोधक समाजाचे महत्व लक्षात येते. एकोणिसाव्या शतकात संपूर्ण भारतात

समाजसुधारणा चळवळीला चालू होत्या. मात्र, बहुतेक सुधारणा चळवळी या अभिजन, शहरकेंद्रित

चळवळी होत्या. सत्यशोधक समाज हा एकमेव असा समाज होता, कि जो एकाचवेळी शहरातील कष्टकरी,

कामगार वर्गात आणि ग्रामीण भागात शेतकरी वर्गात कार्यरत होता. म्हणूनच, सत्यशोधक समाजाला

बहुजनाची चळवळ आणि ग्रामीण भागात झपाट्याने पसरलेला समाज म्हणूनही पाहिले जाते. सत्यशोधक

समाजाचे समाजशास्त्र हेही बहुजातीय आणि बहुधर्मीय होते. काही लोक अज्ञानामुळे आणि काही लोक

जाणीवपूर्वक सत्यशोधक समाजाने ब्राह्मणद्वेष पसरवला असे म्हणतात. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी

आहे. सत्यशोधक समाजाने ब्राह्मणशाहीची चिकित्सा केली आहे. ब्राह्मण आहे म्हणून व्यक्तीची नाही.

‘ख्रिस्ती, महमद, मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी’ अशी भूमिका सत्यशोधक समाजाची होती.

व्यक्ती विशिष्ट जाती आणि धर्मात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ही भूमिका सत्यशोधक

समाजाला मान्य नाही. म्हणूनच, सत्यशोधक समाजात मानवी हक्क, अधिकार आणि सन्मान यांची चर्चा

आहे. स्त्री-पुरुष हे दोघेही जन्मत: स्वतंत्र आहेत अशी ठोस भूमिका जोतीराव फुल्यांनी घेतली होती.

सत्यशोधकांनी समाजातील शोषणाची मूलगामी चिकित्सा केली आहे. शोषणाचे अनेक कंगोरे

सत्यशोधकांनी त्यातही प्रामुख्याने जोतीराव फुल्यांनी उलघडून दाखविले आहेत. शोषण हे फक्त आर्थिक

नसते याचीही चर्चा त्यांनी केली आहे. धार्मिक शोषण, मानसिक शोषण आणि सामाजिक शोषण हे

समाजात घडते आणि बऱ्याचवेळा या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचा एकमेकांशीही संबंध असतो असेही

जोतीराव फुल्यांनी दाखविले आहे. उदा. जोतीराव फुलेकृत शेतकऱ्याचा आसूड आणि इशारा ही दोन ग्रंथ.

जोतीराव फुल्यांची चर्चा करतांना अनेकजण त्यांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या.

घराचा हौद खुला केला याच गोष्टी सांगतात. मात्र, त्यासोबतच त्यांनी विधवा स्त्रियांची लैंगिकता या

सारख्या आजही दुर्लक्षित असलेल्या प्रश्नाला हात घातला होता आणि त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह

काढले होते याची चर्चा अनेकजन टाळतात. जोतीराव फुल्यांनी गरोदर विधवा स्त्रियांसाठी हक्काची जागाच

निर्माण केली नाही तर विधवा स्त्रियांच्या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या समाजस्थितीही चिकित्सा

केली आणि विधवा स्त्रियांवर गरोदरपण लादणाऱ्या पुरुषांचीही चिकित्सा केली आहे. तसेच, एका

विधवेच्या मुलाला दत्तकही घेतले.

सत्यशोधकांनी धर्माची कठोर चिकित्सा केली आहे. मात्र, त्यासोबतच, त्यांना धर्म हा मानवी जीवनात

अत्यंत महत्वाचा आहे याचीही जाणीव होती. म्हणूनच, जोतीराव फुल्यांनी मानवधर्माची चर्चा करणारा

सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथही लिहिलेला आहे. सगळेच धर्म हे सत्य सांगतात. मात्र, कोणत्याही एकाच धर्मात

संपूर्ण सत्य नाही अशी भूमिका सत्यशोधकांनी घेतली आहे. म्हणूनच, एकाच कुटुंबात वडील ख्रिस्ती, आई

मुस्लीम, मुलगी बौद्ध आणि मुलगा हा सत्यधर्मी असू शकतो. फक्त त्यांनी आपापला धर्मग्रंथ वाचून त्यातील

विचार पटला तर धर्मविषय निर्णय घ्यायचा आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक एकाच कुटुंबात गोडीगुलाबीने

एकत्र राहू असा विचार सत्यशोधकांनी केला आहे. १८९५ मध्ये ख्रिस्ती आणि आर्य समाजी मंडळींमध्ये

कोणाचा धर्म श्रेष्ठ यावरून एकदा वादविवाद चालू असतांना त्यावर सत्यशोधकांच्या दीनबंधु वृत्तपत्राने

‘कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता धर्म कनिष्ठ यापेक्षा कोणताचा धर्म मानवाचा विचार करतो आणि कोणत्या

धर्मातील पुरोहित लोकांच्या हिताचा विचार करतात हे जास्त महत्वाचे आहे’ या आशयाचे भाष्य केले

होते. यावरूनच आपणास सत्यशोधकांची धर्मविषयक दृष्टी दिसून येते. सत्यशोधकांच्या विचारसृष्टीत

सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक याची फारकत नाही. म्हणूनच, सत्यशोधकीय

पुरोगामित्व एकरेषीय नाहीये.

पुरोगामी राष्ट्रवाद

आधुनिक महाराष्ट्राच्या विचारविश्वाला ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरवादाने जसे घडवले आहे. तसेच, संकुचितही

बनवले आहे. कारण, बहुतेकवेळा साचेबद्ध चौकटीत महाराष्ट्राच्या विचारविश्वाची चर्चा त्यामुळे केली आहे.

मात्र, महाराष्ट्राचा बौद्धिक इतिहास हा काही एकरेषीय पद्धतीने घडलेला नाही. किंबहुना कुठलाच इतिहास

असा घडत नाही. इतिहासाचे एकसाचीकरण, मग ते कुठल्याही अर्थाने असो, पुरोगामी असो, प्रतिगामी

असो किंवा डावे-उजवे असो हे घातक आहे.

टिळक आणि छत्रपती शाहू या दोन्हींच्या संबंधीने अजूनही एकरेषीय चर्चा केली जाते. दबक्या

आवाजात अजूनही टिळकांची बाजू घेणारे छत्रपती शाहूंना आणि छत्रपती शाहूंची बाजूने घेणारे टिळकांना

नावे ठेवत असतात. टिळकांना वर्ण-जातीव्यवस्था समर्थक आणि शाहूंना इंग्रज समर्थक ठरवत असतात.

मात्र, तत्कालीन वासाहतिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेतला तर आपणास स्पष्टपणे असे दिसते,

कि दोघांनी आपल्या क्षमतेप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार पुरोगामीत्व घडवले आहे. इतर बाबींमध्ये त्या

पुरोगामित्वाच्या मर्यादाही आहेत हेही तेवढेच खरे आहे. या सगळ्यांची चर्चा करतांना टिळक हे कोकणस्थ

आणि खोत पार्श्वभूमीचे ब्राह्मण होते आणि छत्रपती शाहू हे संस्थानाचे राजे होते या सामाजिक – राजकीय

स्थानाचा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे. टिळकांनी स्वराज्याची मागणी केली तर छत्रपतींनी सुराज्याची

मागणी लावून धरली. तत्कालीन संदर्भात दोन्ही मागण्यांना त्यांच्या अनुयायांनी एकमेकांच्या विरोधी

म्हणून पाहिले आहे मात्र आज त्यांच्या इतिहासाचा धांडोळा घेतांना हे स्पष्टपणे दिसून येते, कि

स्वराज्याशिवाय सुराज्य मिळणार नव्हते आणि सुराज्याशिवाय स्वराज्याला अर्थ राहणार नव्हता.

म्हणूनच, टिळक-शाहू हा ताणलेला वाद आपण पुरोगामी राष्ट्रवाद आणि जहाल सुधारणावाद यांच्या

संदर्भात समजून घेतला तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेण्यास सोपे होतात.

राष्ट्रवादविषयक विपुलप्रमाणात चांगली- वाईट चर्चा जगभरात झालेली आहे. समकालीन जगात

पुन्हा ‘राष्ट्रवादी’ विचारांच्या चर्चा चालू झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी भूमिका

ही व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. राष्ट्रवादाच्या अभ्यासकांनी राष्ट्रवादाला विविध प्रवाहांमध्ये समजून

घेतले आहे. साम्राज्यवादी सत्ताधीशांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेला पुरोगामी राष्ट्रवाद

(Progressive Nationalism) आणि परकीय सत्ताधीशांच्या जोखडातून मुक्त होईन स्वतःच्या राजकीय

हितसंबंधासाठी जोपासलेला प्रतिगामी राष्ट्रवाद (Repressive Nationalism) अशी काहींनी चर्चा केली

आहे. काहींनी समावेशी राष्ट्रवाद (Inclusive Nationalism) आणि वगळणारा राष्ट्रवाद (Exclusive

Nationalism) असे प्रकार केले आहेत. काहींनी धार्मिक राष्ट्रवाद (Religious Nationalism) आणि

निधर्मी/धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद ( Secular Nationalism) असेही प्रकार केले आहेत. टिळक हे राष्ट्रावादी नेते

आणि विचारवंत होते. त्यांच्या राष्ट्रवादाला कसे समजून घ्यायचे हा प्रश्न अलीकडे अनेकांसमोर उभा

राहिला आहे. काहींनी टिळकांना ‘हिंदू राष्ट्रवादी’ ठरविण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच, काहींनी त्यांना

‘हिंदू जमातवादी’ ठसविण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र, टिळकांच्या एकूण सगळ्या राजकीय आयुष्याची

वाटचाल पाहिली तर ‘ हिंदू राष्ट्रवादी ‘ आणि ‘ हिंदू जमातवादी’ ही बिरुदावली त्यांना चिटकवाने योग्य

होईल का असाही प्रश्न निर्माण होतो. ब्रिटीश साम्राज्यवादविरोधी निर्माण केलेला असंतोष आणि १९१६

मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगच्या लखनऊ कराराच्या माध्यमातून घडवून आणलेले हिंदू-मुस्लीम ऐक्य

ही दोन उदाहरणे टिळकांच्या पुरोगामी राष्ट्रवादाची लक्षणे आहेत. तसेच, हा पुरोगामी राष्ट्रवाद समावेशक

आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादही होता. टिळकांच्या राजकीय पूर्वायुष्यात सुरुवातीला ब्राह्मणांचे नेते म्हणून

ब्राह्मणेत्तरविरोधी आणि हिंदूंचे नेते म्हणून मुस्लीम विरोध भूमिकाही घेतली होती. मात्र, म्हणून त्यांना

ब्राह्मण्यवादी आणि हिंदुत्ववादी म्हणता येत नाही. कारण, ब्राह्मण्यवादी, सनातनी आणि हिंदुत्ववादी

कल्पनासृष्टीपेक्षा त्यांचे कल्पनाविश्व हे काहीसे वेगळे होते. म्हणूनच, त्यांचा राष्ट्रवाद हा पुरोगामी राष्ट्रवाद

होता अशीच माझी भूमिका आहे. परंतु, त्यांच्या पुरोगामी राष्ट्रवादाला त्यांच्या सामाजिक जतनवादी

(सनातनी किंवा पुनरुज्जीवनवादी नव्हे) भूमिकांमुळे काहीशा मर्यादा होत्या. हेही तेवढेच खरे आहे.

