शाळेत असतांना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला एकविसावे शतक हे विज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जात होते. शाळेत आणि महाविद्यालयात या विषयावर व्याख्याने आणि वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जात होत्या. अलीकडे मला मात्र हे शतक विज्ञानाचे नसून अज्ञानाचे आहे असे आवर्जून वाटत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा नुसता प्रसार झाला नसून तर त्याचा स्फोट झाला आहे. नदीला पूर येतो त्याप्रमाणे माहितीचा महापूर दररोज लोकांच्या टीव्हीवर, मोबाईलवर येतो आहे. आलेली माहिती खरी आहे की, खोटी आहे? हे समजून घेण्यासाठी जी विवेकबुध्दी, चौकसबुध्दी आणि चिकित्सकबुध्दी माणसाला पाहिजे तिचा मात्र मोठा अभाव दिसतो. त्यामुळेच खोटी माहिती, फसवी माहिती आणि बनावट माहिती सहज पसरवली जाते. या सगळ्या प्रकारच्या माहितीतून अज्ञानाचा प्रसार होतो म्हणूनच मला एकविसावे शतक हे अज्ञानाचे शकत वाटते. समाजात अनेक प्रकारच्या अज्ञानाचा प्रसार केला जातो. त्यापैकी तीन मुद्द्यांची मी प्रस्तुत लेखात चर्चा करणार आहे. ही सगळी चर्चा माझ्या अनुभवावर आणि निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे कदाचित त्याला काही मर्यादा येऊही शकतात. कारण, जीवनानुभव (Lived Experience) महत्वाचा असला तरी प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यामुळेच माझाच अनुभव हा अस्सल आणि इतरांचा कमअस्सल असा दावा मी करणार नाही.
मुद्दा क्रं. १- क्वीर रंगबेरंगी दुनियचे तानेबाने
काही वर्षांपूर्वी माझ्या एका लेस्बिअन
विद्यार्थिनीने एकदा मला सांगितले होते की, “ आपल्याला जेवढे
माहिती आहे त्यापेक्षा जग जास्त क्विअर आहे." दुसरी एक विद्यार्थीनी वर्गात चर्चा करतांना म्हणाली की, “भविष्यात सगळेच
लोक bisexual होतील.” विद्यार्थिनीच्या या दोन्ही मुद्द्यांनी मला बराच विचार
करायला लावला आणि त्यातून मला बरेच शिकताही आले. जवळपास दहा वर्षांपूर्वी
समलैंगिकता किंवा भिन्न लैंगीक ओळख असणाऱ्या लोकांविषयी बोलले तर होते मात्र
त्याला म्हणावी तशी प्रसिध्दी मिळत नव्हती. तसेच, भिन्न लैंगिकता असलेल्या
समूहांविषयी म्हणावी तशी माहिती समाजाला नव्हती. त्यामुळे काही साचेबध्द धारणा
पसरल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षांमध्ये बराच बदल होतांना दिसत आहे. अनेक
शहरांमध्ये सन्मान यात्रा (प्राईड परेड) काढल्या जात आहेत. त्यामध्ये भिन्न लैंगीक
ओळख नसलेले लोकही सहभागी होत आहेत. भिन्न लैंगीक ओळख असलेल्या मुला-मुलींच्या
पालकांच्या दृष्टीकोनातही काहीसा बदल होतांना दिसत आहे. शासन- प्रशासन यांच्या
पातळीवरही भिन्न लैंगीक ओळख असलेल्या समूहांची दखल घेतली जात आहे. त्यामुळेच,
महाराष्ट्र निडवणूक आयोग, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांनी भिन्न लैंगीक
ओळख असलेल्या आणि पारलिंगी लोकांसोबत कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, चित्रपट
आणि साहित्यामध्येही भिन्न लैंगीक ओळख आणि आवड असलेल्या लोकांचे चित्रण होत आहे. मागील
दशकभरात सामाजिक चर्चाविश्व जसं बदलत गेलं. त्याचप्रमाणे माझी याविषयीची भूमिका
सुद्धा बदलत गेली आहे. दहा वर्षांपूर्वी भिन्न लैंगिक ओळख असलेल्या क्वीर
लोकांच्या हक्कांच्या बाजूने तू आहेस का? असा मला कोणी प्रश्न केला असता तर तेव्हाही न संकोचता मी
त्यांच्या बाजूचा आहे असेच म्हटले असते. मात्र, तू क्वीर
आहेस का? असं कोणी म्हणालं असत तर मी नाही म्हणालो असतो.
