स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकांनी नव्या भारताचे
स्वप्न पहिले होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करण्यासोबत एक नवा भारत
घडवणे हे सुद्धा स्वातंत्र्य चळवळीतील अनेकांचे उद्दिष्ट होते.
स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी पाहिलेले स्वप्न आपण इतक्या वर्षात पूर्ण
केले आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. गांधींच्या स्वप्नातील
ग्रामस्वराज्य भारत, आंबेडकरांच्या स्वप्नातील जातिमुक्त भारत, भगतसिंहाच्या
स्वप्नातील समाजवादी भारत, रवींद्रनाथांच्या स्वप्नातील भयमुक्त भारत कुठे आहे?
असे अनेक प्रश्न आपण एकमेकांना विचारायला हवे. भांडवलशाहीच्या माध्यमातून
गोष्टींचे बाजारीकरण, वस्तूकरण झाल्यामुळे सगळ्यांचेच इवेंटीकरण झाले आहे. ते
तुमचे प्रियकर-प्रियसीचे प्रेम असो किंवा मग देशप्रेम असो. हल्ली
स्वातंत्र्यदिनाचाही इवेंट झाला आहे. आरोग्या व्यवस्थेची किती बिकट परिस्थिती आहे
हे तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे पाहताच आहोत. आरोग्य व्यवस्थेचा बाजार
मांडणारे धंदेवाईक लोक कोरोना संकटाच्या काळात काहीच उपयोगी पडलेले नाहीत.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचाच फायदा गरिबांना, मध्यमवर्गीयांना आणि सगळ्यांनाच
झाला आहे. त्यामुळे पुढील काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच जास्त वाढवली आणि
टिकवली पाहिजे.
लोकांचे, सरकारचे, सरकारी
संस्थांचे, कार्यक्रमांचे, घोषणांचे, भाषणांचे एकदातरी मुल्यांकन झाले म्हणजे कळेल
की, नेमकं गेल्या ७५ वर्षात आपण देश म्हणून,
समाज म्हणून आणि स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून कसे वागलो आणि वागत आहोत हे
एकदाचे स्पष्ट होईल. माघील काही
वर्षांमध्ये ‘स्वातंत्र्य’ आणि ‘देशप्रेम’ या संदर्भात ज्या चर्चा सार्वजनिक
विश्वात आणि प्रसारमाध्यमात घडून आल्या. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, अजूनही
स्वातंत्र्य चळवळीचा वारसा नेमका कोणता आहे हे आपणास कळालेले नाही. गेल्या ७५ वर्षात स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी
दिलेला विविधतेत एकतेचा, सांप्रदायिक एकतेचा, जातिवाद विरोधाचा, बहुजिनसी परंपरेचा
वारसा आपण पुढे घेवून न जाता धार्मिक, जातीय आणि भाषिक द्वेष, गैरसमजच पुढे घेवून
जात आहोत. एकाच देशातील लोकांविषयीच्या द्वेषातून आणि गैरसमजातून अनेक खोटे भ्रम
जन्माला येतांना दिसत आहेत आणि हे भारतीय समाजाला आणि देशाच्या भविष्याला खूपच
घातक आहे.
एकाच देशातील नागरिक
एकमेकांविषयी जात, धर्म, भाषा, लैंगिकता यांच्यामुळे जर तिरस्कार करत असतील तर देश
एकसंघ आणि अखंड राहूच शकत नाही. जिथे लोकांची मने जुळत नाहीत तेथे कायदा, दडपण,
दमन आणि सक्तीचा काहीच उपयोग होत नाही. हे चीगळलेल्या काश्मीरच्या परिस्थितीतून
आपण समजून घ्यालला हवे. पाच- सहा वर्षात
लव जिहाद, राष्ट्रद्रोही, मॉब लिंचिंग, गोरक्षकांचा हैदोस या मुद्द्यांनी देशाच्या
भविष्यात काय वाढून ठेवले आहे? याचा
गांभीर्याने विचार करावा लागत आहे. एकीकडे भरमसाठ वाढणारी आर्थिक विषमता,
दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी आणि कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांच्यामुळे तणावग्रस्त
होत जाणारी तरुणाई, तर दुसरीकडे समाजाचे होत जाणारे झुंडीकरण, वाढती धर्मांधता,
जातीयवाद, आध्यात्मिक बाजार, असुरक्षिता, ढासळलेले सामाजिक-मानसिक आरोग्य आणि
हिंसा. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे किंबहुना या दोन्ही गोष्टी
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
स्वातंत्र्याची शंभरी जर पहायची असेल आणि लोकशाही व्यवस्था
टिकवायची असेल तर पुढील काही गोष्टी देश
आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून अगत्याने आणि अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे.