विसाव्या शतकातील मराठी विचारविश्व आणि पुरोगामित्वाच्या विविध छटा

विसाव्या शतकात मराठी चर्चाविश्वाची वैचारिक रंगभूमी ही बहुरंगी झाली. कारण, पूर्वीचा म्हणजे

एकोणिसाव्या शतकातील सामाजिक विरुद्ध राजकीय हा वाद काहीसा मिटला होता आणि सामाजिक

आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात एकदाच सुधारणा कराव्या लागतील अशी समज विकसित होवू लागली

होती. टिळकांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसच्या रंगमंचावर जननायक म्हणून उदय झाला होता. त्यामुळेच,

महाराष्टातील कॉंग्रेसचे समाजशास्त्रही पूर्णत: बदलायला सुरुवात झाली होती. दुसरीकडे, रशियातील

क्रांतीमुळे समाजवादी विचारांची पाळेमुळे महाराष्ट्रात पसरू लागली होती. त्यामुळेच, इंग्रजी सत्ता

बोल्शेव्हिझिम बागुलबुवा ही पसरवू लागली होती. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांनी काही

मुलभूत प्रश्न हिंदू समाजव्यवस्थेपुढे निर्माण केले होते आणि त्यामुळे एकीकडे साने गुरुजी, आचार्य जावडेकर

यांच्या सारखी मंडळी समाजवादी चष्म्यातून हिंदू धर्म आणि संस्कृती अर्थ लावत होती तर दुसरीकडे

महादेवशास्त्री दिवेकर, रघुनाथशास्त्री कोकजे ही मंडळी हिंदू समाजाला कालसुसंगत आणि अद्ययावत

करण्यासाठी प्रयत्न करत होती. हिंदू समाजाच्या एकीमध्ये जात आणि अस्पृश्यता अडथळा येतात म्हणून

हिंदुत्ववादी वर्तुळात सावरकर आणि शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनेसाठी

सामाजिक पुरोगामी प्रयत्नही होत होते. याचकाळात, एकीकडे स्त्री-पुरुष संबंधाच्या संदर्भात रवीकिरण

मंडळ साहित्यविश्वात पुरोगामी भूमिका घेवून पारंपारिक चौकटींना धक्के दिले. दुसरीकडे, र. धो. कर्वेंनी

लैंगिक शिक्षण, स्त्री आरोग्य आणि समाजस्वास्थ्य या संदर्भात विज्ञानवादी, बुद्धिवादी भूमिका घेतली. अशा

विविध प्रवाहांच्या माध्यमातून विसाव्या शतकातील मराठी विचारविश्वात पुरोगामी विचार विकसित

झालेला दिसतो. यातील बहुतेकवेळा प्रवाहांनी पुरोगामी हा शब्दप्रयोग वापरलेला नाही. मात्र, समकालीन

संदर्भात पुरोगामी या शब्दाला जो आशय आणि अर्थ आहे त्याचे मुळे वर उल्लेख केलेल्या वैचारिक

प्रवाहांमध्ये आहेत असे मला वाटते.

1. नवमतवाद आणि मार्क्सवादी पुरोगामीपणा

रशियन क्रांतीच्या प्रभावातून विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात समाजवादी/मार्क्सवादी

विचारांचा प्रभाव मराठी विचारविश्वाला पडायला सुरुवात झाली होती. त्याचे प्रतिबिंब साहित्यिक

जीवनात आणि सामाजिक-राजकीय जीवनात पडायला सुरुवात झाली आणि त्यातून कामगारकेंद्री साहित्य

निर्मिती होवून साहित्य, कथा आणि कविता यांच्यामध्ये कामगारवर्गीय जीवन चित्रित होवू लागले होते.

पांढरपेशी, मध्यमवर्गीय साहित्याची मर्यादा दाखवत कामगार वर्गीय साहित्य हे खरे साहित्य आहे अशी

चर्चा होवू लागली. साहित्याची कलावादी भूमिका ही अभिजनवादी आहे. तीचा लोकजीवनाशी संबंध नाही

अशी भूमिका घेत कला हे फक्त कलेसाठी नसून समाजासाठी आहे, साहित्य फक्त मनोरंजनासाठी नसून

जीवनासाठी आहे अशी भूमिका घेतली गेली. मार्क्सवादी साहित्यात आर्थिक विषमता, धार्मिक कर्मकांड,

सामाजिक विषमता आणि भेदभाव अशा अनेक समस्यांची चर्चा केली आहे. मामा वरेकर, अनंत काणेकर

आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा या संदर्भात विचार आपण करू शकतो.

रशियन क्रांतीनंतर रशियन समाजामध्ये समाजवादी विचारांच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले गेले.

त्यातून एक नवीन नितीमुल्ये निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. स्त्री-पुरुष नातेसंबंध, कुटुंब, घटस्फोट,

पालकत्व, लैंगिकता, नैतिकता या संदर्भातही रशियामध्ये खूप मोठी घुसळण झाली. त्यामुळेच,

सावरकरांच्या दृष्टीने ‘रशियन क्रांती ही नुसती राज्यक्रांती नसून तर धर्मक्रांती, अर्थक्रांती, समाजक्रांती

म्हणजेच एक जीवनक्रांतीच होती.’ मालतीबाई बेडेकरांनी तर रशियन क्रांतीला ‘सेक्सक्रांती’ असे संबोधले

आहे. रशियामध्ये होणाऱ्या या वैचारिक घुसळणीचा महाराष्ट्रातील लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांवर

पडला. त्यातील काहीजण हे राजकीयदृष्ट्या मार्क्सवादी राजकारणाशी संबंधितही होते. मात्र, बहुसंख्य

मंडळी ही साहित्यिक होती. अशा सगळ्या मंडळींना ‘तिरंगी नवमतवाद’ या ग्रंथामध्ये न. चिं. केळकर

यांनी ‘सुधारक’ न म्हणता नवमतवादी म्हटले आहे. त्यांच्यामते सुधारक हे कुटुंब आणि विवाह या संस्थांना

सुधारू पाहत होते. नवमतवादी मंडळी मात्र ते उधवस्त करू पाहत आहेत असा त्यांचा आरोप होता.

नवमतवादी मंडळींपैकी असलेल्या आणि रवीकिरण मंडळाशी संबंध असलेल्या ग. त्र्य. माडखोलकरांनी

सह्याद्री मासिकात १९३० च्या दशकात ‘नव्या लैंगिक नीतीची गरज’ अशा आशयाचा लेख लिहिला होता.

पारंपारिक नितीमुल्ये ही व्यक्तिवाद, व्यक्तीस्वातंत्र्य यामध्ये बाधा आणतात म्हणून नवीन नितीमुल्ये

निर्माण केली पाहिजे अशी भूमिका या प्रवाहातील अनेक मंडळींनी घेतलेली होती.

2. पुरोगामी मात्र हिंदुत्ववादी

समकालीन हिंदुत्ववादी चर्चाविश्वात पुरोगामी या शब्दाची निंदानालस्ती केली जाते. पुरोगामी मंडळी

ही हिंदुधर्म, हिंदुत्व आणि हिंदू समाज यांच्याविरोधी आहेत असाही समज समकालीन हिंदुत्ववादी

बाळगतात. मात्र, असे करत असतांना हिंदुत्ववादी चळवळीचा बौद्धिक इतिहासही ते सोईस्करपणे दुर्लक्षित

करतात किंवा विसरतात. अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी चळवळीचे सनातनीकरण होते आहे असेही

दिसते. त्यामुळेच, हिंदुत्ववादी चळवळीतील लोकांनीच धर्मचिकित्सा केली आहे. अस्पृश्यता आणि

जातीभेद नाकारले आहेत. ग्रंथप्रामाण्य नाकारले आहे, धर्माला कालसुसंगत आणि अद्ययावत करण्याची

भूमिका घेतली होती हे काहीसे विसरले जाते.

१९३५ मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अधिवेशन पुणे शहरात झाले होते. त्यादरम्यानच, डॉ.

कुर्तकोटी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेतील ‘परिवर्तनवादी गटा’ची स्वतंत्र बैठकही झाली होती.

त्यामध्ये अस्पृश्यता निवारण केले पाहिजे. अस्पृश्यांसाठी मंदिरे खुले केली पाहिजे. आपण आपल्या

आयुष्यात अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे अशी भूमिका घेतली होती. अस्पृश्यता ही हिंदू संघटनेमधील

सर्वात मोठी अडचण ठरत होती म्हणून त्यांनी अशी परिवर्तनवादी भूमिका घेतली होती. मात्र, या

भूमिकेला हिंदू महासभेतील सनातनी, जातीभेद समर्थक मंडळींचा मोठा विरोधही होता. अशाच चर्चांमुळे

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये परिवर्तनवादी हिंदुत्ववादी आणि सनातनी हिंदुत्ववादी

यांच्या झटापट आणि मारामारी झाल्याचेही उदाहरणे आहेत.