कारण, त्यावेळी माझे लैंगिक नीतीमत्तेचे बद्दलचे आकलन हे चौकटबद्ध आणि साचेबद्ध होते असे मला अलीकडे
जाणवते. मागील दहा वर्षांच्या लैंगिकता, क्वीर, जेंडर,
स्त्री-पुरुषमैत्री यांच्या अभ्यासाने मात्र त्यामध्ये बराच बदल झाला आहे. बहुतेक
सगळेच लोक कमी अधिक प्रमाणात क्वीर असतात. काही प्रत्यक्ष आचरण करतात, काहींना ते
शक्य होत नाही म्हणून फक्त कल्पनाविश्वात रमतात. क्वीर असणं म्हणजे बहुरंगी असणं,
काळ्या-पांढऱ्यात न अडकणं, बायरनीच्या पलीकडच्या पलिकडे जाणे
असेल, अनेकवचनी असणं असेल तर मीही
समलैंगिक पुरुष नसतांनाही क्वीर आहे असे मी अलीकडे ठामपणे म्हणू शकतो. काही
वर्षांपूर्वी पुरुष उवाच च्या दिवाळी अंकामध्ये ‘मी वाममार्गी पुरुष आहे’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. आताच्या माझ्या ‘क्वीर चिंतना’त तो लेख
चपखलपणे बसतो आहे. क्वीर समूहांतील
मंडळींच्या संदर्भात बहुतेकवेळा लैंगिक (sexual) चर्चा अधिक
केल्या जातात. लैंगिक मुद्यांच्यासोबतच सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असेही अनेक प्रश्न
भिन्न लैंगिक ओळख असलेल्या क्वीर लोकांचे आयुष्य घडवत असतात. या मुद्द्याची खाली
काहीशी चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.
अलीकडेच
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये समलैंगिकता हा विषय हाताळला जात आहे. हे सगळे
एकीकडे होते आहे मात्र त्यासोबतच दुसरीकडे भिन्न लैंगीक ओळख असलेल्या क्वीर
लोकांमधील तानेबानेही जगजाहीर होवू लागले आहेत. तथाकथित प्रस्थापित समाजापासून
क्वीर/भिन्न लैंगीक ओळख असलेला समूह वेगळा असला तरी तो एकसाची नाही त्यातही अनेक
प्रकारचे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना एकाच मापात मोजणे योग्य होणार नाही हे
अलीकडे ठळकपणे दिसून येत आहे. दलित आणि मुस्लीम समलैंगीक पुरुषांना समलैंगिक
पुरुषांच्या वर्तुळात वगळले जाण्याच्या बरेच उदाहरणे आहेत. तसेच, समलैंगिक
स्त्रिया आणि समलैंगिक पुरुष यांच्यातही काहीशी ताणतणाव दिसतात. बरेच समलैंगिक लोक
हे उभयलिंगी (bisexual) लोकांकडे
साशंकपणे पाहतात असेही उभयलिंगी लोकांनी म्हटलेले दिसते. लैंगीक कलासोबतच संस्कृती
आणि धर्म यावरूनही क्वीर लोकांमध्ये तणाव असल्याचा दिसून येतो. भिन्न लैंगीक ओळख
असलेल्या समूहांमध्ये महत्वाचा असलेला पारलिंगी समूह. त्याला हिजडा म्हणूनही
पारंपारिकपणे ओळखले जाते. त्यांची संस्कृती ही संमिश्र स्वरुपाची होती. हिंदू
धर्मीय देवता आणि इस्लामधर्मीय परंपरा अशा एकत्रितपणे या समूहामध्ये पाळल्या जात
होत्या. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पारलिंगी/हिजडा समूहाचे ‘हिंदुत्वीकरण’
करण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो. अलीकडेच, भाजपने पुण्यात
केलेल्या काही आंदोलनांमध्ये पारलिंगी/ हिजडा समुहातील काही लोकांचा सहभाग दिसून
आला आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मी त्रिपाठी यांनी कुंभमेळा मध्ये स्वतःचा आखाडा
स्थापन केला होता. त्या आखाड्यात नंतर अनेक वादही झाले आहेत. हे सगळे इथे
नोंदवण्याचे कारण म्हणजे अलीकडच्या काळात पारलिंगी/हिजडा समूहाचे होणारे
हिंदुत्वीकरण.
पारलिंगी/हिजडा समूहाच्या हिंदुत्वीकरणासोबतच इतर भिन्न लैंगीक ओळख
असलेल्या मंडळींचे हिंदुत्ववादी राजकारणात सहभाग वाढला आहे असे अलीकडे दिसून येत
आहे. दीर्घकाळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक
संघांची भूमिका ही भिन्न लैंगिक ओळख असलेल्या लोकांच्या विरुद्ध होती. मात्र
अलीकडे त्यांच्या या समूहासंदर्भातील धोरण आणि डावपेच बदललेले दिसतात. असे असले
तरीही, अजूनही मोठ्या हिंदुत्ववादी वर्तुळात याविषयी स्पष्टता नाही. कारण, एकीकडे
समलैंगिकता ही विकृत्ती आहे. ती पाश्यामात्य संस्कृतीची अपत्य आहे. तिच्यामुळे
भारतीय संस्कृती भ्रष्ट आणि खराब होत आहे असे म्हटले जाते. दुसरीकडे, भारतीय
संस्कृतीत तृत्तीय प्रकृती आहे. आम्ही कधीही समलैंगिक समूहाला वगळे नव्हते.