खालील गोष्टी मला अत्यंत महत्वाच्या वाटतात. त्यासाठी विशेष उपक्रम शाळा, कॉलेज,
समाज आणि सरकारी – सार्वजनिक स्थळांमध्ये त्यावर जाहीर किंवा मर्यादित स्वरुपात
विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये, सरकारी नोकरदारांमध्ये, राजकीय –सामाजिक पक्ष,
संघटनांच्या पातळीवर त्यावर चर्चा, संवाद झाली पाहिजे. त्यांची चर्चा मी पुढे करत
आहे.
चला सुरक्षित
कप्पे आणि घेटो तोडूयात:
आजकाल समाजात झपाट्याने घेटोकरण होत आहे. जात, धर्माच्या
आधारावर विशिष्ट लोकांना लोकांनाच घरे विकत किंवा भाड्याने दिली जातात म्हणून
शहरांमध्ये सुद्धा कोणत्या भागात कोणत्या जातीची आणि धर्माची लोकं राहतात हे
स्पष्ट कळते. नोकरी म्हणून, नातेसंबंध म्हणून किंवा जीवन म्हणून सुरक्षितता नाही
त्यामुळे जातीला आणि धर्माला लोकं सुरक्षित झोन म्हणून सुद्धा पाहत आहेत. बहुतेक
वेळा आपल्याच लोकांमध्ये आपल्याला घरं घ्यायचे आहे किंवा द्यायचे आहे असे लोक सहज
बोलून जातात. मिश्र वस्ती असल्यामुळे वेगवेगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांचा
एकमेकांशी संपर्क येतो त्यामुळे एकमेकांपासून असुरक्षित वाटत नाही आणि जात,
धर्माच्या नावाखाली घेटोकरण सुद्धा होत नाही. घेटोकरणाची प्रक्रिया फक्त घरं आणि
वस्तीपूर्ती मर्यादित नाही. आज कॉलेज, सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा बहुतेक वेळा जात,
धर्म आणि विचारधारांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे घेटो होत आहेत.
त्यांच्यामध्ये चांगला संवाद नसल्यामुळे
ते नेहमी एकमेकांविषयी संशयी असतात. सोशल मिडीयावर असे अनेक घेटो आपणास दिसून
येतात. चांगला समाज आणि देशासाठी आपणास देशातील हे घेटो आणि सुरक्षित कप्पे लवकरात
लवकर तोडले पाहिजे.
चला एक होवूयात :
जात, धर्म, भाषा, वांशिकता यांच्यामध्ये विभागलेल्या
समाजाला एक करणे म्हणजे अवघड काम आहे. द्वेष, गैरसमज झपाट्याने वाढत असलेल्या
समाजात हे तर अत्यंत जिकरीचे काम ठरते. लोकशाही समाजात राजकीय पक्ष, सामाजिक
संघटना आणि वैचारिक वैविध्य नेहमी असणारच आहे आणि त्यामुळे लोकशाही विकसितच होते.
राजकीय पक्ष आणि संघटना आपापल्या पातळीवर लोकांना वेगवेगळ्या (जात, धर्म, भाषा,
विचार) पातळीवर संघटीत करत असतात परंतू त्याच्याही पुढे जावून आपण या देशाचे सुजाण
नागरिक म्हणून, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, अभ्यासक, विचारवंत म्हणून व्यापक
देशहितासाठी, समाजहितासाठी आणि माणुसकीसाठी एक झाले पाहिजे. नेहमी सत्ताधारी पक्ष लोकांच्या विरोधाला विरोधी
पक्षाचा विरोध म्हणून पचवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. उदा. सध्या देशभरात अखिल
भरतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना म्हणून कमी आणि सत्ताधारी पक्षाची एक
विद्यार्थी शाखा म्हणून अधिक काम करत आहे. सरकारने शैक्षणिक क्षेत्रात घेतलेले
सर्व निर्णय कसे बरोबर आहेत हे सांगण्यात त्यांची शक्ती खर्ची होत आहे. अशीच
काहीशी भूमिका इतर पक्षांच्या विदयार्थी संघटना ज्यावेळी त्यांच्या पक्षांची
सरकारे केंद्रात आणि राज्यात होती तेंव्हा घेत होती. त्यामुळे विदयार्थी संघटनांनी
राजकीय पक्षांचे बटिक बनू नये. त्यांनी त्यांचे स्वतंत्र किंवा स्वायत्त अस्तित्व
ठेवावे. म्हणून, अराजकीय न होता. व्यापक पातळीवर विद्यार्थी म्हणून एक होवून
शैक्षणिक धोरणावर राजकीय भाष्य करणे गरजेचे आहे. सरकारची शिक्षण क्षेत्रातील कमी
होत जाणारी गुतंवणूक, शिक्षणाचे होणारे खाजगीकरण, वाढणारी भरमसाठ फिस हे सर्व विद्यार्थ्यांचे
कळीचे मुद्दे आहेत. देशातील कामगार आणि शेतकरी तर एकीकडे देशोधडीला लागले आहेत आणि
दुसरीकडे राजकीय पक्षांच्या हातातील बाहुले बनले आहे त्यामुळे एक झाल्याशिवाय कोणत्याही
गोष्टीला पर्याय नाही.