सावरकरांनीही हिंदुत्ववादी विचारप्रवाहाला परिवर्तनवादी आणि आधुनिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला

आहे. बुद्धिवाद, विवेकवाद, उदारमतवाद, उपयुक्तात्वाद, मानवतावाद आणि राष्ट्रवाद अशा वेगवेगळ्या

विचारप्रवाहांचा आधार घेवून त्यांचा डावपेचात्मक अज्ञेयवाद ( Strategic Agnosticism) आणि

हिंदुत्ववादी पुरोगामीपणा विकसित झाला होता. त्यालाच काहींनी बुद्धिवादी हिंदुत्व असेही नाव दिले

आहे. ग्रंथप्रामाण्य सोडून तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान याची कास धरा अशी त्यांनी भूमिका घेतली

होती. तसेच, जातीभेद आणि अस्पृश्यता ही हिंदू संघटनेतील मोठा अडथळा आहे म्हणून तीचा उच्छेद केला

पाहिजे. त्यासाठी सहभोजने, आंतरजातीय लग्ने यांचेही त्यांनी समर्थन केले आहे. सावरकरांच्याप्रमाणेच म.

श्री. माटे आणि पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचा हिंदुत्ववाद पुरोगामी वळणाने विकसित झाला आहे. मात्र, पुरोगामी

वळणाच्या हिंदुत्वावादाने मुस्लीम एकसाचीकरण केले आहे ही त्याची मोठी मर्यादा आहे. अजूनही,

प्रामुख्याने महाराष्ट्रात विज्ञानवाद, बुद्धिवाद याचा आधार घेऊन मांडणी करणरे सावरकरी हिंदुत्ववादी

मंडळी बरीच दिसतात आणि संघाच्या हिंदुत्ववादापेक्षा आम्ही वेगळे आहोत असेही म्हटले जाते. राष्ट्रीय

स्वयंसेवक संघाने राष्ट्रीय मुल्सिम मंचाच्या माध्यमातून मुस्लिमांना सामावून घेण्याचा प्रयत्न चालवला

आहे. तो सावरकरवादी हिंदुत्ववादी मंडळींनी पटतोच असे नाही.

3. र. धो. कर्वे आणि पुरोगामी बुद्धिवाद

विवेकवादाचा आणि बुद्धिवादाचा महाराष्ट्रात र. धो. कर्वेंच्या आधी अनेकांनी आपल्या मांडणीत

आधार घेतला होता. सावरकरांनी हिंदुत्वावादाच्या मांडणीसाठी बुद्धिवादाचा उपयोग कसा केला याची

काहीशी चर्चा आपण वर केली आहे. र. धो. कर्वेंनी मात्र स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, कामजीवन या

मुद्यांनाच बुद्धिवादाच्या माध्यमातून हात घातला होता. तत्पूर्वी बहुतेकांनी सामाजिक, धार्मिक बाबतीत

बुद्धिवादी आणि विवेकवादी भूमिका घेतली होती, मात्र लैंगिकजीवन, कामजीवन आणि खाजगीजीवन

त्यापासून लांबच ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिवादाला आणि विवेकवादाला मर्यादा होत्या. म्हणूनच,

जे. व्ही. नाईक यांनी महाराष्ट्रातील ‘ खरा बुद्धिवादी’ म्हणून र. धो. कर्वेंची ओळख केली आहे. कर्वेंच्या

सोबत, शकुंतलाबाई परांजपे यांनी लैंगिक शिक्षण परिषदा आयोजित करून लैंगिक साक्षरता करण्याचा

प्रयत्न केला. काहींना ही व्यक्तिगत किंवा काही विशिष्ट समाज गटांचे प्रयोग असे वाटू शकते. मात्र, लैंगिक

शिक्षण, लैंगिक आरोग्य आणि कामजीवनविषयक चर्चांनी तत्कालीन मराठी समाजात बरीच चर्चा घडवून

आणली होती. त्यामुळेच, कर्वे हे समाजात अश्लीलता आणि अनैतिकता पसरवत आहेत असेही आरोप झाले.

र. धो. कर्वेंनी त्यांच्या पारंपारिक सामाजिक, सांस्कृतिक धारणांना अनेक धक्के दिले. म्हणूनच, र. धो.

कर्वेंचा लैंगिक चिंतनाच्या माध्यमातून विकसित झालेला बुद्धिवाद हा वेगळाच धाटणीचा होता.

4. धर्मनिर्णय मंडळाचे धार्मिक पुरोगामित्व

१९३० च्या दशकात महाराष्ट्रात धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अनेक

महत्वाच्या घडामोडी झाल्या. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची

भूमिका जाहीर केली. या भूमिकेचा अस्पृश्य समाजावर जसा परिणाम झाला तसाच मोठा परिणाम सवर्ण

हिंदुवरही झाला. हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी डॉ. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे खडबडून

जागे झालेली दिसतात. धर्माला अद्ययावत केले पाहिजे तसेच, समकालीन संदर्भात काही गोष्टी अनिष्ट

असतील त्यांना कालसुसंगत केले पाहिजे अशी भूमिका असलेल्या शास्त्री मंडळींनी १९३६ मध्ये तत्वनिष्ठ

परिवर्तनवादी परिषद, लोणावळा येथे स्थापन केली. पुढे याच परिषदेचे धर्म निर्णय मंडळात रुपांतर झाले.

रघुनाथशास्त्री कोकजे हे या परिषदेचे/ मंडळाचे कार्यवाह होते. त्यांनी १९३० च्या दशकात प्राचीन

दर्शने आणि जातीभेद, धर्मशास्त्र आणि जातीभेद अशा मुद्यांवर लेख लिहिले आहे. अशा लेखांच्या

माध्यमातून त्यांनी धर्मशास्त्र, प्राचीन दर्शने यांचा सनातनी अर्थ नाकारून परिवर्तनवादी अर्थ लावण्याचा

प्रयत्न केला आहे. तसेच, वेद हे मानवनिर्मितीच आहेत. जातीभेद नैसर्गिक नाही अशाही भूमिका या मंडळाने

घेतल्या. एकीकडे, डॉ. आंबेडकरांनी हिंदू समाज, दर्शने आणि शास्त्रे यांची जी चिकित्सा करायला सुरुवात

केली होती. दुसरीकडे, अखिल भारतीय वर्णाश्रम स्वराज्य संघवाली मंडळी जो सनातनी अर्थ लावत होती.

या दोन्हीमधून मार्ग काढून हिंदू समाजाला अद्ययावत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याच प्रयत्नाचा भाग

म्हणून महादेवशास्त्री दिवेकरांनी ‘ नवा हिंदू धर्म’ असा ग्रंथच लिहिला आणि हिंदू धर्मातील आणि

समाजातील कालविसंगत गोष्टींची चिकित्सा केली होती. धर्म निर्णय मंडळाच्या कार्यात केवलानंद

सरस्वती, श्रीधरशास्त्री पाठक, लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि

पुरोगामी दृष्टी असलेली धार्मिकता विकसित करण्याचा प्रयत्न केला होता.

5. आंबेडकरी जातीअंतक पुरोगामित्व

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संघटीत बहिष्कृत वर्गाच्या चळवळीने अनेक

मुलभूत प्रश्न तत्कालीन समाजाच्या सामोरे निर्माण केले होते. तत्कालीन समाजात प्रभावी असलेल्या

ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरवादाचीही चिकित्सा त्यांनी केली होती. १९२७ महाड सत्याग्रहात ब्राह्मणांना घेवू नका

अशी सूचना ब्राह्मणेत्तर नेत्यांनी केली, त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी आम्ही ब्राह्मणविरोधी नसून

‘ब्राह्मण्यविरोधी’ आहोत अशी भूमिका घेतली आणि ब्राह्मण्यविरहीत ब्राह्मण आम्हाला चालतो मात्र

ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेत्तर फक्त ब्राह्मणेत्तर आहे म्हणून आम्हास चालत नाही. याच काळात, बहिष्कृत

भारतात ब्राह्मण्य म्हणजे काय? यावर डॉ. आंबेडकरांनी लेखन केले आहे आणि त्यात स्पष्ट म्हटले आहे, कि

‘ब्राह्मण्य म्हणजे जन्मजात: उच्चनीच हा भेदभाव मानणे’ ब्राह्मण्य हे ब्राह्मणांमध्ये, ब्राह्मणेत्तरांमध्ये आणि

बहिष्कृतांमध्येही आहे अशी ठोस भूमिका याच काळात घेतलेली दिसते.

जाती व्यवस्था हीच संपूर्ण भारतीय अधोगतीला कारणीभूत आहे. त्यामुळेच, राष्ट्रीय जाणीव निर्माण

होत नाही. लोकांमध्ये बंधुभाव नाही. त्यामुळेच जातीचे निर्मुलन केल्याशिवाय कोणतेही मूलगामी

परिवर्तन भारतीय समाजात शक्य नाही अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. तत्पूर्वी, काहींनी अस्पृश्यता

निर्मुलन, सामाजिक भेदभाव याविषयी चर्चा केली होती. मात्र, जातीच्या निर्मूलनाचा मुद्दा डॉ.

आंबेडकरांनी प्रथम मुख्यप्रवाही चर्चेचा मुद्दा बनवला.


जातीचा अंत केल्याशिवाय हिंदू संघटनही होवू शकत नाही आणि समाजबादही येवू शकत नाही.

तसेच, आपण स्वातंत्र्य उपभोगण्यास पात्रही होवू शकत नाही अशी भूमिका घेत त्यांनी एकाच वेळी,

हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी आणि कॉंग्रेसी विचारांची चिकित्सा केली. जातीच्या मुद्द्याला

वगळून होणाऱ्या सुधारणा आणि चर्चा या म्हणाव्या तशा परिणामकारक नाहीत अशीच भूमिका

आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायींनी घेतली आहे. पुढील काळात दलित साहित्य चळवळीने शहरी,

मध्यमवर्गीय आणि अभिजन साहित्याची कठोर चिकित्सा केली. जातीमुळे होणारे फायदे, मिळणारे

विशेषाधिकार तसेच ठेवून कोणीही पुरोगामी होवू शकत नाही. तसेच, जातीअंतक झाल्याशिवाय खरा

पुरोगामीही होता येत नाही अशी भूमिका आंबेडकरवादी विचारविश्वात घेतली जाते. जाती अंताची

भूमिका न घेता पुरोगामी म्हणून घेणाऱ्या मंडळींची आंबेडकवादी जातीअंतक पुरोगामी चर्चाविश्वात कठोर

चिकित्सा केली जाते.