मुस्लीम आणि ख्रिस्ती लोक इकडे आले आणि त्यांनी तसे करायला सुरुवात केली असेही
म्हणतात. त्यामुळे हिंदुत्ववादी वर्तुळात यावरून बराच लैंगीक गोंधळ आहे असेच
म्हणावे लागेल. तथाकथित पुरोगामी मंडळीही, हिंदुत्ववादी लोकांपेक्षा खूप काही
वेगळी नाही असेच दिसते. कारण, सामाजिक – धार्मिक बाबतीत पुरोगामी असलेली यातील
बरीच मंडळी लैंगीक बाबतीत सनातनी आणि परंपरावादीच आहेत असे अनेक उदाहरणावरून दिसून
येते. उदाहरणार्थ – संघाच्या लोकांची टीका करतांना अनेक तथाकथित पुरोगामी लोक ‘संघ
हा समलैंगिक लोकांची संघटना आहे.’ असे म्हणतो. यातून आम्ही संघाची चिकित्सा करतो
असे त्यांना वाटत असले तरी ते लैंगीक बाबतीत किती सनातनी आहेत हे ते दाखवत असतात.
अलीकडच्या अनेक वैज्ञानिक संशोधनांनी दाखवून दिले आहे की, समलैंगिक संबंध
हे नैसर्गिक आहेत. भारतात तर या संदर्भात अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. बऱ्याच
पुस्तकांमध्ये आणि लेण्या, मंदिरे यांच्यावरील मैथुनशिल्पांमध्ये समलैंगिक
कामक्रीडा दाखवल्या आहेत. मात्र, अजूनही, आपली लैंगीक नितीमत्ता ही सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संकुचित राहिलेली
दिसते. कारण, त्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या लैंगीक ओळखींचा, लैंगिक
वर्तनव्यवहारांचा आणि लैंगीक कल असलेल्या मंडळींचा समावेश केलेलाच नाही.
मुद्दा क्रं.२- वैचारिक साम्राज्यवाद आणि मनाचे निर्वसाहतीकरण
मागच्या
पाच-सहा वर्षात आपल्या देशात निर्वसाहतीकरण (decolonization) या संकल्पनेची वर्तमानपत्रांपासून सरकारी प्रचारयंत्रणेपर्यंत आणि
टिव्हीकार्यक्रमापासून ते साहित्य चर्चांपर्यंत चर्चा होतांना दिसत आहे. हल्लीचे
सरकार रस्त्यांचे, वास्तूंचे, योजनांचे आणि कायद्यांचे नावे बदलून आम्ही
निर्वसाहतीकरण करत आहोत असा प्रचार करत आहेत. मात्र, निर्वसाहतीकरण या संकल्पनेचा
मूळ अर्थ काही समजून घेत नाही असेच दिसत आहे. पूर्वीच्या साम्राज्यवादी लोकांचे
बदनामीकरण करून स्वत:च्या देशाचे गौरवीकरण करणे या निर्वसाहतीकरण म्हणत नाहीत.
