सोमवार, २९ मे, २०२३

शाहू महाराज आणि सार्वजनिक आरोग्य


         कोविड महामारीच्या निमित्ताने मागील तीन वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्याविषयी बरीच चर्चा झाली. आपल्या इतिहासात सार्वजनिक आरोग्याची स्थिती काय होती यापासून ते वर्तमान काळात सार्वजनिक आरोग्य कसे असायला हवे येथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झाली. त्यामुळेच आपल्या समाजातसार्वजनिक आरोग्य चांगले असायला हवे. त्यासाठी विशेष तरतूदी केल्या पाहिजेत आणि धोरणे आखली पाहिजे अशाही चर्चा सामाजिक स्थरावर नागरिकांमध्ये होतांना दिसत आहेत. म्हणूनच, स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराजांची सार्वजनिक आरोग्य विषयक भूमिका काय होती आणि त्यांनी त्यांच्या संस्थानात आरोग्याचा प्रश्न कसा हाताळला हे या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.            

         शाहू महाराज हे सामाजिक न्यायचे जनक म्हणून ओळखले जातात. ‘सार्वजनिक आरोग्य हेही सामाजिक न्यायाचा अविभाज्य घटक आहे. कारण, आजही आपल्या देशात बहुसंख्य लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळत नाहीत. जनतेच्या शारीरिक आरोग्याकडेच एवढे दुर्लक्ष केले जाते की, त्यामुळे मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य हे तर कोणाच्याही खीजगणतीत नाही असेच नाईलाजाने  म्हणावे लागते अशी सार्वजनिक आरोग्याची स्थिती आहे. म्हणूनच, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हा सामाजिक न्यायापासून वेगळा करता येत नाही. लोकांचा आरोग्याचा हक्क नाकारणे म्हणजे त्यांना समाजिक न्यायापासून वंचित ठेवणे असे मला वाटते. सार्वजनिक आरोग्यामध्येस्त्रीआरोग्याचा अत्यंत महत्वाचा आहे कारण अजूनही आपल्या स्त्री आरोग्याच्या गंभीर आणि भयानक समस्या सर्व सामाजिक स्तरांमध्ये आणि गावांसोबत शहरांमध्येही आहेत. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात स्त्रीआरोग्याकडे विशेष लक्ष पुरविले होते. त्यांनीआंतरजातीयआंतरधर्मीय नोंदणी विवाह कायदा (१९१९), स्त्रियांच्या छळवणूकीस प्रतिबंध करणारा कायदा (१९१९), विविध जातीधर्मियांसाठी काडीमोड कायदा (१९१९) आणि अनौरस संतती जोगातिणी यांच्या विषयीचा कायदा (१९२०) असे कायदे करून स्त्रियांच्या शोषणाला आणि दुय्यमत्वाला जसा धक्का दिला तसेच, स्त्रियांसाठी विशेष तरतूदी करून स्त्रियांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले. त्याचीही चर्चा आपण सदरील लेखात करणात आहोत.

छत्रपती शाहू महाराज आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न

           कल्पना मेहतांनी स्टडी ऑफ पब्लिक हेल्थ इन कोल्हापूर स्टेट (१८५८-१९४४)’ या पीएचडी शोधप्रबंधांमध्ये एक स्वतंत्र प्रकरण शाहू आणि सार्वजनिक आरोग्य यावर केले आहे आणि त्यामध्ये शाहू महाराजांनी केलेल्या सार्वजनिक आरोग्यविषयक कार्याची सविस्तर आणि विस्तृत चर्चा आहे. शाहू महाराजांचे राज्यरोहन झाल्यावर दोन वर्षात त्यांना अनेक सार्वजनिक आरोग्याच्या संकटांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. प्लेगची साथ सर्वत्र होती. म्हणून, डिसेंबर १८९६ पासून मदत कार्य करायास सुरुवात केली ती नोव्हेंबर १८९७ पर्यंत चालू होती. कोल्हापूर संस्थानाच्या सर्वच सीमांवर त्यांनी निरीक्षण शिबिरे लावली आणि येणाऱ्या सगळ्या लोकांची तपासण्या केल्या. लोकांच्या सीमेवरच राहण्याची व्यवस्था केली. तसेच, लोकांना  सगळ्या प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. धान्य स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले होते. कपडे, पांधरून, भांडी आणि अन्न सुद्धा शाहू महाराजांनी पुरविले.

        संस्थानातील सर्वधर्मीय उत्सव आणि यात्रा यांना तात्पुर्ती बंदी केली. उदा. जोतिबाची यात्रा आणि हज यात्रा. तसेच, बंदिवासातील ज्या गुन्हेगारांनी प्रतिबंधक लस टोचून घेतली अशा मंडळींची दोन महिन्यांची शिक्षा कमी केली. सोबतच, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी प्रतिबंधक लसी टोचून घेतल्या त्यांनाही विशेष सवलती दिल्या. अशा प्रकारे विविध मार्गांनी शाहू महाराजांनी लोकांचे लसीकरण घडवून आणले.