पुरोगामित्वाचा वारसा आणि काही प्रश्न

आज आपण पुरोगामी म्हणजे कोण ? ही चर्चा करतांना मराठी विचारविश्वातील पुरोगामित्वाचा

वारसा लक्षात घेत नाही असे मला वाटते. तसेच, पुरोगामी म्हणजे नेमकं आणि निश्चित काय हेही समजून

घेत नाही. समाजसुधारणा, धर्मसुधारणा, धर्मचिकित्सा, ग्रंथप्रामाण्य आणि शब्द प्रामाण्याला विरोध,

व्यक्तिवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य यांची पाठराखण, सामजिक-आर्थिक आणि धार्मिक शोषणाची

चिकित्सा, भेदभावाला नकार, स्त्री-पुरुष समता, बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकी श्रद्धा

आणि जातीनिर्मुलन या सगळाच मराठी समाजाचा पुरोगामी वारसा आहे. मात्र, या अशा विविध कल्पना,

विचार आणि संकल्पनांमुळे हा पुरोगामित्वाचा वारसा काहीसा गुंतागुंतीचा आणि जटिलही झाला आहे.

त्यामुळेच, दोन पुरोगामी एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका घेतांना दिसतात आणि त्यामुळेच पुरोगामी

म्हणजे नक्की काय? पुरोगामी विचार म्हणजे नक्की काय आणि पुरोगामी व्यवहार निश्चित कसा करायचा

असतो याविषयी अजूनही आपल्या समाजात चर्चा चालूच आहेत. त्याची मुळे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि

बौद्धिक इतिहासात आहेत. तो आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपण पुरोगामित्वाच्या चर्चेला

काळ्या-पांढऱ्या चौकटीत न अडकवता चर्चा करू शकतो आणि एकाचवेळी विविध प्रकारचे पुरोगामी लोक

अस्तित्वात असू शकतात आणि त्यांच्यामध्ये अनेक मुद्यांवर मतभेदही असू शकतात हे आपण मान्य करू

शकतो 


पूर्वप्रसिध्दी - नवभारत ऑक्टोबर २०२५ 

फुले- आंबेडकरांचे धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा


1. “धर्मासंबंधाने पूर्वी अनेक वेळा विद्वान लोकांत चांगले कडाक्याचे वादविवाद झाले

आहेत. आमच्या धर्मातील देव अमूक होते व तमक्या धर्मातील देव तमुक होते अशा

बद्दल सध्या अनमान करण्याचे काहीच प्रयोजन नाही. जो धर्म मनुष्यास मनुष्यपण

देतो किंवा ज्या धर्माचे लोक किंवा धर्मगुरू आपल्या एकंदर स्वधर्मीय बांधवांच्या

हितास्तव काळजी बाळगतात तोच धर्म चांगला आहे आणि हेच आंता दाखविण्या

करिता प्रत्येक धर्माच्या मनुष्याने व धर्मगुरूने झटले पाहिजे. निरर्थक बाचा बाच

करण्यात व कोटिक्रम लढविण्यात काही एक फायदा नाही. धर्म चांगला आहे परंतु त्या

धर्माचे स्वरूप खरे रहस्य काय आहे हे जर त्या त्या धर्मातील लोकांस समजत नाही

तर त्या धर्माच्या चांगलेपणाचा उपयोग काहीच नाही.”, दीनबंधू, ४ ऑगस्ट १८९५ 


2. "आधीच धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. जेव्हा खऱ्या धर्माची पायमल्ली होते

तेव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर

एकमेकांशी भांडत आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या धार्मिक वृत्तीची माणसे चार-दोन तरी

सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच

धर्माचा आवेश दाखवून दुसऱ्या धर्माच्या लोकांचे प्राण घेऊ पाहतात. धर्माने माणसाला

देवदूत बनविले पाहिजे; परंतु तसे न होता धार्मिक कलहामुळे धर्माच्या योगाने

माणसाचे माणूसपण जाऊन त्याला पशूपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड

मारामाऱ्या करतात. एकमेकांची टाळकी सडकतात व खून करतात आणि सुशिक्षित गुंड

अल्पायासाने आपापल्या समाजात लोकप्रिय होण्याची पर्वणी साधून घेतात. अशिक्षित

गुंडाच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षित गुंडांवरच आहे.

कारण त्यांच्या चिथावणीमुळेच अशिक्षित लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात.

सुशिक्षित गुंड जसे हिंदूंत आहेत तसे मुसलमानांत आहेत. पंडितांत आहेत तसे

मौलानांमध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सूक्ष्म विचार कोणीच करीत नाही,

धर्माच्या आद्य तत्त्वांची कोणालाच पर्वा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय

समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे.” बहिष्कृत भारत, १२ आगस्ट १९२७


धर्मांधता आणि धार्मिकता यामध्ये फरक केला पाहिजे अशी चर्चा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या

प्रमाणात सुरु झालेली दिसते. मात्र, ही चर्चा काही नवीन नाही. म्हणूनच, लेखाच्या सुरुवातीला दोन

उदाहरणे दिली आहे. अलीकडच्या काळात इहवादी/ धर्मनिरपेक्षतावादी राजकारणाच्या प्रभावामुळे

धर्माची मानव कल्याणाची बाजू दुर्लक्षिली गेली होती आणि त्यामुळेच धर्मांधतेचे राजकारण आव्हान

म्हणून उभे राहिलेले आहे असेही काहीसे म्हटले जात आहे. यातून बाहेर पाडायचे असेल तर धर्माचा

सकारात्मक उपयोग करून धर्मांध राजकारणाला आव्हान देता येवू शकते असेही काहींचे मत आहे.

जगभरात धर्माचा संकुचित अर्थ लावून धर्मांध, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे धार्मिक कट्टरतावादी

राजकारण जगातील बहुतेक कानाकोपऱ्यात आकारास येत आहे. भारतात आणि नेपाळमध्ये हिंदुत्व,

हिंदूराष्ट्र, सनातन यांच्या माध्यमातून जे धर्मांधतेचे राजकारण खेळले जात आहे. ब्रह्मदेशात हेच बौध्द

राष्ट्रवादाच्या नावाखाली चालू आहे. बांग्लादेशात इस्लामी कट्टरतावादाचे वळण घ्यायला सुरुवात केलेली

दिसते. संपूर्ण दक्षिण आशियाई देशांमध्ये धार्मिक बहुसंख्याकवाद आक्रमक स्वरूप धारण करून

लोकशाहीसमोर अनेक प्रकारचे अडथळेही निर्माण करत आहे. धर्मांध राजकारणामुळे भारताचे सामाजिक,

बौध्दिक, मानसिक आरोग्य खालावत आहे. धार्मिक भावना एवढ्या नाजूक झाल्या आहेत की, त्या

व्यंगचित्र, सोशलमिडिया पोस्ट, कॉमेडी, भाषण यासारख्या कोणत्याही गोष्टींमुळे दुखावल्या जात आहेत.

भारताप्रमाणेच जगभरात धर्माचा आधार घेवून धार्मिक उजव्या शक्ती लोकशाही, मानवी हक्क, लैंगीक

समता आणि उदारमतवाद या सगळ्यांचा मूल्यांना आव्हान उभे करत आहेत अशा काळात धर्माचा

साकल्यांना विचार करण्याची अत्यंत गरज आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. एकोणिसाव्या आणि

विसाव्या शतकात भारतात आणि महाराष्ट्रात गंभीर धर्मचिकित्सा आणि धर्मचर्चा झाली आहे. आज मात्र,

धर्मचर्चा आणि धर्मचिकित्सेचा प्रांत काहीसा शांत आहे. म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हे आधुनिक महाराष्ट्राच्या समाजचिंतन, धर्मचिकित्सेच्या प्रक्रियेचे अपत्य आहेत. सोबतच, त्यांनीही

धर्मचिकित्सेचा भूप्रदेश विस्तारलाही आहे. त्यांचे विचार आजही आपणास या बाबतीत दिशादर्शक आणि

मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून, म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मचिंतन आणि

धर्मचिकित्सेची चर्चा प्रस्तुत लेखात करण्यात येणार आहे.

धर्म : सर्वंकष व्यवस्था

धर्मचिकित्सेच्या बाबतीत म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जास्त मर्मभेदक आणि

छिद्रान्वेशी आहे. धर्म हा माणसांचे नुसते आध्यात्मिक जीवन घडवत नाही तर सामाजिक, आर्थिक,

कौटुंबिक, राजकीय आणि लैंगिक जीवनही नियंत्रित करतो याची दोघांना होती. कारण, भारतीय संदर्भात

धर्माचे अनेक अर्थ होतात. आधुनिकपूर्व काळात महाराष्ट्रात प्रत्येक पुरुषाला तीन धर्मांचे पालन करावे

लागत असे. त्यामध्ये स्वधर्म, जातिधर्म आणि गोतधर्माचा समावेश होता. स्त्रियांसाठी अधिकचे दोन धर्म

होते. त्यामध्ये एक स्त्रीधर्म होता तर दुसरा पतिव्रता धर्म होता. धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथामध्ये पा. वा.

काणेंनी प्राचीन भारतात धर्माचे अनेक अर्थ होत होते याची चर्चा केलेली आहे. धर्म म्हणजे निती, कायदा,

आज्ञा, देव, संपद्राय असे अनेक अर्थही धर्माचे होतात. म्हणूनच, भारतीय संदर्भात धर्म हा संपूर्ण मानवी

जीवन व्यापून टाकतो असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही असे मला वाटते. प्रदीप गोखले यांनीही

मनुस्मृतीविषयी भाष्य करतांना म्हटलेले आहे की, धर्म या शब्दाची चर्चा ही दोन अर्थांच्या संदर्भात

बहुतेकवेळा होते. त्यापैकी पहिला म्हणजे विशेष धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म आणि दुसरा म्हणजे साधारण

धर्म किंवा सामान्य धर्म. सामन्य किंवा साधारण धर्म यामध्ये बंधूधर्म, मित्रधर्म, निसर्गधर्म अशा गोष्टींचा

समावेश होतो. गोखलेंच्या मते, धर्म म्हणाला की विशेषत: वर्णाश्रमधर्मच अपेक्षित राहत असे.