त्याला जास्तीत जास्तीत राष्ट्रवादीकरण करण आपण म्हणू शकतो. राष्ट्रवाद आणि
निर्वसाहतवाद यामध्ये गुणात्मक आणि मूल्यात्मक फरक आहे. अलीकडच्या काळात आपल्या
देशात आणि इतर देशांमध्येही निर्वसाहतीकरणाच्या नावाखाली संकुचित राष्ट्रवादी
भूमिका घेवून वसाहतवाद काळात निर्माण झालेल्या गोष्टींचे पुनरुत्पादन केले जात
आहे. वसाहतवादाचे संपूर्ण तत्वज्ञान हे मनिचीयन तर्कावर आधारित होते. त्यामध्ये
समाजाची दोन कप्यांमध्ये विभागणी केली जात होती. वसाहतवादी सरकार आणि त्यांचे लोक
हे सुसंस्कृत, चांगले आणि उर्वरित जनता वाईट, असंस्कृत अशी विभागणी असायची.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादाच्या नावाखाली सुध्दा समाजामध्ये अशीच कप्पेबंद
विभागणी केली जात आहे. जो सरकारशी सहमत आहे, जो सरकारच्या बाजूचा आहे. तो
राष्ट्रवादी, चांगला आणि राष्ट्रहित जोपासणारा. याउलट जे सरकारशी सहमत नाहीत,
सरकारशी मतभेद नोंदवतात किंवा सरकारवर टीका करतात. ते वाईट, देशद्रोही असेच म्हटले जाते. यावरून आपणास स्पष्टपणे
दिसून येईन की, जसे वसाहतवादी राजवटीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना बदनाम
केले जात होते तसेच, अलीकडच्या काळात कट्टर राष्ट्रवादी म्हणून घेणारे जगभरातील
सरकारे आणि त्यांची भक्त- अनुयायी मंडळी ही विरोधकांना बदनाम करतात. एका अर्थाने,
समाजाला कप्पेबंद करण्याचा वसाहतवादी कित्ता राष्ट्रवादी सरकारे उत्तरवासाहतिक
काळात गिरवत आहेत. म्हणूनच, निर्वसाहतीकरणाची सखोल आणि चिकित्सक चर्चा करणे अत्यंत
महत्वाचे आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही बराच काळ, माझी विचार करण्याची पद्धत
ही कप्पेबंद स्वरुपाची होती. साचेबद्ध पद्धतीने विचार करत असल्यामुळे त्यामध्ये
अनेक प्रकारचे पूर्वग्रह होते. मागील पाच- सहा वर्षांत निर्वसाहतीकरणविषयक लिखाण
वाचून समजून घेतल्यामुळे त्यातून काहीसा मुक्त होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.
अलीकडे मला असेही वाटते कि, “थिंकिंग चे नुसते रीथिंकिंग करून चालणार नाही तर
काहीवेळा आपल्याला थिकिंगचे अनथिकिंग सुद्धा करावे लागते.” म्हणजे एका बाजूचा
दुसऱ्या बाजूने विचार करू नये असे नसून तर आपल्याला ठरवून दिलेल्या कोणत्याही
बाजूने विचार नये. उदा. मुसलमान वाईट आहे असे कोणी म्हटले कि, आपण मुसलमान चांगले आहेत असे
म्हणतो. त्यातून आपल्याला वाटते कि, आपण त्यांचा मुद्दा खोडून काढत आहोत. मात्र, मुसलमानांना केंद्रस्थानी ठेवून
चर्चा घडवून आणण्यात त्यांचा फायदा आहे हे आपण ओळखतच नाही. याचाच अर्थ असाही आहे
कि, त्यांनी ठरवून
दिलेल्या मुद्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपणच आपले मुद्दे ठरवले पाहिजेत. हे
सगळे वैचारिक दास्यत्वाच्या चौकटी मोडल्याशिवाय होणार नाही असे माझे अनुभवांती मत
बनले आहे.
सय्यद हुसैन अलातास या मलेशियन
समाजशास्त्रज्ञाने ‘ वैचारिक साम्राज्यवाद’ अशी संकल्पना विकसित केली आहे.
त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे दाखवून दिले आहे की, वसाहतवाद हा फक्त राजकीय
साम्राज्यवाद किंवा आर्थिक साम्राज्यनव्हता तर तो एक वैचारिक साम्राज्यवादही होता.
साम्राज्यवादाची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. ते
पुढीलप्रमाणे – १. शोषण- सत्तेच्या माध्यमातून लोकांचे शोषण केले जाते आणि त्यांना
नियंत्रित केले जाते. २. एक पालकत्वाची व्यवस्था- साम्राज्यवादी व्यवस्थेत
सत्ताधारी हे पालकाच्या भूमिकेत असतात आणि त्या पद्धतीने ते आपले वर्चस्व वासाहतिक
समाजावर लादत असतात. ते काही गोष्टी
शिकवतात, ते काही गोष्टी करायला सांगतात.
वासाहतिक सत्तेने निर्माण केलेल्या गोष्टींशी ते बांधील असतात. ३. जुळवून घेणे-
वासाहतिक सत्ता अशी अपेक्षा ठेवते की, वासाहतिक समाजातील
लोकांनी वासाहतिक सत्ताधीशांच्या जीवन, संरचना आणि नियम याच्याशी जुळवून घेतले पाहिजे. ४. वासाहतिक
सत्तेच्या संरचनेत वासाहतिक लोकांनी दुय्यमत्व स्वीकारले पाहिजे. ५.
साम्राज्यवादाचे नैतिक अधिमान्यता- यामध्ये वसाहतवादी लोकांकडून साम्राज्यवाद हा
कसा वासाहतिक लोकांच्या हितासाठी, त्यांना संस्कारी करण्यासाठी
आणि त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक होता असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. ६.
