१.
देविदासराव
नामदेवराव कांबळे, १३-०६-१९४१, जनता
“
रा. रा. देविदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक.....
आपणास
काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही
ब्राह्मण नाही,
जोहार म्हणावा तर आपण मांग, फुरमान म्हणावे तर मी महार,
आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा,
म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत
आहे. महार समाज आणि महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत त्याबद्दल आपले
मनातील “खुडखुडी” (मला वाटते,
खुमखुमी या मराठी शब्दाचा हा निझामशाही अपभ्रंश असावा) काढून टाकण्याकरिता व
एकदाचा “सोक्षमोक्ष” करून घेण्याकरिता पत्र लिहिण्याचे योजिले. यात आपण काहीच
वावगे केले नाही. आपण मला ‘परमपूज्य’
या शब्दसमुच्चयाने संबोधिले आहे. त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे. महार लोक नेहमीच
‘परमपूज्य’
हे विशेषण लावून मला संबोधितात. पण त्यात विशेष असे काही नाही. महारांनी महाराची
स्तुति केली,
याला काय किंमत? आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला ‘परमपूज्य बाबासाहेब’
म्हणालात यातले प्रेम आणि त्याचे स्वारस्य काही और आहे,
इतके कि,
ते सांगता नये.
माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी
गांधींचा तिरस्कार करतो,
हा आपला गैरसमज कोणी करून दिला. ते मला समजत नाही. गांधीचा मी तिरस्कार करीत असलो,
तरी त्याची करणे दुसरी आहेत. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे.
मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात. पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्रम मी
ठेवलेला नाही. याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते., पण ते त्यामुळे माझा तिरस्कार
करीत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की,
मी रात्रंदिवस कामात असतो. मला छानशौक, ऐषआराम माहित नाहीत,
नाटक सिनेमांत मी वेळ घालवीत नाही. माझा धंदा,
वाचन किंवा सार्वजनिक कार्य या व्यवसायात
मी सतत गुंतलो आहे. मला गांधीसारखे सेक्रेटरी नाहीत. माझे काम मलाच करावे लागते.
हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र,
माझे सहकारी मला क्षमा करतात;
माझा तिरस्कार करीत नाहीत. ‘उत्तर न दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन’
असे आपण जे म्हटले आहे,
ते मनुष्य स्वभावास धरूनच आहे. आपली योग्यता काय आहे,
हे मला माहिती नाही. ‘मी निझाम इलाख्यातील
मराठवाडा विभागातील मातंग समाजातील शिकलेला,
सर्वात पहिला विद्यार्थी आहे’, असे आपले वर्णन आपण केले आहे. तिरस्कार करण्याची पाळी यावी हे वाईटच आहे पण
आपण केवळ विद्यार्थीच असता तर आपल्या तिरस्काराची फारशी मातब्बरी वाटली नसती. पण
आपण बजावले आहे की,
‘ मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे.’ मी आपणास
सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा
भावी पुढारी म्हणून पत्र पाठवीत आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये.
ज्यू लोकांमध्ये जसा मोझेस तसे मातंग समाजात आपण आहात. हे आपल्या भाषेवरून उघड
आहे. आपल्या पत्राला कोण उत्तर देणार नाही! आपल्या मनात माझ्याविषयी तिरस्कार
उत्पन्न झाला,
तर सर्व मातंग समाज माझा तिरस्कार करू लागेल. तो टाळला नाही तर तो माझ्या अनर्थाला
कारणीभूत होणार नाही, असे कोण म्हणेल?
मला तरी म्हणता येणार नाही,
तो टाळण्याकरिता माझा शिरस्ता मोडून मी आपल्या पत्राचे उत्तर देत आहे.