धर्म ही एक नुसती उपासनापध्दती नसून एक मूल्यव्यवस्था आहे. त्यासोबतच, ईश्वर आणि भक्त

यांच्यातील एक सत्तासंबंधही आहे. मंदिर, दान-दक्षिणा, लोकाश्रय आणि राजाश्रय या माध्यमातून एक

अर्थव्यवस्थाही धर्मासोबत विकसित होत असते. स्त्री-पुरुषांमधील आणि पुरुष-पुरुषांमधील संबंधी

धर्मानुसार ठरतात त्यामुळे तिला एक सामाजिक अंगही आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘धार्मिक’

या संकल्पनेमध्ये ‘राजकीय, आर्थिक, सामाजिक’ हे सगळेच एकत्र सामावले जाते. म्हणून, धर्माचा

उपासनापद्धती म्हणून विचार करणे पुरेसे नसून धर्माचा एक व्यवस्था म्हणूनच विचार केला पाहिजे. फुले-

आंबेडकरांना धर्म हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टी नियंत्रित करतो याची जाणीव होती.

त्यामुळेच, त्यांच्या लिखाणात धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक यांना वेगळे करून पाहिले जात

नसून एकत्रितपणेच पाहिले जाते.

फुले- आंबेडकरी धर्मविषयक दृष्टीकोन:

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांच्या आयुष्यात धर्माला अत्यंत महत्वाचे स्थान.

दोघांनी संपूर्ण आयुष्य धर्माची चिकित्सा जरी केली असली तरी त्यांनी धर्माला नाकारलेले नाही. धर्माच्या

माध्यमातूनच एक व्यापक समाजपरिवर्तन होऊ शकते अशी त्यांची समज दिसते. म्हणूनच, व्यापक अर्थाने

फुले आणि आंबेडकर दोन्हीही नास्तिक नसून धार्मिक होते. व्यक्तीचे आणि एकूण समाजाचे कल्याण ज्यात

सामावलेले आहे, अशी जीवनपद्धती म्हणजे धर्म. या व्यापक अर्थाने दोघे धार्मिक होते. मात्र, धर्म म्हणजे

जीवनपद्धतीत विशिष्ट श्रद्धांचा, समजुतींचा, कर्मकांडाचा अटळ म्हणून समावेश केला की,

धर्माची संकुचित, सांप्रदायिक कल्पना तयार होते. अशा संकुचित अर्थाने ते धार्मिक नव्हते.

कारण, फुले आणि आंबेडकर दोघांनी त्यांनी बुद्धीची आणि विवेकाची दारे खुली ठेवली होती.

दोघांच्याही लेखनात ‘धार्मिक’ हे नुसते धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक, राजकीय, लैंगीक असे

सगळेच असते म्हणून त्यांनी धर्माकडे व्यावहारिक दृष्टीकोनातूनही पाहिलेले आहे. धर्माला

समाजाची गरज असते असे त्यांनी स्वीकारलेले जरी असले तरी धर्माच्या आधारे लोकांचे शोषण,

पिडण आणि दमन केले जाते. त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादली जाते याची चर्चा फुल्यांच्या

‘गुलामगिरी’पासून आंबेडकरांच्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ पर्यंत सगळीकडे केली गेलेली दिसते.

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोन्हींच्या सार्वजनिक चर्चांमध्ये नीतीला

अनन्यसाधारण महत्व आहे. समाजाला नैतिक बनवायचे असेल तर धर्माची गरज आहे. तसेच,

धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषणही होते. त्यामुळे धर्माची चिकित्साही केली पाहिजे. लोकांना

पर्यायही उपलब्ध करून दिले. धर्म हा माणसांसाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही असे म्हणत

धर्माचे मानवीकरण करण्याची दोघांची भूमिका दिसते. दोघांच्या धर्मविषयक दृष्टीकोनात बरेच

साम्य जसे आहे. तसेच, काही मुलभूत फरकही आहेत. त्यांची चर्चा केल्याशिवाय आपणास त्यांचे

धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा पूर्णपणे समजू शकत नाही.

धर्मचिकित्सा, सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धार्मिकसोबत धर्मचिकित्सकही आहेत.

दोघांनी कठोर धर्मचिकित्सा केली आहे. त्यांची धर्मचिकित्सा ही एकाचवेळी उपयुक्ततावादी आणि

बुध्दीप्रामाण्यवादी अशी होती. समाजाला काय उपयुक्त आहे आणि बुध्दीला काय पटते याच्या

आधारावर त्यांनी धर्मचिकित्सा केलेली दिसते. मनुग्रंथ जाळून टाका असे म. जोतीराव फुलेंनी

म्हटले आहे. त्यांच्याप्रमाणेच, श्रुती आणि स्मृतींचा धर्म नष्ट करावाच लागेल असे डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी म्हंटले आहे. दोघांनी अशी कठोर भूमिका घेण्याचे कारण, त्यांच्या अभ्यासानुसार

धर्मशास्त्रांमध्ये विवेक आणि नैतिकता नाही. त्यामध्ये पक्षपात आणि भेदभाव आहे.

धर्मशास्त्रांमध्ये येणारा धर्म हा वर्णाश्रम धर्म आहे. त्यामध्ये समानता नाही. बंधुत्व नाही. फक्त

नियम आहेत आणि ते भेदभाव करणारे आहेत ही गोष्ट दोघांना मान्य नाही. दोघांचाही जन्म हिंदू


समाजातील तथाकथित कनिष्ट मानलेल्या जातींमध्ये झालेला असल्यामुळे त्यांनी हिंदू धर्म ग्रंथांची

कठोर चिकित्सा केलेली आहे. कारण, हिंदू समाज वर्तन हे विषम आणि भेद्भावात्मक होते.

धर्मचिकित्सेत बरेच साम्य असले तरी त्या पुढचा प्रवास मात्र दोघांचा काहीसा वेगळा झालेला आहे.

म. जोतीराव फुल्यांनी धर्मांतर न करता नवीन धर्माला ‘सार्वजनिक सत्यधर्म’च्या माध्यमातून नवीन

अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या मते, प्रचलित धर्म सोडून नवीन प्रयत्न फुल्यांनी केला

होता. काहींचे म्हणणे आहे की, फुल्यांनी नवीन धर्मच स्थापन केला. एक मात्र निश्चित आहे की,

प्रचलित धर्मव्यवहार फुल्यांना मान्य नव्हता आणि म्हणून आपण नवीन पर्याय दिले पाहिजे अशी

त्यांची धारणा होती. सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर या दोन मुद्द्यांच्या संदर्भात आपल्या समकालीन वातावरणात

बरीच चर्चा चालू आहे. म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले चिंतन

आजच्या संदर्भातही म्हणूनच महत्वाचे ठरते. म. जोतीराव फुलेंच्या धार्मिक चिंतनातून असे दिसते

की, फुले हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. मात्र, त्यांचा सर्वधर्मसमभाव हा म. गांधींसारखा नव्हता

हेही आपण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. गांधींच्या दृष्टीने सर्व धर्म ही ईश्वराने निर्माण केलेली

आहे. त्यामुळे सगळेच समान आहेत. त्यामुळे धार्मिक भेदभाव करू नये. या प्रकारच्या धार्मिक

चिंतनामुळेच गांधींनी कठोर धर्मचिकित्सा केलेली दिसत नाही. म. जोतीराव फुले एकीकडे सर्व

धर्मांमध्ये सत्य आहे असे म्हणत सर्वसमभाव मानतात मात्र त्याचवेळी कोणत्याच धर्मात पूर्ण सत्य

नाही म्हणून आपण सत्यशोधक बनले पाहिजे असेही म्हणतात. सर्वधर्म समभाव मानत

असल्यामुळे ते धर्मांतरवादी नाहीत मात्र व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार धर्म बदलायचा असेल तर

त्याने तो बदलावा असेही ते म्हणतात. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातच बहुधर्मीय कुटुंबाची चर्चा

आली आहे. ही चर्चा आजच्या काळालाही मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरू शकते. गणपतराव

नामक पात्राने सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात पुढील प्रश्न विचारला आहे. – एकंदर सर्व

जगातील स्त्रीपुरुष मानवांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा? प्रश्नाचे उत्तर देतांना म.

जोतीराव फुल्यांनी अत्यंत मार्मिक आणि प्रबुद्ध करणारे उत्तर दिले आहे. ते म्हणतात कि, “या

भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत, त्या सर्वांत त्या वेळेस

अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काहींना काही सत्य आहे, यास्तव कोणत्याहि कुटुंबातील एका

मानव स्त्रीने बौध्द धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तीने तो धर्म

स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे

पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्यांच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून

तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिनं महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या

पुत्राने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने

सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे; आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत

असतां प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून व्देष करू नये आणि त्या सर्वांनी आपण

सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत,

असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकाशी वर्तन करावे, म्हणजे ते आपल्या सर्वांच्या

निर्माणकर्त्याच्या राज्यांत धन्य होतील.” या बहुधर्मीय कुटुंबाच्या कल्पनेतून त्यांनी

सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर या दोन्ही मुद्यांना स्पर्श केला आहे असे मला वाटते.

म. जोतीराव फुल्यांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मचिंतन केलेले असले तरी ते

मात्र सर्वधर्म समभाव मानत नाहीत. त्यांनी हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाम, ख्रिस्ती, बौध्द अशा विविध

धर्मांची चिकित्सा केली आहे. म्हणून, त्यांना नुसते हिंदूधर्म चिकित्सक म्हणून चालणार नाही तर

त्यांना ‘सर्वधर्मचिकित्सावादी’ म्हटले पाहिजे अशी डॉ. प्रदीप गोखलेंची भूमिका आहे. डॉ.

बाबासाहेब आंबेडकर धर्मचिकित्सावादी असल्यामुळे त्यांचा सर्वधर्मसमभावाला विरोध होता.

कारण सर्वधर्मसमभाव या तत्वामध्ये सर्व धर्मांचा कर्ता एकच आहे फक्त मार्ग वेगवेगळे

आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे सर्व धर्म समान आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे नीट

आचरण करावे. म्हणजेच माणसाने इतर धर्मांबद्दल आदर बाळगावा पण स्वतःचा धर्म सोडू

नये अशी भूमिका सर्वधर्मसमभाव या तत्वामागे आहे. डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा

अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांचा सर्वधर्म सारखे आहेत आणि ईश्वरनिर्मित आहे यावर


विश्वास नव्हता. तसेच, धर्म हा ईश्वरनिर्मित नसून तर मानवनिर्मित आहे अशी त्यांची

भूमिका होती. सर्वधर्मसमभाव हे तत्व नाकारल्यावर धर्मांमध्ये तरतमभाव करता येतो.

