मंगळवार, २० जून, २०१७

वारी : एक संस्कृती अभ्यास



                                      

वारी :  एक संस्कृती अभ्यास
- देवकुमार अहिरे

               महाराष्ट्रातील सांस्कृतिक संघर्षाचा आणि संवादाचा विचार करतांना आपणास वारी आणि वारकरी धर्म याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि लोकजीवनात वारीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे दरवर्षी लाखोंनी लोक वारीमध्ये सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा मानबिंदू म्हणजे वारी होय. लोकसंस्कृती म्हणून वारी ही समाजमनात रुजलेली तर आहेच पणत्याचवेळी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय लढ्याची युद्धभूमी सुद्धा बनलेली आहे. सध्याच्या काळात वारीवरून इतरांप्रमाणेच डिजिटल स्पर्धासुद्धा मोठ्या जोमाने सुरु झालेली दिसते. यातून एक वेगळ्याचप्रकारची संस्कृती वारीमध्ये शिरकाव करत आहे. लोकानुरंजनवादी संस्कृती म्हणूनसुद्धा आजकाल तुम्ही वारीचा विचार करू शकता आणि सोबतच पर्यायी संस्कृती म्हणून तुम्ही वारीकडे पाहू शकता.
              संस्कृती ही व्यापक मुल्यवाचक संकल्पना आहे. त्यामुळे संस्कृतीचा विचार करतांना नेहमी स्थानाचा, संदर्भाचा आणि काळाचा विचार करावा लागतो अन्यथा संस्कृतीच्या अभ्यासात अनेक अडथळे निर्माण होवू शकतात. कारण, संस्कृती ही नेहमी प्रवाही असणारी गोष्ट आहे. म्हणून सर्वसामान्यपणे संस्कृतीची व्याख्या करतांना “मानवी जगण्याचा व्यवहार म्हणजे संस्कृती” अशी केली जाते. आर्नोल्ड टोयम्बी यांच्यासारखे इतिहासकार संस्कृतीला मानवीजीवनातील महत्वाचा भाग मानतात. त्यांच्यामतानुसार संस्कृतीचा उदयास्त म्हणजे इतिहास होय. संस्कृतीचा संघर्ष म्हणजे काय? हा प्रश्न आपणास पढू शकतो. एकाचवेळी अनेक संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास होत असतो. प्रदेश, समूह, देश, भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती यांचा संस्कृतीच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्याठिकाणी संस्कृतीचा उदय होतो किंवा एकाचठिकाणी वेगवेगळ्यावेळी संस्कृतीचा उदय होत असतो त्यामुळे सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता असते. परंतू वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नेहमी फक्त सांस्कृतिक संघर्षच होत नाही तर बहुतेकवेळा सांस्कृतिक संवाद आणि सांस्कृतिक समन्वयसुद्धा होतो. वारीचा विचार करतांना आपणास आधी वारकरी धर्म समजून घेतला पाहिजे. वारकरी धर्मासोबातच भागवत धर्म आणि भक्ती यांचा विचार करावा लागतो. भारतीय धर्म आणि दर्शनात जो संस्कृत संघर्ष आणि संवाद झाला त्याचे प्रतिरूप म्हणजे वारकरी धर्म होय म्हणूनच त्याच्या प्रणेत्याला रा. चिं. ढेरे हे विठ्ठल: एक महासमन्वयक असे म्हणतात. कोणाला वारकरी धर्मात वैदिक परंपरा दिसते तर कोणाला अवैदिक जैन-बौद्ध परंपरा दिसते. कोणी शैव म्हणते तर कोणी वैष्णव म्हणतात तर कोणी हरिहर म्हणतात. वारकरी धर्माचा आणि विठ्ठलाचा शोध आणि उगम याविषयी अनेकांचे वेगवेगळे दावे आहेत. अजूनही हाच खरा आणि हा खोटा हे सिद्ध झालेले नाही आणि ते होणारही नाही. कारण विठ्ठल या लोकदेवाताची लोकप्रियता वाढल्यामुळे त्या-त्याकाळातील वर्चस्व आणि प्रभूत्वशाली विचारसरणी आणि दर्शनांनी विठ्ठलाला आपलेसे करून घेतले आहे आणि ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.
           ११ व्या शतकात भक्ती या संकल्पनेला दर्शनात आणि धर्मात महत्व आलेले दिसते. वैदिक अनाचाराला विरोध म्हणून जैन-बौद्ध परंपरा निर्माण झाल्यात त्यांनी एक वेगळा विचार दिला. नंतरच्या काळात त्यांच्यात कर्मकांड निर्माण झाल्यावर शैव-वैष्णव परंपरा विकसित झाल्यात त्यांनाही तात्विक विरोध म्हणून सिद्ध-नाथ परंपरा विकसित झाली. त्यांच्या पुढचा अविष्कार म्हणजे भक्ती साधना होय. पूर्वाश्रमीच्या नाथपंथीय ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला. ज्ञानेश्वरांनी पाया रचल्यानंतर तुकोबा कळस होईपर्यंत अनेक जात-वर्गीय संत या भागवत धर्मात होवून गेले. तुकोबांच्या निधनानंतर वारीची परंपरा सुरु झाली. ती आजतागायत चालू आहे. मधल्या काळात पेशवाईत काही समस्या निर्माण झाल्या होत्या. दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरची वारी असते. महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात बहुजन-शेतकरी-कष्टकरी जातवर्गातील स्त्री-पुरुष मोठ्याप्रमाणात वारीमध्ये सहभागी होतात.