पहिल्या प्रथम दोन गोष्टीबद्दल आपले आभार
मानल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे
पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात,
यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण
मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे,
तो आपण कृतीत आणावा,
अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट
आहे, मी समतेचा मोठा
भोक्ता,
नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही,
महात्मा नाही,
असे सांगून थकलो. पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. आपण मांग
लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही,
हे तर चांगलेच आहे. मांग लोकांची अवस,
पुनव,
ग्रहण मानण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे,
याबद्दल मला काही संदेह नाही. आपण आपली दृष्टी
संकुचित केली आहे,
याबद्दल मला वाईट वाटते. आपण महार लोकांतूनही हे
माझ्या फोटोपूजनाचे खूळ नाहीसे करण्याचे व्रत पत्करले पाहिजे,
असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते. हा आपला मोठाच पराक्रम होईल यात काही शंका
नाही. कदाचित एवढा पराक्रम केल्यावर, मातंग समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल अशी
आपल्याला भीती वाटत असेल,
तरी भीती बाळगू नये. आपल्या फोटोची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा
करण्याच्या प्रथेइतकी कधीच वाईट दुष्परिणामी होणार नाही.
दुसऱ्या एका अभिवाचनासाठी मी आपला आभारी
आहे. मी मेल्यावर कसे होईल. अशी चिंता मी अनेकवेळा प्रसिद्ध केली आहे,
हे खरे आहे. महारापैकी एकाही तरुणाला सांगावयाला हिंमत झाली नाही की,
“ काही हरकत नाही,
तुम्ही मरा,
आम्ही चालवू,”
आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले. द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्विद्या
शिकवल्यानंतर “मला गुरुदक्षिणा कोण देईल?”
असा प्रश्न केला. त्याला कोणीच उत्तर देईना. गुरु काय मागतो,
कोण जाणे ? प्राण मागतो की काय अशा भयाने सगळेच गप्प बसले. एकट्या अर्जुनाला धैर्य
झाले. तो म्हणाला,
“ मागा काय मागावयाचे आहे ते,
मी देतो.” द्रोणाच्या ठायी मी व अर्जुनाच्या ठायी आपण आहात असे वाटून माझ्या मागून
कोणीतरी आहे,
या विश्वासाने मला शांती वाटते, द्रोणाने पण केला होता की,
राजा द्रुपदाला शिष्यहाती धरून आणीन म्हणून तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण
आहे. तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही. आपण तो पुरा करण्यास
सिद्ध आहात,
हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो. ही गोष्ट जर
आपल्याला करता आली तर मांग जातीला इतिहासात मोठे स्थान प्राप्त होईल. नमनाला फारच
तेल गेले! आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपले
आरोप दोन प्रकारचे आहेत. काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणारे असे आहेत. बाकीचे
महार समाजाला लागू असे आहेत.
माझ्यावरचा प्रत्यक्ष आरोप काय आहे,
हे मला अजूनही समजले नाही. मी फक्त महारांचाच पुढारी आहे,
असा मध्यप्रांतातील मांग लोकांनी ठराव रूपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी
वृत्तपत्रांतून वाचला आहे. त्यांतील विधानासंबंधाने मी ता. ४ जानेवारी १९४१ च्या
जनतेत लिहिले आहे ते आपण अवश्य वाचून पहावे. मी महारांचाच पुढारी ही कॉंग्रेसची
ओरड, त्याचीच री
मांगांनी ओढली. असे किती पोटार्थी मांग-महार आहेत की,
जे पैशासाठी वाटेल ते करतील. ‘ पुणे करार’
झाला,
त्यावेळी कॉंग्रेस मला ‘सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी’
म्हणून मान्य करीत असे. त्यांनतर मी नुसता मुंबई इलाख्यातील अस्पृश्य लोकांचा
पुढारी आहे असे म्हणू लागली,
त्यांनतर नुसत्या महारांचा पुढारी आहे,
असे म्हणू लागली. माझी खात्री आहे की,
काही दिवसांनी मी कोकणस्थ महारांचाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील
महारांचा पुढारी, असा प्रचार कॉंग्रेस करील व त्याला महारांतूनच माणसे सापडतील असे
म्हणावयास हरकत नाही. कोणीही कॉंग्रेसला विरोध करून पहावा,
म्हणजे मी म्हणतो त्याची सत्यता कळेल. चांभारातील एखादा पुढारी कॉंग्रेसला विरोध
करायला निघू द्या,
म्हणजे हाच मासला दिसून येईल. तो दाभोळ्या जातीचा असला,
तर तो चांभार जातीचा पुढारी नसून दाभोळ्या जातीचा पुढारी आहे,
असे ते म्हणतील. हरळ्या जातीचा असला तर हरळ्य़ाचा पुढारी म्हणतील;
आणि चेवल्यांच्या जातीचा असला तर चेवल्यांचा पुढारी म्हणतील. मांगामध्ये १२
पोटजाती आहेत,
असे मला समजते. मांगामध्ये कॉंग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याची
देखील तीच गत होणार. तो ज्या जातीचा,
त्या जातीचा पुढारी,
असा गिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती मला माहिती असल्यामुळे
महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही. शिवाय,
बाकीच्यांनी माझे पुढारीपण सोडले आणि नुसते महारांनी मानले,
तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही,
कोठे तरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे. महारांची दुर्दशा काही कमी नाही.