साम्राज्यवादी सत्ताधीश- वासाहतिक समाजांमध्ये अधिकारी म्हणून अनकेदा निकृष्ट
दर्जाचे अधिकारी पाठवले जात होते. या संदर्भात सय्यद हुसैन अलातास म्हणतात की,
एकदा एक वासाहतिक अधिकारी म्हटला होता की, वसाहतींमध्ये
जे लोक अधिकारी म्हणून येतात ते इंग्लंडमधील ब्रिटीश समाजातील उत्कृष्ट लोक नसतात.
ज्यांना इंग्लंडमध्ये नोकरी मिळत नाही ते लोक नोकरी करण्यासाठी वसाहतींमध्ये
येतात. ही वरील सहा साम्राज्यवादाची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यातूनच, आपल्याला स्पष्टपणे दिसते की, साम्राज्यवाद हा नुसता
राजकीय, आर्थिक आणि सामाजिक नाहीये तर वैचारिकही आहे.
वैचारिक साम्राज्यवाद म्हणजे काही लोकांचा दुसऱ्यांच्या विचारविश्वावर वर्चस्व
असणे. म्हणूनच, वैचारिक साम्राज्यवाद हा साम्राज्यवादाचा थेट
परिणाम आहे.
साम्राज्यवादी
राजकीय व्यवस्थेत वासाहतिक समाजातील एक मोठा समूह असा असतो की, जो साम्राज्यवादी सत्तेचे श्रेष्ठत्व
स्वीकारत असतो. त्यांना असे वाटते की, पश्चिमीकडूनच योग्य
ज्ञान येवू शकते, त्यांच्याकडेच चांगले पुस्तके लिहिली जातात,
जे पश्चिमीचे अर्थशास्त्र वाचतात ते आशियाई अर्थशास्त्रज्ञ मंडळींचे
विचार समजून घेण्याची तसदीही घेत नाहीत. जे पश्चिमी राज्यशास्त्राचा अभ्यास करतात.
त्यांना आशियाई राजकीय विचारवंताचे योगदान
पाहतही नाही. पश्चिमी इतिहास आणि तत्वज्ञान अभ्यासणारे लोक आशियाई लोक आपल्या
इतिहासाची कल्पना कशी करतात आणि तत्वज्ञानातून शहाणपण कसे शकतात हेही पाहत नाही.
आशियाई वैचारिक प्रयत्न या लोकांना निरर्थक वाटतात. उपयोगी आणि खरं ज्ञान आपल्याला
इकडे मिळणार नाही म्हणून आपण पश्चिमेत जावून घेतले पाहिजे असे या लोकांना वाटते.
म्हणूनच, सय्यद हुसैन अलातास म्हणतात की, “साम्राज्यवादाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनाच वासाहतिक लोकांच्या विचार करण्याच्या
समांतर संरचना निर्माण करतात.” त्यामुळेच, आपण राजकीय,
आर्थिक, सामाजिक साम्राज्यवाद आणि वैचारिक
साम्राज्यवाद वेगळे करू शकत नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैचारिक
साम्राज्यवादाची मांडणी केल्यामुळे काहीसा गैरसमज होईल म्हणून सय्यद हुसैन अलातास
म्हणतात की, “मी असे काहीही सुचवत नाही की, जगातील चांगल ज्ञानाकडे कानाडोळा करा. त्याच्याकडे बघू नका. जगातील सगळ्या
साधनांमधून, भागांमधून आपणास शक्य तेवढ्या ज्ञानाचा उपयोग
गोळा केले पाहिजे. मात्र, हे सगळं आपण आपल्या वैचारिक
वारस्याकडे दुर्लक्ष न करता स्वतंत्र आणि चिकित्सकपणे केले पाहिजे. वैचारिक दास्यत्व आणि वैचारिक मलमपट्टी आणि
देशी-परदेशी वैचारिक परंपरेचे अस्सल संमिश्रण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत
असे अलातास म्हणतात.
सय्यद हुसैन अलातास यांच्याप्रमाणेच भारतात के.
सी. भट्टाचार्य यांनी ‘स्वराज इन आयडीयाज’ हा अत्यंत महत्वाचा लेख लिहून
वसाहतवादाच्या मानसिक परिणामांची चिकित्सा केली आहे. त्यांच्यामते, मानसिक आणि
वैचारिक दृष्ट्या आपण स्वतंत्र झाल्याशिवाय राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याला अर्थ
राहणार नाही. म्हणून, पाश्चिमात्य संस्कृती आणि समाजाची नक्कल आणि अनुकरण
करणाऱ्यांची त्यांनी चिकित्सा केली आहे. मात्र, पाश्चिमात्य समाजाकडून आपण काहीही
शिकू नये असे ते अजिबात म्हणत नाही. आपण सगळ्यांकडून डोळसपणे शिकले पाहिजे मात्र
त्यांचे आंधळेपणाने अनुकरण करू नये. आंधळेपणाने अनुकरण केल्यामुळे चिकित्सक मन
तयार होते नाही तर एक बेगडी आणि बांडगुळ मन तयार होते. ज्यामध्ये स्वत:चा विचार
नसतो. यालाच सय्यद हुसैन अलातास यांनी बंदिस्त मन म्हटले आहे. वैचारिक
साम्राज्यवाद तुम्हाला चिकित्सक बनू देत नाही. झापडबंद करून टाकतो. यालाच फ्रांत्ज
फेनन यांनी वसाहतवादाचा मानसशास्त्रीय हिंसाचार असे म्हटले आहे.