       १८९६ प्रमाणेच १८९९-१९०१, १९०७, १९१४ मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सार्वजनिक आरोग्याची संकटे कोल्हापूर संस्थानात निर्माण झाली. परंतु, स्वतः शाहू महाराजांनी आणि त्यांच्या प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळल्यामुळे जास्त नुकसान होवू शकले नाही म्हणूनच ब्रिटीश सरकारने शाहू महाराजांची प्रशंसा करत म्हटले होते की, शाहू महाराजांनी काटेकोर उपाययोजना केल्यामुळे कोल्हापूर संस्थान दुसरे सांगली किंवा कराड बनले नाही. . शाहू महाराजांनी सार्वजनिक आरोग्याची संकटे असतांना जनतेला उद्देशून अनेक जाहीरनामे काढले. कोल्हापूर शहरात प्लेग पसरण्याआधीच लोकांना शहर सोडून बाहेर राहायला सांगितले. त्यामुळे, कमी लोक दगावले. तसेच, त्यांनी संपूर्ण शहर निर्जंतुक करून घेतले आणि त्यासाठी जाहीरनाम्याद्वारे नियम प्रसिध्द केले. त्यामध्ये घर, धान्य, कपडे, लोखंडी- लाकडी दगडी समान याचा वापर नंतर कसा करावा याचीही माहिती लोकांना देण्यात आली. तसेच, प्लेगच्या भीतीमुळे लोक गाव सोडून गेल्यामुळे त्यांच्या सगळ्या संपत्तीचे म्हणजेच दागदागिने, दस्तऐवज, रोकडरक्कम इत्यादींचे सरकारकडून संरक्षण करण्याची व्यवस्था जाहीर करणारा जाहीरनामाही शाहू महाराजांनी काढला. सार्वजनिक आरोग्याच्या संकटाच्या काळी अशा वेगवेगळ्या गोष्टी करून शाहू महाराजांनी जनतेचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण केले. या संकट काळातच सार्वजनिक आरोग्याच्या कोल्हापूरात एक दिशा मिळाली. त्यातूनच सार्वजनिक आरोग्याची एक चांगली व्यवस्था निर्माण झाली. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्त्री आरोग्याच्या क्षेत्रात झालेली प्रगती.

डॉ. कृष्णाबाई केळवकर आणि कोल्हापुरातील स्त्री आरोग्य

      कृष्णाबाई डॉक्टर होण्याच्या आधीपासूनच शाहू महाराजांचे लक्ष स्त्रियांच्या आरोग्याकडे होते. कित्येक स्त्रिया या बाळंतपणात दगावतात, हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळेच त्यांनी १८९७ मध्येप्रसूतिविद्या या डॉ. विष्णू गोपाळ आपटे लिखित पुस्तकाची जाहिरात कोल्हापूर संस्थानात केली. होती आणि त्यामध्ये म्हटले होते की,प्रत्येक गृहस्थाश्रमी लोकांनी निदान एक वेळ तरी पुस्तक वाचून ठेवावे हे बरे; कारण कुटुंबी मनुष्यास याची हमेशा जरूर आहेच.’ सोबतच, स्त्रिया आपली दु:खे, आजारपण, प्रसूतिच्या वेदना पुरुष डॉक्टरांना सांगत नाहीत आणि त्या मृत्यूमुखी पडतात. यावर काहीतरी उपाय करून स्त्रियांना यातून वाचविले पाहिजे असे शाहू महाराजांना वाटले. म्हणून, त्यांनी आपल्या अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्त्री डॉक्टरची नेमणूक करायची ठरवले. त्याकाळात स्त्रीडॉक्टर नव्हत्या. त्यावेळी डॉ. आनंदीबाई जोशी यांची माहिती शाहू महाराजांना मिळाली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे डॉ. आनंदीबाईंकडे भारतात परत येण्यासाठीचे पैसेही नव्हते. त्यावेळी, शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत आणि भारतात परत येण्यासाठीचे तिकीटही पाठवले. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र स्त्रीविभाग काढून त्याची जबाबदरी डॉ. आंनदीबाईंकडे देण्याचे शाहू महाराजांनी ठरवले होते आणि तसे पत्रही त्यांना पाठवले होते. परंतु, मुंबईत आल्यावर डॉ. आनंदीबाईंचा आजार विकोपाला गेला आणि त्यांचे निधन झाले.