नुकत्याच महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात
“सर्वांत महारांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे”, असे कबूल केले आहे. त्यांची
दु:स्थिती नाहीशी करण्याची मला संधी राहिली तरी पुरे आहे,
असे मानून काम करण्याची माझी तयारी आहे. ‘नामके वास्ते आणि कामके वास्ते’
असे दोन प्रकारचे पुढारी आहेत. मी नामके वास्ते असलेल्या पुढाऱ्यातला नाही. मला
काम पाहिजे.
मी पुढारी आहे,
मी समाजसेवक नाही. पुढारी या नात्याने चालना देणे,
लोकमत तयार करणे,
येवढेच माझे काम आहे, त्यांत मी जातीभेदाला जागा दिली असे कोणीही – माझा
शत्रूदेखील म्हणणार नाही. मी अस्पृश्य जातीतील सर्वांघरी जेवलो आहे. अस्पृश्यांत
सहभोजन व्हावे. सहविवाह व्हावा याचा पुरस्कार मी केला आहे. आणि सहविवाह जरी जारी
झाला नसला,
तरी चांभार लोक सहभोजनाला तयार नाहीत. पण महारमांगात, महार भंग्यात सरसहा सहभोजन
सुरु आहे. हा माझ्या शिकवणुकीचा परिणाम आहे, असे मी निर्भयपणे म्हणून शकतो. माझ्या
अध्यक्षतेखाली झालेल्या सभांमधून महारांपुरते ठराव कधीच पास झालेले नाहीत,
मी महार जातीचे भांडण भांडलो नाही,
आणि या भांडणांतून जो लाभ झाला त्यांतला मोठा भाग महारेत्तर जातींनी घेतला हेही
सिद्ध करून देता येईल. मी जी बोर्डिंगे काढली त्यांत जातीभेद कधीच ठेवला नाही,
इतर महारांनी जी काढली त्यांत त्यांनीही जातीभेद ठेवलेला माझ्या कानावर आलेला
नाही.