वैचारिक साम्राज्यवादातून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने निर्माण केलेली
विचारचौकट मोडली पाहिजे किंवा ओलांडली पाहिजे. वसाहतवादाची/साम्राज्यवादाची
विचारचौकट ही द्वैतावर आधारित आहे. त्यामध्ये असे मानले जाते की, आम्ही श्रेष्ठ
आणि तुम्ही कनिष्ठ, आम्ही चांगले, तुम्ही वाईट, आम्ही सुसंस्कृत, तुम्ही असंस्कृत,
आम्ही प्रकाशवाटा, तुम्ही अंधार, आम्ही गोरे, तुम्ही काळे, आम्ही विकास आणि
प्रगतीच्या बाजूचे तर तुम्ही त्या विरोधी. याचाच अर्थ असा आहे की, साम्राज्यवाद
नेहमीच बायनरीत विचार करतो. आमच्या सुरात सूर मिसळतात तोच सूर चांगला बाकी सगळा
बेसूर. म्हणूनच, विचारांचे आणि मनाचे निर्वसाहतीकरण करायचे असेल तर सर्वात प्रथम
बायनरीच्या पलीकडे पाहिले पाहिजे. सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव हे काळ्या-पांढऱ्या
रंगात पाहिले तर विशिष्ट गोष्टीच दिसतात किंवा सोयीच्या बाबी दिसतात. संपूर्ण
चित्र दिसत नाही. वसाहतवादी लोक स्वतःला चांगले म्हणायचे आणि येथील लोकांना वाईट
म्हणायचे. अलीकडे राष्ट्रवादी लोक स्वतः चांगले म्हणतात आणि इतरांना वाईट म्हणतात.
लोक बदलले मात्र मानसिकता तशीच आहे. उदा. इंडियन पिनल कोड बदलून भारतीय न्याय
संहिता आणली. त्यामध्ये फक्त नंबर खालीवर केले आणि काही गोष्टी कमीजास्त केल्या.
मात्र मानसिकता तशीच आहे.
अलीकडचे सय्यद हुसैन अलातास यांचे चिरंजीव आणि
समाजशास्त्राचे अभ्यासक फरीद हुसैन अलातास यांनी लिहिले आहे की, “अचिकित्सक
परकीयांवर टीका करणे आणि आंधळेपणाने आपल्या येथील संस्कृती, पितृसत्ता,
बहुसंख्याकवाद, धार्मिक कट्टरता यांचा गौरव करणे हे निर्वसाहतवाद नाही.” जगातील
सगळ्या कान्याकोपऱ्यातून शिकणे तरीही आपली भूमी न सोडत एकदाच जागतिक आणि स्थानिक
होणे, बायनरीच्या पलीकडे जावून इतिहास, संस्कृती आणि राजकारणाचा विचार करणे.
सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव हे बहुरंगी आहे हे मान्य करणे म्हणजे मनाचे
निर्वसाहतीकरण करणे होय. केनियन लेखक एन्गुंगी यांनी मनाच्या निर्वसाहतीकरणावर एक
स्वतंत्र लेख लिहिला आहे. आजच्या काळात तो सगळयांनी आवर्जून वाचला पाहिजे.