त्याआधारेच एखाद्या धर्माचा त्याग, धर्मांतर आणि नव्या धर्माची स्थापना या साऱ्यांचे समर्थन

शक्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरवादी भूमिका घेवून धर्मचिकित्सेच्या माध्यमातून

कोणता धर्म मानवाला सन्मान देवू शकतो आणि कोणता धर्म गुलामी लादतो याचीही चर्चा

केलेली आहे. ‘धर्म’ आणि ‘धम्म’ यांच्या संदर्भात केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची

धर्मचिकित्सा अत्यंत महत्वाची आहे. तसेच, बुध्द आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या

निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘प्रचलित धर्म’ आणि ‘आदर्श धर्म’ या कल्पना मांडल्या

आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचलित धर्म कल्पनेत ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक या

कल्पना आहेत. पोथीनिष्ठा आहे. कर्मकांड आहे. श्रद्धेचे प्राबल्य आहे. माणसाचा ईश्वराशी

असलेला संबंध मुख्य मानला आहे व त्या तुलनेत माणसामाणसांमधील संबंध व त्याला

व्यापणारी निती गौण किंवा उपरी ठरवलेली आहे आणि दुसरीकडे आदर्श धर्म कल्पनेत

अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वर, आत्मा यांसारख्या बुध्दीच्या कसोटीवर न टिकणाऱ्या कल्पनांना

मुळीच स्थान नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाशी जे सुसंगत असेल आणि नितीमूल्यांना ज्यात

स्वयंभू आणि मध्यवर्ती स्थान असेल, ज्यात सामाजिक दु:खावर तोडगा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श धर्माच्या संदर्भात तीन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. १.

धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. २. धर्माने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुलभूत

सिध्दांतांना मान्यता दिली पाहिजे आणि ३. धर्माने दारिद्र्याचे उदात्तीकरण करता कामा नये.

बौध्द धर्माच्या अभ्यासाने डॉ. आंबेडकरांना बौध्द तत्वज्ञानात आदर्श धर्माची तत्वे दिसली

म्हणून त्यांनी जाहीरपणे सार्वजनिक पातळीवर आपल्या अनुयायांसह बौध्द धर्माशी दीक्षा

घेतली आणि बौध्द धर्माचा नवा अर्थ लावला. त्यालाच अलीकडच्या काळात ‘ नवयान

बौध्दधर्म/ आंबेडकरी बौध्दधर्म’ असेही म्हणतात. बौध्द राष्ट्रांमधील काही सनातनी बौध्द

भिखूंनी ‘बुध्द आणि त्याचा धम्म’ या डॉ. आंबेडकरकृत ग्रंथाच्या प्रती जाळल्या होत्या. हिंदू


धर्म आणि बौध्द धर्म यांची तुलना करतांना डॉ. आंबेडकर धर्म आणि धम्म यामध्ये फरक

करतात आणि बुद्धाने सांगितलेला धर्म नसून धम्म असे एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे

बौध्द धर्म हा प्रचलित धर्म नसून आदर्श धर्म आहे असेही म्हणतात. तसेच, बौध्द धम्म आणि

मार्क्सवाद यांची तुलना करतांनाही त्यांनी बौध्द धम्माला त्यांनी धर्मच म्हटले आहे. ही एक

त्यांची विचारातील विसंगती दिसते.

समारोपीय नोंदी

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा याचा

बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, त्यांनी धर्माची सामाजिक, व्यावहारिक, वैज्ञानिक

अशा वेगवेगळ्या पातळीवर चिकित्सा केली ती मानवी जीवन समृध्द करण्यासाठी. धर्माच्या नावावर

होणारे शोषण, दमण यांना त्यांनी विरोध केला आहे. तसेच, नियम आणि कायद्यांनी लादलेला धर्म हा

मानवी जीवनात अडथळे उत्पन्न करत आहे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नांदू देत नाही अशी त्यांनी टीका

केली आहे. म्हणूनच, सार्वजनिक सत्यधर्म आणि बौध्द धर्म यांच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक

व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करून धार्मिक वर्तनव्यवहार बदलण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या नावाने शोषण केले

जात असेल तर धर्माच्या माध्यमातूनच पर्याय देता येवू शकतो आणि मानवी जीवन उन्नत करता येवू शकते

असा संदेश म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. धर्माला मानवकेंद्री आणि

समाजाभिमुख करण्याचे काम त्यांनी केले आहे. यालाच आपण मुक्तीवादी धर्मशास्त्र (Liberation

Theology) म्हणू शकतो. काही दशकांपूर्वी दक्षिण अमेरिकेत धर्मांध राजसत्ता उलथवून टाकण्यामध्ये

तिकडच्या मुक्तीवादी धर्मशास्त्र चळवळींचा मोठा वाटा होता. त्याचीच गरज आज संपूर्ण जगाला आहे.

समकालीन भारतात वाढत्या धर्मांध, धार्मिक संकुचितता आणि धार्मिक कट्टरतेच्या काळात सर्वधर्म

समभाव हा शब्दच बदनाम केला गेला आहे. तसेच, धर्मांतरविरोधी अनेक कायदे आणून लोकांच्या धार्मिक

स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कावर गदा आणला जात आहे. अशावेळी, धर्मचिकित्सा, सर्वधर्मसमभाव आणि

धर्मांतर अशा सगळयांचा वारसा सांगणारा फुले- आंबेडकरांचा धर्माचे मानवीकरण करणारा धार्मिक

मानवतावाद आपणास मार्ग आणि दिशा दाखवू शकतो असे मला ठामपणे वाटते.


पूर्वप्रसिध्दी - मिळून साऱ्याजणी डिसेंबर २०२५ 

गुरुवार, १० जुलै, २०२५

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

 

 

    इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पूस अळम तळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बागायती पिकास धक्का बसला, इतक्यांत बाप वारला. व त्याच्या दिवसामासाला बराच खर्च झाला, यामुळे पहिले वर्षी शेतसारा वारण्यापुरते कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्यास मळा गहाण देऊन रजिस्टर करून दिला. पुढे त्याने मन मानेल तसे, मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्यांचे बच्चे करून माझा बारवेचा मळा आपल्या घशांत सोडला. त्या सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हेन्यूसाहेबांचा दफ्तरदार, चुलता कलेक्टरसाहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुनसफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेऱ्यांत त्यांचे जातवाले ब्राह्मणकामगार अशा सावकारांसोबत वाद घातला असता, तर त्यांच्या सर्व ब्राह्मण आप्तकामगारांनी हस्तेपरहस्ते भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून माझा सर्व उन्हाळा केला असता. त्याचप्रमाणे दुसरे वर्षी घरांतील बायकामुलांच्या अंगावरील किडुकमिडुक शेतसाऱ्यांचे भरीस घालून नंतर पुढे दरवर्षी शेतसारा अदा करण्याकरिता गावांतील गुजर-मारवाडी सावकारांपासून कर्जाऊ रकमा काढिल्या आहेत, त्यांतून कित्येकांनी हल्ली मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत  व ते कज्जे कित्येक वर्षापासून  कोडतांत लोळत पडले आहेत. म्या कधी कधी कामगार व वकिलांचे पदरी आवळण्याकरितां मोठमोठ्याल्या रकमा देऊन, कारकून, चपराशी, लेखक व साक्षीदार यांस भत्ते भरून चिऱ्यामिऱ्या देतां देतां माझ्या नाकास नळ आले आहेत. त्यांतून लांच न खाणारे सरकारी कामगार कोठे कोठे सापडतात. परंतु लाच खाणाऱ्या कामगारांपेक्षा, न लाच खाणारे कामगार फारच निकामी असतात. कारण ते बेपर्वा असल्यामुळे त्यांजवळ गरीब शेतकऱ्यांची दादच लागत नाही व त्यांच्या पुढे पुढे करून जिवलग गड्याचा भाव दाखविणारे हुशार मतलबी वकील, त्यांच्या नावाने आम्हां दुबळ्या शेतकऱ्यांजवळून कुत्र्यासारखे, लांचांचे मागे लांचांचे लचके तोडून खातात आणि तसे ब करावे तर सावकार सांगतील त्याप्रमाणे आपल्या बोडक्यावर त्यांचे हुकुमनामे करून घ्यावेत. यावरून कोणी सावकार आत मला आपल्या दारांपाशी उभे करीत नाहीत!  तेव्हा गतवर्षी लग्न झालेल्या थोरल्या मुलीच्या अंगावरील सर्व दागिने व पितांबर मारवाड्याचे घरी गहाण टाकून पट्टीचे हप्ते वारले. त्यामुळे तिचा सासरा त्या बिचारीस आपल्या घरी नेऊन नांदवित नाही. अरे, मी या अभागी दृष्टाने माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरिता माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केले! आतां मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागाइतांत नवीन मोटा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे उंसाचे बाळगे मोडून हुंडीचीहि तीच अवस्था झाली आहे. मकाही खुरपणीवाचून वाया गेली.  भूस सरून बरेच दिवस झाले. आणि सरभड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नांत घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. शेती खपणारी मुले वस्त्रावाचून इतकी उघड्बंब झाली आहेत की, त्यांना चारचौघात येण्यास शरम वाटते. घरांतील धान्य सरत आल्यामुळे रताळ्याच्या वरूवर निर्वाह चालू आहे. घरांत माझ्या जन्म देणाऱ्या आईच्या मरतेवेळी तिला चांगले चुंगले गोड धोड करून घालण्यापुरता मजजवळ पैसा नाही, याला उपाय तरी मी काय करावा? बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? व्यापारधंदा करावा, तर मला लिहिता वाचता मुळीच येत नाही. आपला देश त्याग करून जर परदेशात जावे, तर मला पोट भरण्यापुरता काहीं हुन्नर ठाऊक नाही. कन्हेरीच्या मुळ्या मी वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशीतरी पोटे भरतील. परंतु माझ्या जन्म देणाऱ्या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटुकल्या लेकरांस अशा वेळी कोण सांभाळील? त्यांनी कोणाच्या दारात उभे रहावे? त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे?”