स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे,
असे म्हणण्यात येते. परंतु ते खोटे आहे. स्वतंत्र मजूर पक्षात महार- महारेत्तर असा
भेद नाही. स्वतंत्र मजूर पक्ष जात पाहत नाही,
गुण पाहतो. गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लायकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात
मिळू शकते. राजकारण हे काही पंक्तीभोजन नव्हे. मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या,
भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या,
असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष ,मानीत नाही. कोणताही राजकीय पक्ष माणू शकणार नाही
नुसत्या शिक्षणाला राजकारणात काही महत्व नाही. “ मी ग्रॅज्युएट आहे,
मला कौन्सिलात घ्या”, हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही,
कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही. राजकारणात शिक्षण पाहिजे पण
शिक्षणापैकी शीलाची जास्त जरुरी आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जात,
शिक्षण,
शील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवतो. अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरिता
स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला आहे. त्यात एखाद्या मांगाला जागा मिळाली नसेल. तशी
अस्पृश्यांतील नाशिक जिल्ह्यातील एक सधन व कार्यकर्त्या अमृतराव रणखांभ्यांसारख्या
माणसाला व सातारा जिल्ह्यातील एका सधन गृहस्थाच्या मुलांस स्वतंत्र मजूर पक्षात
जागा मिळाली नाही. यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगांच्या व चांभाराच्या विरुद्ध
आहे, असे म्हणण्यात काही
अर्थ नाही. स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरुद्ध आहे. मग ते कोणत्याही जातीचे
असोत. मांग- चांभार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे किंवा चांभार
जातीचे काही नुकसान झाले आहे, असे मला दिसत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष महारांचा
असला तरी तो महारांकरता भांडत नाही,
तो भांडतो साऱ्या अस्पृश्यांकरता, भांडणामुळे जो लाभ होतो त्याचे वाटप करणे हे
त्यांच्या हाती नाही,
ते हाती आहे कॉंग्रेसच्या, महारांच्या पदरात शून्य,
असे वाटप जर कॉंग्रेसने केले नाही,
तर ती कॉंग्रेस कसली! स्वतंत्र मजूर पक्षाने हानि केली असेल ती महारांचीच. आपण,
महार लोक मांगांवर जुलूम करतात असे लिहिले आहे. तो प्रकार आमच्याकडे नाही,
आमच्याकडे उलट प्रकार आहे. चांभारांनी, मांगांनी काही खोडी काढली तरी महार गप्प
असतात. त्यांना ठाऊक आहे की,
मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही. आणि आपण बहुसंख्याक आहोत तेव्हा सोसले
पाहिजे;
अशी जबाबदारी त्यांना वाटते. आपल्याकडे उलट प्रकार आहे,
याबद्दल खेद वाटतो. महारांविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह
करावा. त्याला माझा पाठींबा राहील.
शेवटी येव करा,
त्येंव करा नाहीतर तुमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे,
तिच्यासंबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले
असते. गोवेकरीण जशी वाटेल तेंव्हा अडते,
किंवा बेगुमान झालेली बायको उल्या,
पुल्या करून, ‘घे मेल्या तुझे मंगळसूत्र’
(असे म्हणून) तोडावयास तयार होते मग कंटाळून ‘जाव जहन्नममे’
अशी म्हणण्याची पाळी (नवऱ्यावर) येते,
तसा प्रकार होऊ देणे बरे नाही. भिन्न मार्गाने जावयाचे असेल तर जावे. त्याला मी
हरकत करू शकणार नाही,
किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावयाचे ते बंदही करणार नाही. मात्र
भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा, मांगाची उन्नति करून त्यांचा स्वाभिमान जागृत करणे, हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो
स्तुत्य आहे. पण महारांशी काडीमोड करून, केवळ सनातनी हिंदू
किंवा कॉंग्रेस यांची गुलामगिरी करणे, हाच जर या भिन्न
मार्गाचा उद्देश असेल, तर त्यांत काही मांग व्यक्तींचा लाभ
होईल, पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे,
यात मला तरी काही शंका नाही, तरी मर्जीनुसार मार्ग चोखाळणे.
पत्र बरेच लांबले, पण आपले उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्माविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही.
२.
यशवंत नरसिंह केळकर,
६-७-१९३६, केसरी
रा.