मुद्दा क्रं. ३ - इतिहास : एक युध्दभूमी
अलीकडे संसदेपासून सार्वजनिक
चव्हाट्यापर्यंत सगळीकडेच इतिहासावर भरभरून चर्चा होतांना दिसते. सोशल मिडीयावर तर
इतिहासावरील चर्चेचा आणि कंटेंटचा महापूरच आलेला दिसतो. मात्र, यातील कोणती गोष्ट
किती तथ्यांवर आधारित आहे? आणि किती विश्वसनीय आहे? या प्रश्नांशी मात्र कोणाला
काहीही देणघेण नाही. सोशल मिडीयाच्या विस्तारामुळे सगळेच लोक आपापला इतिहास
धुंडाळत आहेत. इतिहासाविषयी आपली मते मांडत आहेत. तसेच, इतिहासाविषयी काहीना काही
लिहित आहेत किंवा त्यामध्ये रुची आणि रस दाखवत आहेत. या सगळ्या गोष्टी चांगल्याच
आहेत. सर्वसामान्य लोकांनी इतिहासामध्ये रस घेतलाच पाहिजे. त्यांनी इतिहास वाचला
पाहिजे. समजून घेतला पाहिजे. या सगळ्यांमधूनच संपूर्ण समाजाची इतिहास साक्षरता
होवू शकते. सोशल मिडियावर चालणाऱ्या चर्चेचा बारकाईने आणि चिकित्सकपणे विचार केला
तर आपणास असे दिसून येते की, लोक इतिहासाविषयी भरपूर बोलत आहेत मात्र त्या
बोलण्याला अभ्यासाचा आधार नाहीये. काही लोक अभ्यास करूनही बोलत आहेत किंवा लिहित
आहेत मात्र सोईच्या आणि आवडीच्या गोष्टींचाच अभ्यास करतात आणि त्याविषयी लिहित
आहेत.
यासोबतच, खरा इतिहास आणि खोटा इतिहास,
आमचा इतिहास आणि त्यांचा इतिहास यावरूनही बऱ्याच चर्चा होतांना दिसत आहेत. शाळेच्या
पाठ्यपुस्तकांमध्ये कोणता इतिहास शिकवायचा? तसेच कोणाला वगळायचे आणि कोणाला सामावून
घ्यायचे? याचेही एक राजकारण दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत होतांना दिसत आहे. काही इतिहासकारांचे
पुस्तके जाळून टाकले पाहिजेत असेही समाजात विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी म्हटले होते.
याचाच अर्थ असाही आहे की, इतिहासावरून विचारसरणीचे राजकारणही घडते. म्हणूनच,
आपल्या समाजात डावे इतिहासकार, उजवे इतिहासकार असेही दिसून येतात. कारण, इतिहासकार
हाही एक व्यक्ती असतो. त्याच्यावर विचारांचा आणि विचारसरणीचा प्रभावही असतो. यासोबतच,
पुरोगामी इतिहास आणि प्रतिगामी इतिहास असेही समाजात विभाजन केले जाते. काही लोक इतिहासाचा
वापर करून मानवमुक्तीची लढाई लढतात तर काही लोक इतिहासाचा गैरवापर करून लोकांमध्ये
जाती, धर्म, लिंग, राष्ट्र, वंश यावरून भेदभावही निर्माण करतात. म्हणजेच,
इतिहासाचा चांगलाही वापर करता येतो आणि वाईटही वापर करता येतो. इतिहासाच्या अभ्यासातून
शांतता ही शिकवता येते तसेच हिंसाही घडवता येते. या सगळ्या गोष्टींमुळेच इतिहास ही
एक रणभूमी बनली आहे.
प्रसिध्द इतिहासकार रोमिला थापर यांनी अलीकडे
‘आपला इतिहास, त्यांचा इतिहास – कोणाचा इतिहास’ असा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये इतिहासाचे
सांस्कृतिक राजकारण आणि वर्तमानातील राजकारण कसे घडते किंवा घडवले जाते याचा मागोवा
घेतला आहे. बहुतांश लोक इतिहासाकडे संकुचित
दृष्टीने पाहतात. माझ्या आयुष्यातील अनेक वर्ष मीही तसाच पाहत होतो. माझ्याही
डोक्यात आमचा इतिहास,
त्यांचा इतिहास अशा गोष्टी होत्या. त्या सामाजिक वातावरणातून आल्या होत्या.
लैंगिकतेच्या इतिहासा संदर्भात तर अलीकडच्या काही वर्षांपर्यंत मी तसाच पाहत होतो.
मात्र, इतिहासाला
एका जातीच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या, वंशाच्या, प्रदेशाच्या दृष्टीने पाहणे हे महत्वाचे
असले तरी परिपूर्ण नाही. एकाच विशिष्ट चौकटीतून इतिहासाकडे पाहिले तर इतिहासातील अनेक
गोष्टी दिसत नाही याची जाणीव मला माझ्या पीएचडीच्या संशोधनाच्या काळात झाली. संकुचित
दृष्टीने इतिहासाकडे पहिल्याने ज्या आपल्याला आवडतात, ज्या आपल्याला पाहायच्या आहेत
त्याच गोष्टी किंवा घटना इतिहासात दिसतात.
मात्र, वास्तवात इतिहास हा अनेकवचनी, बहुमुखी आणि बहुरंगी असतो. त्याला काळ्या-
पांढऱ्यात पाहणे हे इतिहासाची गुंतागुंत, अनेकवचनी आणि बहुरंगी स्वरूप नाकारणे असते असे मला
इतिहासाचा शास्त्रीय,
वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करतांना जाणवले.