   एकोणिसाव्या शतकातील एका शेतकऱ्याची ही कहाणी महात्मा जोतीराव फुल्यांनी त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती या शीर्षकाखाली नोंदवली आहे.  महात्मा जोतीराव फुल्यांनी  शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ १८८३ साली प्रकाशित केलेला असला तरी १८७८ पासूनच शेतकऱ्याचा आसूड त्यांनी लिहिण्याचे ठरवले होते असे आपणास ‘मामा परमानंद आणि त्यांचा कालखंड’ या ग्रंथाच्या साह्याने कळते. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये शेतकऱ्याचे कंगालीकरण आणि बकालीकरण कर्जबाजारीपणामुळे कसे झाले आणि त्याला सरकार, सावकार आणि  जातीव्यवस्था कशी जबाबदार आहे याचे विस्तृत वर्णन महात्मा जोतीराव फुल्यांनी केले आहे.  फुले स्वत: शेतकरी होते आणि शेतकऱ्यांमध्ये कामही करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण, पिडण आणि दु:ख त्यांनी जवळून पाहिले होते. तसेच, ज्या ज्या भागात १८७५ साली शेतकऱ्यांनी सावकारांविरोधी दंगे घडवून आणले त्या सगळ्या भागांमध्ये जोतीराव फुल्यांचा वावर होता. म्हणूनच, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये दख्खनमधील शेतकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव आणि सूक्ष्म वर्णन आलेले आहे.  शेतकरी हिंसक का झाले आणि त्यांनी जाळपोळ का केली ? हे समजून घेण्यासाठी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक महत्वाचे आहे कारण त्यातून शेतकऱ्यांचा भावनिक कडेलोट कसा घडून येत होता हे आपणास समजते.  दख्खनचा दंगा घडून गेल्यावर तीन वर्षांनी हे पुस्तक महात्मा  जोतीराव  फुल्यांनी लिहायला घेतले असले तरी दंग्याच्या आठवणी ताज्या होत्या आणि सरकारी पातळीवर दंग्याशी चौकशी चालूच होती. त्यामुळेच, वसाहतकालीन इंग्रजी कागदपत्रांसह शेतकऱ्याचा आसूड सारख्या साहित्यिक कृतीही तेवढ्याच महत्वाचे साधन आहे असे इतिहासकार म्हणून मला वाटते.

 दंग्याची ठिणगी

     १२ मे १८७२ रोजी पुणे जिह्यातील शिरूर तालुक्यामधील सुपे या गावी  बाजाराच्या दिवशी शेतकरी संघटीत झाली.  संघटीत झालेला शेतकरी जमाव हिंसक झाला आणि त्यांनी बाजारातील वाण्यांच्या आणि मारवाड्यांच्या दुकानात लुटालूट करायला सुरुवात केली. तेथील कापडचोपड जळून फस्त होऊ लागले,  ही बातमी ऐकून जिल्हा मेजीस्ट्रेट हे पुण्याहून पायदळ व घोडेस्वार व लष्करी पलटण घेऊन तेथे आले. त्यांच्या प्रयत्नाने रु. ६०००/७००० चा गावांतला माल ज्याचा त्यास परत मिळाला. १०० हून अधिक शेतकरी लष्करी पलटणीने पकडले. ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरली आणि शेतकरी असंतोषाचे लोण हे इंदापूर, पुरंदर, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, बिजापूरपर्यंत पोहचले. पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील खर्डे गावात या आंदोलनाचा विस्फोट झाला कारण तेथील शेतकरी बाबासाहेब देशमुख यांनी दीडशे रुपयांची कर्जफेड न केल्याने सावकाराने त्यांची शेतीवाडी, स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली. बाबासाहेब देशमुख यांच्या सारखीच परिस्थिती दख्खनमधील सर्वच भागात होती आणि याची मूळ सरकारी महसूल धोरण, शेतीचे बदलते स्वरूप आणि दुष्काळाचे सततचे सावट यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली होती.  सुप्यात आणि इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी सावकरांच्या विरोधात जे दंगे केलेत. त्या सर्वांचे सामान्य लक्षण हेच की, ऋणमुक्त होण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी सावकारांजवळील कर्जरोखे, गहाणखते, फरोख्ते, मक्तेपत्रे ही त्यांच्या दप्तरांतून हुडकून काढून त्यांची राखरांगोळी केली; व ज्या सावकारांनी कागदपत्र देण्यात दिरंगाई केली, त्यांचा खर्पूस समाचार घेतला- त्यांचे दस्तऐवजरुपी अस्त्र शतश: ध्वस्त केले, एवढेच नव्हे तर त्यांचे नाककान कापून, त्यांच्या येथे लुटमार केली. 

     शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सावकरांची दप्तरे जाळली. कारण, बहुसंख्य शेतकरी हे अक्षरशत्रू असल्याने सावकार मंडळी कलमकसाई बनून शोषण करत होती. दप्तरातील विविध प्रकारचे कागदपत्रे शेतकऱ्यांनी नष्ट केली. तसेच, काही ठिकाणी नाकेही कापली. नाक कापण्यालाही प्रतीकात्मक अर्थ आहे.  ब्रिटीश सरकारने लष्कराच्या साह्याने लवकरच हे शेतकरी असंतोषाचे लोण आटोक्यात आणले मात्र शेतकऱ्यांच्या दंग्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटीश सरकारला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या.  त्यांची चर्चा करण्यापूर्वी दख्खनचे दंग्यांची पार्श्वभूमी समजून घेवू.

दंग्यांची कारणे

     प्रसिद्ध इतिहासकार रविंदर कुमार यांनी Deccan riots of 1875 असा एक लेख लिहिला आहे. ब्रिटिशांनी मराठ्यांना पराजित करून दख्खन राज्य प्रस्थापित करून आपली धोरणे राबवली. आपली प्रशासन यंत्रणा स्थापन केली आणि आपली न्यायव्यवस्था निर्माण केली यामुळे जे सामाजिक स्थित्यंतर दख्खनमध्ये घडून आले. त्या सामाजिक स्थित्यंतराने ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण केला. गावगाड्यातील सामाजिक देवाणघेवाण आणि परस्परावलंबन नवीन रचनेने मोडून काढले. तसेच, सामुहीकतेपेक्षा व्यक्तिगता महत्वाची बनली. यामुळेच, गावातील सामाजिक संबंध बिघडले आणि कुणबी आणि वाणी  म्हणजेच शेतकरी आणि सावकार तणाव निर्माण झाला. नवीन निर्माण झालेल्या न्यायव्यवस्थेमुळे हा तणाव अधिक वाढला अशी मांडणी रविंदर कुमार यांनी केली आहे.  दख्खनचे दंगे तात्कालिक जरी वाटत असले तरी त्यामागे मोठी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रक्रिया होती असे त्यांनी दाखवून दिले आहे.

     दीर्घकालीन प्रक्रियांसोबत काही जागतिक ( अमेरिकन यादवी युद्ध आणि स्थानिक ( दुष्काळ) संदर्भही दख्खनच्या दंग्यांना होते. १८६० मध्ये अमेरिकेतील यादवी युद्धामुळे शेतीमालाच्या किमती वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची पत वाढली सावकार शेतकऱ्यांना सढळ हाताने कर्ज देऊ लागले. परिणामत: शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजाही वाढला.या तेजीच्या पार्श्वभूमीवर सरकराने जादा दराने शेतसारा आकारणी केली. १८७२-७३ साली युद्ध संपल्यावर शेतमालाच्या किंमती घसरल्या आणि एकूणच अर्थकारणच पालटले. १८७०-७४ च्या मंदीच्या काळात शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेऊन सारा भरण्याची वेळ आली. कर्जबाजारी शेतकरी सावकारास पीक विकण्यास बांधलेला असायचा पण किंमती कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा न आल्याने सावकारांचे कर्ज फिटेना. तशाच सावकारांना कर्जवसुलीसाठी सरकारी न्यायालयाचे पाठबळ लाभल्याने त्यांनी शेतकऱ्यांवर जप्तीचे प्रसंग आणले. कर्जबाजारी शेतकऱ्यांना सावकारी जाच वाढला. त्यांच्या जमिनी, गुरेढोरे, पिकांवर जप्ती आल्याने तो कंगाल बाणाल. जमिनी सावकारांकडे गेल्याने स्वतःचीच जमीन खंडकरी बनून कसण्याची वेळ आली. बऱ्याच शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची पाळी आली. दुष्काळामुळे ही स्थिती आणखीच बिघडली आणि शेतकऱ्यांचा असंतोष वाढत गेला आणि  वर चर्चिल्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंसक घटना घडल्या.

    १८७० मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेच्या वतीने सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने डिसेंबर १८७२ मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची सांपत्तिकदृष्ट्या पहाणी करण्याचा ठराव केला व लगेच त्याप्रमाणे कामास सुरुवातही झाली. सन १८७३ साली सभेने आपली पहाणी करून तिचा रिपोर्ट पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. ह्या रिपोर्टात अहमदनगर, सोलापूर वगैरे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या हृदयद्रावक स्थितीचे वर्णन असून, त्यावर काय उपाय योजने आवश्यक आहेत इत्यादि गोष्टींचा उपहापोह केला होता. सार्वजनिक सभेप्रमाणेच गोपाल नरसिंह देशमुख, या इंदापूरमधील वतनदाराने अडीच हजार शेतकऱ्यांच्या वतीने आपले प्रतिनिधी मुंबई सरकारकडे पाठवले होते. सरकार आणि सावकार हे आमचे हक्क हिसकावून घेत आहेत आणि आमची स्थिती गुलामासारखी बनवली जात आहे अशी त्यांची मुख्य तक्रार होती. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेळेत लक्ष वेधले नाही म्हणून दख्खनचे दंगे घडले असेही आपण म्हणू शकतो.