रा. केसरीकर्ते यांस-
वि. वि. आपल्या तारीख ५ जून १९३६ च्या
अंकात श्री. यशवंत नरसिंह केळकर यांचे पत्र छापण्यात आले आहे. त्यात पेशवाईच्या
अंमलात अस्पृश्यांच्या गळ्यात थुंकण्याकरिता मडकी बांधली जात असत वगैरे जी विधाने
मी माझ्या ‘जातपात तोडक मंडळा’च्या परिषदेकरिता तयार केलेल्या भाषणामध्ये केलेली
आहेत त्यांना आधार दाखवा,
असा प्रश्न त्यांनी मला केला आहे. वृत्तपत्रातील टीकेला उत्तर देण्याचा माझा
शिरस्ता नाही व त्याप्रमाणे या पत्रालाही उत्तर देण्याची माझी इच्छा नव्हती. परंतु
परवा माटे मास्तरांनी जी माझ्या भाषणावर तीन व्याख्याने दिली त्यांत त्या पत्राचा
उल्लेख करून करून त्याला मी उत्तर देऊ शकलो नाही असे सखेदाश्चर्य विधान केलेले
माझ्या पाहण्यात आले. आधार नाही म्हणून उत्तर नाही असा कदाचित माटे मास्तरांप्रमाणे
इतर लोकांचा गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून उत्तर देणे आवश्यक आहे असा काही
मित्रांचा आग्रह असल्यामुळे मी. रा. केळकर यांच्या पत्राला उत्तर देत आहे.
पेशव्यांच्या काळात हातात काळा दोरा,
गळ्यात मडके व कंबरेला कुंचा वागवण्याची अस्पृश्य लोकांवर सक्ती केली जात असे ही
कथा अस्पृश्य लोकांमध्ये कितीतरी दिवसांपासून प्रसृत झालेली आहे. ‘यत्र धूमस्तत्र
वह्नि:’ या न्यायाने पाहता ही जी दंतकथा सर्व अस्पृश्य लोकांत पसरलेली आहे व जिचा
अनुवाद (उल्लेख) अस्पृश्य लोकांतील वयोवृद्ध लोकांनी केलेला मी स्वत: ऐकला आहे,
त्या दंतकथेला सत्याचा आधार काहीच नसेल असे मला तरी निदान म्हणता येणार नाही,
दंतकथा ही इतिहासाच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे असे सर्व इतिहासज्ञ मान्य
करतात,
ही गोष्ट रा. केळकर यांना नाकबूल करता यावयाची नाही. सर्वच गोष्टीला इतिहासाचा
पुरावा देणे शक्य होणार नाही. निदान हिंदुस्थानात तरी ते अशक्य आहे.
हिंदुस्थानातील लोकांना घडलेल्या गोष्टींची नोंद करून ठेवण्याची सवय नाही आणि
म्हणून बऱ्याचशा घडलेल्या गोष्टी घडल्या असल्या तरी त्याला लेखी पुरावा देता येत
नाही. शिवाय हल्ली जे इतिहाससंशोधक आहेत ते सर्वच सद्सदविवेकबुद्धीला जागून खरा
इतिहास बाहेर पाडतील अशी फारशी आशा मला तरी वाटत नाही. आपल्या जातीचा इतिहास
उज्ज्वल राहावा या हेतूने पुष्कळ इतिहाससंशोधकांनी हिंदू समाजातील अंतरव्यवस्थेवर
प्रकाश पाडणाऱ्या काही महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ केल्याचे मी ऐकले आहे.
तसेच काहीजण आपल्याजवळ असलेले कागदपत्र
प्रसिद्ध करण्यास तयार नसल्याचेही मी ऐकले आहे. पुण्यात पेशवाईत काही सोनार
लोकांनी आपण दैवज्ञ ब्राह्मण आहोत असा आग्रह धरून आपली धर्मकृत्ये वेदोक्त रीतीने
केली. ही गोष्ट पेशव्यांना कळल्यानंतर त्यांनी ज्या दैवज्ञ ब्राह्मणांनी वेदोक्त
रीतीने धर्मकृत्ये केली त्यांच्या जीभा कापण्याचा हुकूम केला व ही सजा अंमलात
आणण्याचा अधिकार कराड येथील ब्राह्मणांवर सोपविला. या हुकुमान्वये कराड येथील
ब्राह्मणांनी दैवज्ञ ब्राह्मणांच्या जिभा कापल्या व त्याप्रमाणे पेशव्यांना
कळविले. या प्रकरणाचे कागदपत्र एका ब्राह्मणाजवळ असल्याचे व आपण वाचल्याचे मला
माझ्या एका मित्राकडून कळले आहे. परंतु ज्याच्याजवळ ते कागद आहेत तो गृहस्थ ते
प्रसिद्ध करण्यास तयार नाही. अशी परिस्थितीत प्रत्यक्ष कागदपत्राचा पुरावा कोणास
कसा देता येईल?