चला प्रश्न
विचारुयात:
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न
लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला विचारला होता. त्याची चर्चा अनेक जन भाषणामध्ये,
व्याख्यानामध्ये नेहमी करतात. काही लोक आपल्या सरकारला प्रश्न विचारायला सुद्धा
घाबरतात. सरकारसुद्धा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न
करते आणि सरकारी भाट तर पाकिस्थानाचे तिकीट काढून देणेच बाकी ठेवतात. समाजात आणि
देशात द्वेष, गैरसमज, तिरस्कार, जातिवाद, धर्मांधता आणि हिंसा सुद्धा
संस्काराच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली शिकवली जाते त्यामुळे अशा
शिकवणीला प्रश्न विचारत राहणे खूपच महत्वाचे असते. प्रश्न विचारणाऱ्याला सत्ताधीश,
धर्माचे ठेकेदार घाबरतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे. हल्ली सोशल मिडीयावर
पसरवल्या जाणाऱ्या महीतीची विश्वसनीयता आणि अचूकता न तपासताच अनेक लोक त्यावर
विश्वास ठेवतात त्यामुळे अनेक हिंसक कारवाया होतात. मोहसीन शेख या पुण्यातील
मुलाचा खून अशाच प्रकारे झाला. जात, धर्म, संस्कृती, राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांचा
आधार घेवून बहुतेकवेळा लोकांचा आवाज दाबला जातो. त्यांनी आमच्या जातीच्या, धर्माच्या
आणि राष्ट्राच्या भावना दुखावल्या म्हनून प्रश्नकर्त्यावर दडपण आणले जाते, धमकी
दिली जाते आणि वेळप्रसंगी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गीसारखी प्रश्न
पडणाऱ्या डोक्यात गोळ्या घातल्या जातात. ग्रामसभेपासून ते लोकसभेपर्यंत घेतल्या
जाणाऱ्या निर्णयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत कारण तुमच्या वतीने निवडून
गेलेले देशाचा विकास आणि प्रगती करायची
असेल तर देशात शांतता, सहिष्णुता, मैत्रभाव आणि एकमेकांवर विश्वास पाहिजे यासाठी
प्रश्न विचारत राहणे ही काळाची गरज आहे.
चला वेगळा आवाज
ऐकूयात:
आपल्याला बोलायला जास्त आवडते. ऐकायचे म्हटले की, कंटाळा येतो आणि त्यातही
आपल्यापेक्षा कोणी वेगळे बोलतो ते तर आपण अजिबात ऐकतच नाही. वेगळा आवाज, वेगळे
अनुभव आपल्याला माहितच नसल्यामुळे वेगळेपणाची आपल्याला ओळखच होत नाही. त्यामुळे
वेगळ्या जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, वांशिकतेच्या आणि लैंगिकतेच्या लोकांविषयी
आपण सहजच गैरसमजाला बळी बडतो. कधी कधी तर गैरसमजामुळे वेगळ्या लोकांचा तिरस्कार
आणि द्वेष सुद्धा करतो. उदा. महाराष्ट्रातील हिंदुनी मुस्लिमांचा वेगळा आवाज कधीच
ऐकलेला नसल्यामुळे हिंदुत्ववादी लोक मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात सहज
यशस्वी होतात तसेच मुस्लीम जमातवाद्यांकडून सुद्धा घडते. जातींविषयी तर हे अधिक
लागू होते. प्रत्येक जातीला वाटते की, आमचेच वाईट आहे. इतर जातींचे सगळे काही
आनंदात चालले आहे. समाजात सध्या आपल्याला आवडेल तोच आवाज लोकांना आवडतो पण त्यामुळे
सगळ्यांचा एकच आवाज आहे असे होत नाही. नेहमी उच्च जातीयांचा, बहुसंख्यांकांचा आवाज
हा देशाचा आवाज म्हणून सादर किंवा चित्रित केला जातो पण त्याचवेळी असंख्य
परिघावरील दलितांचे, भटक्यांचे, अल्पसंख्यांचे (धार्मिक, भाषिक, वांशिक आणि
लैंगिक) आवाज नाकारले जातात किंबहुना दाबले जातात हे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
परिघावरील समूहांना अभिव्यक्त होता येईल अशी आपण अपेक्षा करूयात की, ज्यामुळे
त्यांचे आवाज लोकांपर्यंत पोहचतील.