 दख्खन दंगा चौकशी आयोग

     ब्रिटीश सरकारने दंगा शमवून टाकला मात्र शेतकरी हिंसक का झाले, शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे, ती बिघडण्याचे कारण कोणते आहे, ती सुधारण्यास कशाची जरूर आहे, या प्रश्नांचा विचार करण्याकरिता सरकारने एक कमिशन (१८७६)  नेमिले. त्यांत मुंबई इलाख्यातील एक न्यायाधीश, वायव्य प्रांतातील तीन दोन जमाबंदी कामदार व मुंबई इलाख्यातील दोन जमाबंदी कामदार असे पाच कमिशनर होते... (त्यांनी) असे सिद्ध केले की, अशिक्षित शेतकऱ्यास सरकारचा डोईजड सारा, धान्यास चांगला दर येण्यापूर्वीच नुकसान सोसून ते विकून किंवा सावकाराच्या जाळ्यात सापडून, भरावा लागतो. रयतवारी पद्धतीप्रमाणे सरकार हेच खोत किंवा जमीनदार असल्यामुळे, सरकारास सावकारांपासून रयतेचे कल्याण करणे असल्यास, सरकारनेच रयतेस स्वस्त व्याजाच्या दराने रक्कम कर्जाऊ देऊन, रयतेची अडचण दूर करावी. सरकारने रयतेच्या पाठीवर मारावे. सरकारने रयतेच्या पोटावर मारू नये. सावकाराप्रमाणे, सरकार हे खोटी खते, हिशोबातील खेंचाखेंची इत्यादी अनिष्ट प्रकार करून, रयतेस फसविणार नाही. सबब, सरकारने प्राथमिक शिक्षण आणि पोस्टल सेव्हिंग्ज बँक यांचा सर्वत्र प्रसार करावे अशी भूमिका आयोगाने घेतली. 

     दख्खन दंगा चौकशी आयोगासोबतच, तत्काळ शेतकऱ्यांचे दु:ख निवारण करण्यासाठी तीन उपाय निघाले होते असे अर्वाचीन महराष्ट्र (१९१४) या ग्रंथाचे लेखक जगन्नाथ रावजी टुल्लू यांनी म्हटले आहे. ते लिहितात की,  “एक उपाय असा की, सरकारने आपल्या ‘पब्लिक वर्क्स खात्या’मार्फत दुष्काळपिडीतांकरिता कामे काढावीत; मात्र धान्याचा भाव रुपयास १४ शेर व ३२ शेर असतां जो दोन आणे मजुरीचा दर होता. तो प्रस्तुत दुष्काळाच्या दिवसांत तीन आणे करण्यात येऊन, त्यापैकी अर्धा रोख व अर्धा ऐन जिनसा देण्यात यावा. दुसरा उपाय असा की, शिजविलेले व कोरे अन्न यांचा धर्मादाय व्हावा. यांत लोकांनी व सरकारने एक विचार करून झटले पाहिजे. प्रत्येक तालुक्यांत असे हजारो लोक असतात की, त्यांस दुष्काळाच्या कामांवर जाण्यात कमीपणा वाटतो. त्यांना राजाच्या किंवा प्रजेच्या अन्नसत्राने पोषिले पाहिजे; मात्र अशा संस्था सरकारी स्थानिक अधिकारांच्या प्रेरणेने निघून, लोकाचार व आरोग्य यांकडे लक्ष्य ठेविता येण्याकरिता, त्यांतील व्यवस्था लोकांकडे असावी. जे थोडे लोक नेमस्त दराने धान्य घेण्यासारखे असतील, त्यांच्याकरिता, खासगी वर्गणी, म्युनिसिपॉलितीची  मदत किंवा सरकारचा हातभार यांच्या अवश्य त्या हमीवर धान्याची दुकाने काढावीत, तिसरा व शेवटचा उपाय असा की, देशावरील दुष्काळपिडीत भागांतील गुराढोरांना कोकणपट्टीत आणून, तेथे त्यांच्या वैरणाची सोय केली पाहिजे.”

सार्वजनिक सभेचे कार्य

     सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती रानडे हे दख्खन दंग्यांच्या आधीपासूनच शेती आणि शेतकरी स्थिती याविषयी काम करत होते. सरकारला त्याविषयी कळवत होते याची आपण वर चर्चा केली आहे.  दंग्यांच्या नंतर सार्वजनिक सभेने चौकशी करून सरकारकडे अर्ज पाठवला आणि त्यात सदरील दंग्यास सरकारच कसे जबबदार आहे निदर्शनास आणून दिले होते. सोबतच, दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती झाली होती. सार्वजनिक सभेने दुष्काळाचे स्वरूप जाणून घेऊन सरकारकडे पत्रव्यवहार केला. तसेच, दुष्काळ फंड जमवून ठिकठिकाणी दुष्काळ कमिट्या नेमल्या. एवढेच नव्हे तर परदेशी लोकांचेही लक्ष भारतातील दुष्काळाकडे वेधावे  व त्यांनी दुष्काळ ग्रंथांना मदत करावी म्हणून परदेशी वृत्तपत्रात जाहिराती देऊन फंड जमविण्याची खटपट केली.

     सार्वजनिक काकांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून अतोनात मेहनत घेतली. शेतकऱ्यांस शिक्षण मिळावे, शेतकी शिक्षणाचे वर्ग जागोजाग काढून ते हायस्कुलांसही जोडावे, शेतकऱ्यांस कर्ज देण्यासाठी पेढ्या काढाव्यात, आणि रोखे कागद कसेही असले तरी शेतकऱ्यांवर फिर्याद झाली असतात न्यायाधीशाने शेतकऱ्यांच्या वतीने कसोशीने सर्व व्यवहार पहावा आणि निकाल द्यावा; अशा प्रकारचे सवलतीचे कायदे करावे म्हणून त्यांनी खटपट केली.

 शेतकऱ्यांच्या दु:ख निवारणार्थ कायदा (१८७९)

      दख्खन दंग्यांचा अभ्यास झाल्यावर सरकारास याची जाणीव झाली की, बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिन या सावकारांकडे तारण आहेत. उत्पन्नाची अन्य स्त्रोत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली आहे. तसेच, पुन्हा शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये म्हणून  सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डेक्कन अॅग्रिकल्चरिस्ट रिलीफ अॅक्ट पास करण्यात आला. यालाच शेतकऱ्यांच्या दु:ख निवारणार्थ कायदा असेही म्हटले गेले. या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी सावकाराला जी खते लिहून द्यावयाची, ती सरकारसमक्ष लिहून, त्यांनी ती नोंदवून घेतली पाहिजेत; रकमांच्या पावत्या सावकरांनी शेतकऱ्यास दिल्या पाहिजेत; शेतकरी मागतील, तेंव्हा सावकारांनी हिशोब दाखविले पाहिजेत; त्यांच्या नकला त्यांस दिल्या पाहिजेत; शेतकऱ्यांवर जप्ती आणण्याच्या हक्कांवर मर्यादा घालण्यात आली. प्रतिवादीच्या गैर हाजिरीवरून, न्यायालयाने एकतर्फी हुकूमनामा देऊ नये; तसेच, कर्जफेडीचे संबंधीचे वाद मिटविण्यासाठी थेट न्यायालयात जाण्यापूर्वी परस्परांच्या तक्रारीतून मार्ग काढता यावा यासाठी लोकपाल वा मानद मुन्सफ नेमण्याची तरतूद करण्यात आली. सावकारांस चक्रवाढ व्याज आकारता येणार नाही.  ‘दामदुप्पट’किंवा मुद्दलाहून अधिक व्याज घेता येत नाही असा कडक नियम बनवला.

      सरकारनेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे किंवा त्यासाठी बँक्स काढव्यात ही मागणी मात्र वरील कायदा करतांना मान्य केली  नाही. सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज ही मंडळी शेतकऱ्यांची जर कर्जबाजजारीपणातून मुक्ती करायची असेल तर शेतकरी पेढ्या स्थापन झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेत होते. सत्यशोधकांनी तर ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका बोलावून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी मोठे काम केले आहे. दख्खन दंगा चौकशी अहवालानेही शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जे द्यावीत अशी भूमिका घेतली होती.

सहकार चळवळीची निर्मिती

    सहकार चळवळीची सुरुवात १९०४ च्या कायद्यानुसार जरी झाली असली तरी तिचे मुळे ही एकोणिसाव्या शतकातील कर्जबाजारीपणा, दारिद्र्य, शोषण आणि हिंसा यामध्ये आहेत. डेक्कन अॅग्रिकल्चरिस्ट रिलीफ अॅक्ट (१८७९) पास झाला त्यानंतर लँड इम्प्रोव्हमेंट अॅक्ट ( १८८३), लँड अलिएनेशन अॅक्ट (१९००)  असे कायदे पास झालेत. या सगळ्या कायद्यांनी सहकार चळवळीचा मार्ग सुकर केला आणि म्हणूनच १९०४ मध्ये को. ओपरेटीव्ह सोसायटी अॅक्ट पास झाला. म्हणूनच, दख्खनच्या दंग्यांनी सहकार चळवळीच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार केली असे आपण नक्कीच म्हणू शकतो. सहकार चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक नवी पहाट उजाडली. सहकार चळवळीच्या विस्तारामुळे सावकारशाहीला पायबंद घातला गेला.

       सहकार चळवळीच्या मागील शंभर वर्षांचा इतिहास पहिला तर आपणास स्पष्टपणे दिसते की, सहकार चळवळीने शेतकरी जीवनमान सुधारण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. आज सहकार चळवळीचा प्रदेश आखूड होत आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर ( संसदेतील शेतकरी कायद्यांच्या निमित्ताने) आलेले आहेत अशा स्थितीत दीडशे वर्षांपूर्वी दख्खन दंग्यांने दिलेला सामाजिक धडा आजही लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे वाटते.

 

संदर्भ

१.      जोतीराव फुले, शेतकऱ्याचा आसूड,  कीर, मालशे, फडके (संपा.) महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००६

२.      अर्वाचीन महाराष्ट्र – जगन्नाथ रावजी टुल्लू, चित्रशाळा प्रेस, पुणे, १९१४

३.      रामचंद्र गणेश बोरवणकर, महराष्ट्र चैतन्य गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे संक्षिप्त चरित्र, , लेखकच प्रकाशक आहे, ठाणे, १९२४,

४.      रमेश नारायण वरखेडे, महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास- खंड १,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई , २०१८

५.      रविंदर कुमार, ‘Deccan riots of 1875’, link https://www.jstor.org/stable/2051108

६.      Nikolay Kamenov, The Place of the “Cooperative” in the Agrarian History of India, c. 1900–1970, The Journal of Asian Studies page 1 of 26, 2019. doi:10.1017/S002191181900055X

 


पूर्वप्रसिद्धी - बीबीसी मराठी 

 

 

 

 

पुरोगामी कोणास म्हणावे? मराठी विचारविश्वातील काही नोंदी

पुरोगामी कोण आहे? १९४१ मध्ये पुरोगामी वाड्मय म्हणजे काय? याविषयी आचार्य जावडेकरांनी मुंबईमध्ये भाषण दिले होते. त्या भाषणाची चिकित्सा ना. सी....