लोकसंस्कृती:
         महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक वारीच्या या सोहळ्यात सहभागी होत असतात. या सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये शेतकरी वर्गातील लोकांचा मोठा सहभाग आहे. विठ्ठलाजवळ आपले गाऱ्हाणे मांडायला आम्ही जातो असे अनेक शेतकरी सांगतात. विठ्ठल हा महाराष्ट्राचा लोकदैवत आहे. विठ्ठल हा लोकांचा देव असल्याने लोकांशी संवाद साधतो. भक्तांच्या कामात मदत करतो. भक्ताच्या शिव्या खातो. भक्तांना घाबरतो. वारकरी संताच्या अभंगाचा जर आपण अभ्यास केला तर आपणास जाणवेल कि, भक्ताचा  विठ्ठलसोबत कोणत्यापातळीवर संवाद होत होता. सावता माळी, गोरोबा कुंभार, चोखा महार,जनी दासी, सेना न्हावी या संतांना विठ्ठल कामात मदत करतो तुकाराम तर विठ्ठलाला शिव्या घालतो आणि नामदेव चोख्याची बाजू घेवून विठ्ठलाशी भांडतो. या सर्व उदाहरणांवरून आपणास स्पष्ट होईल कि, विठ्ठल हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा कसा भाग झाला आहे. कीर्तन आणि प्रवचन ही वारकरी धर्माची देन आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्षापासून शेकडो कीर्तने होत आहेत. त्यातून वारकरी संतांचा विचार पसरविला जात आहे. अनेक लोकांनी यावर आक्षेपसुद्धा घेतलेले आहेत. विशेषत वसाहतीक काळात वारकरी चळवळीने  लोकांना निवृतीमार्गी बनविले त्यामुळे आधी मुसलमानाचे आणि मग इंग्रजांचे राज्य आले असे आरोप इतिहासाचार्य राजवाडेंनी केला. २० व्या शतकात अनेक वारकरी संत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले दिसतात. वसाहतीककाळातच वारकरी चळवळीचे वैदिकीकरण करायला सुरुवात झाली याला  व्यापक 'वसाहतीक धर्मचिंतन' कारणीभूत होत असे अभ्यासक म्हणतात. त्याचवेळी विठ्ठलाच्या वैदिकीकारणाला मुकुंदरावपाटील यांनी विठोबाची शिकवून लिहून प्रश्नांकित केलेले दिसते. 