चला इतरांशी
बोलूयात:
तंत्रज्ञानाच्या विकासाने संवाद हरवत आहे अशी चर्चा आपण बहुतेक
वेळा ऐकली असेल. या चर्चेत बहुतांश सत्य सुद्धा आहे पण तंत्रज्ञानाच्या विकासाच्या
आधी लोकांमध्ये सर्रास संवाद होता हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. इतरांशी आपण
नेहमी बोलत होतो का? का फक्त गरज असेल तेंव्हाच बोलत होतो? आणि सगळ्यात महत्वाचे
म्हणजे काय बोलत होतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली तर वेगळेच सत्य बाहेर
येईल. जातीय संघर्षात, धार्मिक संघर्षात आपल्या जातीला किंवा धर्माला संघटीत
करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ‘इतर’ ठरवणे.
इतरांविषयी भन्नाट कल्पना आपण करून घेत असतो किंवा आपल्या डोक्यात जातीचे, धर्माचे
किंवा संस्कृतीचे रक्षक भरत असतात. भारतासारख्या बहु जातीय, धर्मीय आणि भाषिक
समाजात तर सहजच ‘इतर’ ठरवले जातात. इतरांच्या नको त्या प्रतिमा निर्माण केल्या
जातात, नको त्या प्रकारे चित्रित केले जाते. हे सर्व जाणीवपूर्वकच होत नाही. जाती-
धर्माच्या आधारावर धृवीकरण करणारे लोक ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करतात पण
सर्वसामान्य लोक न कळत काहीवेळा अशा गोष्टी करत असतात. त्यामुळे इतरांशी बोलायला
हवे. जाती-धर्माच्या आधारावर धृवीकरण करणारे लोक पूर्वग्रहदुषित असल्यामुळे ते
इतरांशी बोलणार नाहीत किंवा बोलणे टाळतील पण सर्वसाधारण लोकांना योग्य संधी, दिशा
आणि समज मिळाली तर ते इतरांशी बोलू शकतील. हल्ली लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न
ऐवढे तीव्र झाले आहेत की, लोकांना मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी
आणि बोलण्यासाठी वेळच मिळत नाही असे नेहमी म्हटले जाते म्हणून चला इतरांशी बोलूयात
असे म्हणत वेगवेगळ्या जात, धर्म, भाषा आणि लैंगिकता असलेल्या लोकांचे सार्वजनिक
कार्यक्रम घडवून आणले गेले पाहिजे, वेगवेगळी सामाजिक- धार्मिक पार्श्वभूमी
असलेल्या लोकांचे अनुभवकथन ऐकले पाहिजे आणि त्यांच्यात चर्चा, संवाद घडवून आणल्या
पाहिजेत. तरच आपल्याच देशातील नागरिकांना ‘इतर’ समजून करून घेतलेले गैरसमज, भ्रम
आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष, तिरस्कार दूर होईल.
सद्याची देशाची परिस्थिती पाहतात
स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आपण किती जपून ठेवला आहे हे स्पष्ट होईल. स्वातंत्र्य
चळवळीचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा सांगतांना देशातील समकालीन गंभीर सामाजिक,
धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नाची चर्चा करणे हे विद्यार्थी, तरुण आणि नागरिक म्हणून आपले
आद्य कर्तव्य आहे. तसेच, ती आपली मुलभूत जबाबदारी सुद्धा आहे. समकालीन परिस्थिती
अशीच राहिली तर लोकशाही, स्वातंत्र्य राहणार नाही. फुले, आगरकर, विवेकांनद, सुभासचंद्र बोस,
बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पेरियार, मौलाना आझाद, नरेंद्र देव, कमलादेवी चटोपाध्याय, भगतसिंह, क्रांतीसिंह नाना पाटील, लोहिया, जयप्रकाश आणि यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि समाजक्रांतिकारकांचे
स्वप्ने वास्तवात येणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी अनेक स्वप्ने पाहिली
पाहिजेत. स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी लढले पाहिजे.