व मला जर माझ्या विधानांना प्रत्यक्ष कागदपत्रांचा पुरावा देता आला नाही तर त्यात
नवल काय?
तथापि माझ्या विधानाच्या समर्थनार्थ मला जरी प्रत्यक्ष पुरावा देता आला नाही तरी
एका मोठ्या सन्माननीय विद्वान व्यक्तीचा हवाला देता येण्यासारखा आहे. रा. यशवंत
नरसिंह केळकर यांनी ‘मराठ्यांच्या संबंधाने उद्गार’ या कै. राजाराम रामकृष्ण भागवत
यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पान १०८ वर नजर फेकली तर मी केलेली विधाने काही
भरमसाट लिहिण्याच्या हेतूने केलेली नसून त्यांना कै. राजाराम रामकृष्ण भागवत यांचा
आधार आहे असे दिसून येईल.
३.
श्रीपाद दामोदर
सातवळेकर, पुरुषार्थ,
जानेवारी १९३६
रा. रा. श्रीपाद दामोदर सातवळेकर,
संपादक पुरुषार्थ,
यांस अनेक जोहर. आपल्या पुरुषार्थ मासिकाचा नोव्हेंबर महिन्याचा अंक मला पोहोचला.
त्यातील ‘आंबेडकरांचे कर्तव्य’
या शीर्षकाखाली लिहिलेला आपला लेख मी वाचून पाहिला. त्याच्यानंतर दोन दिवसांनी
आपले ता. २. १२ चे पत्र आले. आपल्याप्रमाणे इतर हिंदू लोकांनीही माझ्या
धर्मांतरासंबंधाने बरेवाईट विचार प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आलेले आहेत. परंतु
त्यापैकी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. इतर लेखकांनी जे
लिहिलेले आहे. त्यापेक्षा आपल्या लेखात विशेष असे मला काही दिसून आले नाही आणि
म्हणूनच आपले पत्र येईपर्यंत आपल्या लेखाला उत्तर देण्याचे कधीच माझ्या मनात आले
नव्हते. तथापि ज्याअर्थी उत्तर यावे अशी मागणी केली आहे व त्यास प्रत्युत्तर
देण्याची आपण जी उत्कंठा व्यक्त केली आहे,
त्याअर्थी आपली निराशा करू नये एवढ्या कारणाकरिता आपल्या लेखासंबंधाने मला काय
वाटते,
ते मी आपणास लिहून कळवीत आहे.
मी धर्माकरिता धर्मांतर करीत नसून
व्यावहारिक फायद्याकरिता ते करीत आहे,
असा माझ्यावर जे लोक आक्षेप करतात,
त्यांपैकी आपण एक नाही, हे वाचून मला आनंद वाटतो. नफातोटा पाहून धर्मांतर करायचे
ते करा,
असा आपला सल्ला आहे. त्याची यथार्थता मला पटते. मी ते विसरलो नव्हतोच. पण आपण आठवण
दिली,
हे बरे केलेत. या धर्मांतराच्या सौद्यामध्ये जमाखर्चाचा जो तक्ता माझ्या
समजुतीप्रमाणे मी तयार केला आहे. त्यात तोट्यापेक्षा नफा मला जास्त दिसतो. परंतु
आपल्या म्हणण्याप्रमाणे नफ्यापेक्षा तोटाच जास्त आहे हे जरी खरे धरले,
तरी ज्या कारणांमुळे मी धर्मांतर करू नये असे आपण म्हटले आहे ते खरे आहे. परंतु
माझे महारपण नाहीसे झाल्यानंतर माझे मोठेपण लयास जाईल असे जे मत आपण व्यक्त केले
आहे, ते एक तर माझ्या
विद्वत्तेसंबंधी आपल्या अज्ञानाचे द्योतक असावे किंवा ब्राह्मणेत्तरांच्या विद्वतेसंबंधाने
ब्राह्मणांच्या मनात वसत असलेल्या क्षुद्र बुद्धीचे द्योतक असावे. माझे महारपण