        डॉ. कृष्णाबाई केळवकर यांच्या निमित्ताने स्वतंत्र स्त्रीविभाग काढण्याचे शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले. कृष्णाजी आणि रखमाबाई केळ्वकर यांची मुलगी म्हणजे कृष्णाबाई. कृष्णाबाईंचा शिक्षणासाठीचा एक स्वतंत्र संघर्ष आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संकटांना सामोरे जावे लागले आहे. त्या सगळ्यांबर मात करून त्या यशस्वी डॉक्टर झाल्या आणि त्यामध्ये शाहू महाराजांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे. अलीकडेच वसुधा पवार लिखितडॉ. कृष्णाबाई केळवकर : जीवन आणि कार्य हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये कृष्णाबाईंची जीवनगाथा वाचायला मिळेल. १८९६ मध्ये कोल्हापूर सरकारची शिष्यवृत्ती मिळवून कृष्णाबाई मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनी म्हणून गेल्या आणि १९०१ मध्ये वैद्यकीय शिक्षण संपवून कोल्हापूरात आल्या. कारण, शिष्यवृत्ती देतांना कोल्हापूरात येवून डॉक्टर म्हणून आपली सेवा द्यावी लागेल अशी अट होती.

       डॉ. कृष्णाबाई कोल्हापूरात आल्यावर अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. हॉस्पिटलमध्ये त्यांनी आरोग्यसेवा सुरु केली. काही दिवसातच त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग हवा, असा हट्ट शाहू महाराजांकडे धरला. शाहू महाराजांनी त्याला तत्काळ मान्यता देवून त्याची अंमलबजावणी केली. आरोग्यसेवा देत असतांना त्यांना जाणीव झाली की, कोणत्याही रोगावर हमखास इलाज करण्यासाठी आपण अजूनही अभ्यास करायला हवा आहे त्यासाठी अद्यायावत उच्च शिक्षण प्राप्त करावे आणि म्हणून त्यांनी इंग्लंडला जाऊन F. R. C. S. करण्याचे ठरवले. त्यासाठीची त्यांना इंग्लंडमधील शिष्यवृत्तीही मिळाली पण जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था केली.

       इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांना पाहिजे तो कोर्स करता आला नाही कारण, त्यासाठी कमीत कमी २४ वर्ष वय पाहिजे होते. परंतु, त्यावेळी डॉ. कृष्णाबाई या फक्त २२ वर्षाच्या होत्या. रिकाम्या हाती परत जायचे नाही म्हणून त्यांनी आर्यलंडमधील डब्लिन शहरात जाऊनमिडवायफरी चा डिप्लोमा केला आणि कोल्हापूरात परत येवून पुन्हा सेवेवर रुजू झाल्या. उच्चशिक्षण घेवून आल्यावर त्यांच्या निरीक्षणात आले की, हॉस्पिटलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आहे. नर्सेस अनुभव नसलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडून रुग्णांची हेळसांड होत आहे आणी आपल्याला तज्ञ नर्सेस आवश्यक आहेत. म्हणून, त्यांनी १९१७ मध्ये शाहू महाराजांना सांगून हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा नवीन कोर्स सुरु केला. डॉ. कृष्णाबाईंच्या आरोग्यसेवेचे काम पाहून ब्रिटीश सरकारने त्यांना त्यावेळची भारतातील सर्वोच्च पदवीकैसर- हिंद देवून त्यांचा गौरव केला. शाहू महाराज ही नेहमी हॉस्पिटल भेट देवून त्यांचे काम पाहत असत. डॉ. कृष्णाबाई केळवकारांना ब्रिटीश सरकारचा पुरस्कार मिळाला म्हणून कोल्हापूरच्या जैन सभेच्या स्त्रियांनी त्यांचा सत्कार केला आणि मानपत्र दिले. त्या मानपत्रात लिहिले आहे की,हॉस्पिटलमध्ये आपली नेमणूक केल्यामुळे रोगी बायकांची फार सांगली सोय झाली आहे. याबद्दल श्रीमन्महाराज छत्रपतीसाहेब सरकार करवीर यांचे आम्ही ऋणी आहोत.”

       जैन सभेच्या महिललांनी मानपत्रात जे लिहिले आहे. त्यावरून आपणास स्त्री आरोग्याच्या क्षेत्रात किती मोठा बदल डॉ. कृष्णाबाईंच्या नेमणूकीमुळे झाला हे दिसून येते. तसेच, शाहू महाराजांमुळेच हे होवू शकले असेही त्यात म्हटले आहे आणि त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. यावरून शाहू महाराजांचे स्त्रीआरोग्याच्या क्षेत्रातील योगदान ठळकपणे स्पष्ट होते. म्हणूनच, त्यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने त्यांचा सार्वजनिक आरोग्यचा आणि स्त्री आरोग्याचा वारसा आपण जपला पाहिजे. वाढवला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण, आज त्याची कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गरज आहे


पूर्वप्रसिध्दी - मिळून साऱ्याजणी, मे २०२३ 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...