बहुतेकवेळा लोक इतिहासाकडे एकाच चष्म्यातून पाहत
असल्यामुळे एक तर त्यांना फक्त हिंसा दिसते किंवा मग फक्त अहिंसा दिसते. कधी त्यांना
फक्त भेदभाव दिसतो तर कधी त्यांना फक्त बंधुभाव दिसतो. वास्तवात मात्र भारताचा आणि
संपूर्ण जगाचा इतिहास हा गुंतागुंतीचा आहे. त्यामध्ये स्त्री महात्म्य जसे आहे
तसेच भरपूर स्त्रीद्वेष ही आहे. त्यामध्ये वैराग्याची, ब्रह्मचर्याची चर्चा जशी आहे
तशीच मैथूनच्या, कामक्रीडेच्या आणि वासनेच्याही अनेक गोष्टी आहेत. इतिहासामध्ये अहिंसेप्रमाणेच
हिंसाही भरपूर दिसते. सांस्कृतिक झगड्यासोबतच सांस्कृतिक देवाणघेवाणही भरपूर दिसते.
म्हणूनच, शास्त्रीय दृष्टीकोनातून इतिहासाचा अभ्यास करणारे व्यावसायिक इतिहासकार म्हणतात
की, इतिहासाला एकसाची, एकरंगी करू नये. त्याला त्याच्या गुंतागुंतीच्या संदर्भात समजावून
घ्यावे. अलीकडे मात्र, धर्मांध/ धार्मिक कट्टरतावादी लोक इतिहासात धार्मिक वादविवाद
होते असे सांगून समाजात धार्मिक संघर्ष वाढविण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा मात्र
आशयाच्या बाबतीत थोडासा वेगळा प्रयोग धर्मनिरपेक्षतावादी लोक समाजात धार्मिक सलोखाच
होता असे सांगणारा इतिहास सांगतात. धर्मांध आणि धर्मनिरपेक्षतावादी लोकांचे हेतू जरी
वेगवेगळे असले तरी इतिहासाला एकरंगी, एकसाची करण्याची कृती मात्र सारखीच आहे.
म्हणूनच, वरील दोन्ही गट एकमेकांना अप्रत्यक्षपणे मदतच करत असतात.
इतिहासाला पुरोगामी करू नये तसेच त्याला प्रतिगामी
करू नये. त्याला डावे उजवे करू नये. या प्रकारचे इतिहासाचे इतिहासाचे रुपांतर हे इतिहासालाच
नव्हे तर समाजालासुध्दा युध्दभूमी बनवते. त्यातून
समाजाचे मानसिक आणि बौद्धिक आरोग्य खराब होते आणि संपूर्ण समाजच समस्याग्रस्त बनतो.
इतिहासाला पुरोगामी- प्रतिगामी किंवा डावे-उजवे करू नये असे एकीकडे मी म्हणत जरी
असलो तरी दुसरीकडे याचीही जाणीव आहे कि, पुरोगामी-प्रतिगामी, किंवा डावा-उजवा यांचाही एक
इतिहास असतो. त्यांच्या लिखाणाचे एक वैचारिक राजकारण असते. त्याचाही चिकित्सक
अभ्यास झाला पाहिजे.
समारोपीय मुद्दा-
समकालीन वर्तमानाचा विचार करतांना वरील तीन मुद्दे
मला अत्यंत महत्वाचे वाटतात. तिन्ही मुद्दे काहीसे वेगळे जरी वाटत असले तरी विचारसूत्राच्या
बाबतीत तिन्हीमध्ये महत्वाचे साम्य आहे. ते म्हणजे द्वैत/बायनरी पलीकडचा विचार करणे.
आजच्या आपल्या समकालीन वर्तमानात (भारतात आणि जगभरात) समाजांचे, लोकांचे सगळेच विचारविश्व,
व्यवहारविश्व बायनरी/द्वैती विचारांनी घडवलेले आणि नियंत्रित केलेले दिसते.
त्यामुळेच, सगळीकडेच धृवीकरण होतांना दिसत आहे. या स्थानिक आणि जागतिक पेचप्रसंगातून
मार्ग काढायचा असेल तर आतापर्यंत न कल्पिलेले वैचारिक-व्यावहारिक हस्तकक्षेप करावे
लागतील आणि त्यामध्ये बायनरीची मोडतोड करावीच लागेल. ही मोडतोड लैंगिकते सारख्या खाजगी
जीवनापासून ते इतिहास चर्चेच्या चव्हाट्या सारख्या सार्वजनिक जीवनात करावी लागेल. म्हणूनच, आपण क्वीर
आणि निर्वसाहतवादी विचारविश्वांकडून बरेच शिकण्यासारखे आहे.
पूर्वप्रसिद्धी -महाअनुभव, फेब्रुवारी २०२६