पर्यायी संस्कृती:
              लोकसंस्कृतीचा विचार करतांनाच आपण वारीच्या आणि वारकरी धर्माच्या सांस्कृतिक राजकारणावर काही प्रमाणात बोललो आहोत. महाराष्ट्रातील जातीयसंघर्षात वारीला दलितवर्गाने विषेत: आंबेडकरोत्तर चळवळीने वारीला अभिजनाची संस्कृती म्हणूनच पहिले परंतू त्यात तेवढे तथ्य नाहीये. वारकरी धर्मात आणि वारीत मोठ्याप्रमाणात बहुजन समाज सहभागी होत असतो. सगळ्याच जातींचे संत या परंपरेत होवून गेल्यामुळे एका व्यापक तात्विक बैठक या धर्मपरंपरेला आहे. ११ व्या शतकात सर्व शिकवणूक आणि धार्मिक चर्चा ही संस्कृतमधूनच होत असल्याने समाजातील मोठा वर्ग त्या चर्चेला मुकलेला होता. त्यामुळे लोकभाषेच्या माध्यमातून धर्मचर्चा आणि ईश्वराची आराधना करता येतो. सोबतच सर्वसामान्य माणूससुद्धा ईश्वराची आराधना करू शकतो हा विचार त्यातून विकसित झाला आणि आग मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठींबा या विचारला मिळाला त्यामुळे अनेक लोकांनी या विचारांकडे पर्यायी दृष्टिकोन म्हनून पहिले आहे.
            भारतीय समाज जातीय विषमतेवर आधारलेला आहे. ही जातीय विषमता काहीप्रमाणात कमी करण्याचे काम संतांनी केले. सगळ्याच जात-धर्मातील लोक संत होवून अभंग रचणे हे त्याकाळच्या संदर्भात खूपच मोठी गोष्ट होती. आज काही लोक संतानी जातीव्यवस्था नष्ट केली नाही सा आरोप लावतात. आरोप करताना त्यांनी जातीव्यवस्थेचे राजकीय अर्थशास्त्र  लक्षात घेतलेले नसतात. संतांच्या काळात वेगळी प्रकारची उत्पादन व्यवस्था विकसित झालेलीच नवती त्यामुळे जातीआधातीत उत्पाधनव्यवस्थेला धक्का बसलाच नाही.परंतू तरीही धार्मिक आणि आध्यामिक पातळीवर सगळ्यांना वारकरी धर्माने संधी दिल्यामुळे सनातनी- ब्राह्मणी वर्ग नाराज झालेला दिसतो. त्यांनी संताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिलेला दिसतो. एकनाथांना आणि तुकारामाला दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. चोखोबाला दर्शन नाकारून आपल्या ब्राह्मणी मानसिकता दाखवलेली दिसते. परंतू त्याचकाळात नामादेवासारखा शिंपी हा चोखोबासारख्या महारासाठी भांडतो हे वारकरी धर्माचे आणि वारीसंस्कृतीचे योगदान आहे.
           एकोविसाव्या शतकात जागतिकीकरणाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांची जमीन मोठमोठे भांडवलदार घेत आहेत. औद्योगिक कारीडोर आणि सेझ सारखे प्रकल्प आणून शेतकऱ्याला देशोधडीला लावले जात आहे. अशा काळात शेतकरी-वारकरी आघाडी होवून अनेक साम्राज्यवादी धोरणांना वारकरी चळवळीने विरोध केलेला दिसतो. वारी ही अशाकाळात लोकांना संघटीत करण्याचे चांगले साधन ठरते. 

लौकिक संस्कृती:
           जागतिक पातळीवर वाढलेला चंगळवाद आणि नवउदारमतवादी धोरणाचा होणारा सांस्कृतिक परिणाम हा वारीवर सुद्धा पडलेला दिसून येत आहे. जरी अजूनही वारी आपले जुने रूप ठिकवून असली तरी चंगळवादी आणि नवउदारमतवादी सांस्कृतिक प्रभाव वाढत आहे. कारण वारीत सहभागी होणारे लोक हे व्यापक समाजाचे भाग आहे. आणि लोकांच्या जीवनावर मार्केट खूपच प्रभाव टाकत आहे. अनेक स्वयंम सेवी संस्थाना लोक मिळत नसल्याने हे लोक वारीमध्ये घुसतात आणि त्यांच्या विचारांचा आणि कामाचा प्रचार करतात. सरकारी पातळीवरही वारीमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. याला दोन करणे आहेत. एक संसदीय राजकारण आणि दुसरे म्हणजे मोफत येवडा मोठा जनसमुदाय असतो त्यामुळे सरकारी योजनाचा किंवा धोरणांचा येथेच प्रचार केला जातो.मनीअसूनही मनशांती हरवलेले लोकसुद्धा वारीत सहभागी होतांना दिसतात. हे सर्व लोक वारीत सहभागी होतात पण त्यांना वारी आणि वारीच्या माघील मुल्ये माहितच नसतात. शेतकरी वर्गालाही माहित नसतात पान त्याची एक धारणा आहे त्यामुळे तो वेगळ्यापातळीवर विठ्ठलाशी तादात्म्य पावलेला असतो.
            सध्या अनेक हौशे, नवशे आणि गवशे प्रकारचे लोक वारीत सहभागी होत असल्याने छोट्यामोठ्या पातळीवर विपरीत गोष्टी घडत आहेत. परंतू याला वारी आणि वारकरी संप्रदाय जबाबदार नसून एकूणच समाजाची मानसिकत जबाबदार आहे. समाजामध्ये आध्यात्मिक बाजार आणि चंगळवाद वाढत असल्याने अनेक विपरीत गोष्टी निर्माण होत आहेत येणाऱ्या काळात वारीला त्याला सामोरे जावे लागेल.