गेले तरी माझी विद्वत्ता कायम मजजवळ राहणार आहे व ती काही लहानसहान नाही. ब्राह्मण
जातीच्या विद्वानांच्याबरोबर मला तागडीत घातले असताना माझे पारडे कमी भरेल ही आपली
भीती निरर्थक आहे. त्या विषयात पारंगत असलेल्या ब्राह्मण जातीतील कोणत्याही
व्यक्तीशी मी बरोबरी करू शकेन अशी माझी
खात्री आहे. केवळ महार म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये मला जागा मिळाली हे खरे
असू शकेल. परंतु त्यातून काय सिद्ध झाले याचा पुरावा तपास आपण केला असता तर असे
खुळे व वेडगळ विचार आपण पुढे मांडले नसते. म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये
हिंदूमधल्या गाजलेल्या व्यक्ती होत्या. त्यांत पुण्यातील ब्राह्मण जातीचे शिरोमणी
तात्यासाहेब केळकर हेही होते. मांडीला मांडी लावून बसण्याचा योग सुदैवाने उभयतांस
लाभला होता. त्याप्रसंगी मला त्यांची विद्वत्ता आणि त्यांना माझी विद्वत्ता ताडून
पाहण्याची वेळ आली होती. त्यावेळच्या अनुभवावरून त्यांच्यापेक्षा विद्वत्तेने
किंवा बुद्धिमत्तेने कमी आहे असे माझ्या स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. तेव्हा केवळ
माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मला जे स्थान मिळेल ते मोठेच मिळेल,
याच्याबद्दल मला काही शंका नाही. आडपडदा न ठेवता एवढे स्पष्ट लिहिण्याचे काही
प्रयोजन नव्हते. परंतु आपल्यासारख्या ब्राह्मणाशिवाय दुसऱ्या कोणाही जातीच्या
लोकांत बुद्धिमत्ता,
विद्वत्ता नाही अशा दुर्मदाने माखलेल्या लोकांचा भ्रम नाहीसा करण्याकरिता तसे
लिहिणे आवश्यक झाले,
याबद्दल खेद वाटतो. माझे मोठेपण कायम राखण्याकरिता आपण जी चिंता प्रगट केली
त्याबद्दल आपला मी आभारी आहे. मी कोठेही गेलो तरी माझ्या विद्वत्तेनुरूप व
बुद्धीमत्तेनुरूप जे मोठेपण मला प्राप्त व्हावयाचे ते होईलच, याबद्दल आपण कसलीच
चिंता बाळगू नये. परंतु अस्पृश्यांत राहिल्याशिवाय माझे मोठेपण राहणार नाही,
हे जरी खरे धरले तरी माझे मोठेपण कायम राहण्याकरिता अस्पृश्य लोकांनी अस्पृश्यच
राहावे,
ही विचारसरणी अत्यंत विलक्षण, नव्हे वेडसरपणाची आहे,
असे मला वाटते. आपल्या जातीचा व आपला मोठेपणा रहावा,
याकरिता बाकीच्या लोकांना खाली कायमचे दडपून ठेवणे हा ब्राह्मणादी तत्सम जातींचा
शिरस्ता होऊन बसला आहे. तसे जर नसते तर ब्राह्मणादी तत्सम जातींनी इतर जातींचा
उद्धार करण्याकरिता त्या जाती आपल्या बरोबरीच्या होऊन आपला दर्जा कमी होईल अशा
भीतीने केव्हाही कच खाल्ली नसती. परंतु आपले महत्व राखण्याकरिता दुसऱ्यांना नरकात
डांबून ठेवणाऱ्या लोकांना मी नीच कोटीतील लोक समजतो. तशा नीचांपैकी मी नाही याची
आपल्याला जाणीव नाही,
असे वाटते. माझे महत्व जरी बुडाले तर बुडो,
परंतु आमचे लोक वर यावेत हीच माझी एक भावना आहे,
याशिवाय दुसरी भावना नाही याची आपण खात्री बाळगावी.
‘स्पृश्य लोक जाती लवकर मोडतील,
पण अस्पृश्यच जाती सोडावयास तयार होणार नाहीत’
हे आपले म्हणणे खरेही असू शकेल. परंतु ‘ अस्पृश्यांतील जातिभेद मोडा,
मग सर्व जाती मोडण्याचा प्रश्न हिंदूमहासभेपुढे मांडा’
असे जे आव्हान मला केले आहे,
ते आव्हान स्वीकारण्यास मी राजी आहे. अस्पृश्यांतील जातिभेद मोडण्यास मी माझी
पराकाष्टा करण्यास तयार आहे. परंतु जोपर्यंत अस्पृश्य समाज हिंदू समाजातील
जातिभेदाच्या तांगडातांगडीत जखडून गेला आहे,
तोपर्यंत त्या कार्याला कधीही यश येणे शक्य नाही. अस्पृश्यांतील जातिभेद मोडण्याला
त्यांनी हिंदू धर्मातून फुटून निघणे हाच एक मार्ग आहे. महारांत जातिभेदाचे खूळ आहे
हे दाखविण्याकरिता आपण महारणीशी संबंध असलेल्या ब्राह्मणाचे जे सातारा जिल्ह्यातील
उदाहरण दिले त्याचा अर्थ मला काही समजत नाही.
महारणीशी लग्न करून तो ब्राह्मण राहिला असताना जर त्याला महारांनी घेतले
नसते,
तर महारांकडे दोष आहे असे मी मानले असते. परंतु जारकर्मी ब्राह्मणाला महारांनी
अपंक्त ठरविला,
त्यात त्यांनी वाईट काय केले,
हे मला समजत नाही. ‘ब्राह्मण झाला भ्रष्ट तरि तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’
ह्या ब्राह्मण उक्तीप्रमाणे त्या जारकर्मी ब्राह्मणाला श्रेष्ठच मानावयास पाहिजे
होते,
असे आपले म्हणणे असल्यास ते कोणाही नीतिमान पुरुषास पटणार नाही असे मला वाटते.
‘आम्ही हिंदू आहो,
हिंदूबरोबरच जगणार व हिंदूबरोबरच मरणार. हिंदू लोक आम्हांस जसे ठेवणार असतील तसे
ठेवोत,
पण आम्ही हिंदूंची,
हिंदू धर्माची,
हिंदू देवतांची अब्रू राखण्यासाठीच आपले सर्वस्व अर्पण करणार’
अशी घोषणा अस्पृश्यांनी करीत राहावी, म्हणजे हिंदूंच्या मनाला द्रव फुटून हिंदू
लोक अस्पृश्यांकरिता पुष्कळसे काही करतील असा जो आपण पोक्तपणाचा सल्ला दिला आहे,
तो दुसऱ्या कोणातरी अस्पृश्य पुढाऱ्याला पटेल,
पण मी तो पत्करू शकणार नाही. एक तर आपला अनुभव माझ्या अनुभवाशी जुळता नाही. दाढीला
हात लावून हिंदूंनी मोठेसे औदार्य दाखविले आहे असे एखादेदेखील उदाहरण मला आढळत
नाही. पण त्यांची शेंडी धरून त्यांच्याकडून बरेचसे करवून घेतल्याची अनेक उदाहरणे
माझ्या अनुभवावरून सांगता येतील. शिवाय हिंदू धर्म हा माझ्या मते धर्म नसून
लोकांना वेडे करण्याची ही एक जडी आहे. हिंदू समाज हा वेडसर लोकांचा समाज आहे. असा
वेडसर लोकांत राहण्याचा माझा इरादा नाही. अर्थात त्यांची मनधरणी करण्याची मला
जरुरी नाही.