खाद्यसंस्कृती: विशेषसंदर्भ बीफ



                                 खाद्यसंस्कृती: विशेषसंदर्भ बीफ

                                                                                                       - देवकुमार अहिरे

       संस्कृती ही व्यापक मुल्यवाचक संकल्पना आहे. त्यामुळे संस्कृतीचा विचार करतांना नेहमी स्थानाचा,संदर्भाचा आणि काळाचा विचार करावा लागतो अन्यथा संस्कृतीच्या अभ्यासात अनेक अडथळे निर्माण होवू शकतात कारण संस्कृती ही नेहमी प्रवाही असणारी गोष्ट आहे. म्हणून सर्वसामान्यपणे संस्कृतीची व्याख्या करतांना मानवी जगण्याचा व्यवहार म्हणजे संस्कृतीअशी केली जाते.आर्नोल्ड टोयम्बी यांच्यासारखे इतिहासकार संस्कृतीला मानवीजीवनातील महत्वाचा भाग मानतात.त्यांच्यामतानुसार संस्कृतीचा उदयास्त म्हणजे इतिहास होय.संस्कृतीचा संघर्ष म्हणजे काय? हा प्रश्न आपणास पढू शकतो. एकाचवेळी अनेक संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास होत असतो. प्रदेश, समूह,देश,भौगोलिक परिस्थिती,पर्यावरणीय परिस्थिती यांचा संस्कृतीच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्याठिकाणी संस्कृतीचा उदय होतो किंवा एकाचठिकाणी वेगवेगळ्यावेळी संस्कृतीचा उदय होत असतो त्यामुळे सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता असते.परंतू वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नेहमी फक्त सांस्कृतिक संघर्षच होत नाही तर बहुतेकवेळा सांस्कृतिक संवाद आणि सांस्कृतिक समन्वयसुद्धा होतो.
         खाद्यसंस्कृती ही एक व्यापक संस्कृतीचा किंवा सार्वजनिक संस्कृतीचाच भाग आहे. खाद्यसंस्कृतीचा इतिहास खूपच मजेशीर आहे. प्रदेशागणिक खाद्यसंस्कृतीला वेगवेगळे वैशिष्ट आहेत. भारतीय समाजव्यवस्था हि जातवास्तवावर उभारलेली असल्याने खाद्यसंस्कृतीवरही जातवास्तवाचा प्रभाव दिसून येतो. त्याप्रमाणे प्रदेशागणिक जातवास्तव आणि खाद्यसंस्कृतीत बदल होतांनाही दिसतो. भारतात खाद्यसंस्कृतीला जमातवादी आणि जातीवादी राजकारणाचीसुद्धा किनार आहे त्यामुळे व्यापक राजकारण समजून घेतल्याशिवाय खाद्यसंस्कृती आपणास समजून घेता येत नाही.शाकाहार आणि मांसाहार या  खाद्यसंस्कृतीतील भेदांना तात्विक आणि राजकीय संदर्भांची बैठक आहे. त्यामुळे बर्याचदा शुद्ध शाकाहारी माणसांनी शाकाहाराच्या आग्रहापोठी माणसांचे खुनसुद्धा केले आहेत.खाद्यसंस्कृतीला धार्मिक रंग देण्याचाही इतिहास आहे.त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या गोष्टी विशिष्ट प्रकारचेच लोक खातात हा राजकीय भ्रमसुद्धा अनेकांनी अजूनही जोपासला आहे.
           खाद्यसंस्कृतीतील मांसाहारावर मी भाष्य करणार आहे. मांसाहारामध्येही अनेक प्रकारचे मांसखाल्ले जाते.चिकन,बीफ,पोर्क आणि मटन अशाप्रकारचे इंग्रजी शब्द आहेत. परंतू भारतात अनेक प्रकारचे मांस खाल्ले जाते. आदिवासी, दलित, भटक्या जमातींचा विचार केला तर आपणास त्याची कल्पना येईल. उदा. उंदीर, डुक्कर,खार म्हैस,बैल आणि अजून बरेच काही. बीफ या प्रकारची चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी बीफमध्ये कशाचा समावेश होतो हे समजून घेवूयात. आपल्याकडे बीफ संदर्भात अनेक भ्रम आहेत मुलत: हे सर्व राजकीय भ्रम आहेत. रेडा,म्हैस,गाय,बैल यांच्या मांसाचा बीफ या प्रकारात समावेश होतो. बीफ खाणे हे लोकसंस्कृतीचा भाग आहे. तसेच लोकानुरंजनकारी संस्कृती आणि पर्यायी संस्कृतीचाही भाग आहे.बीफ कोण कुठे खातात यावरून ती शोषित-वंचितांची आणि अभिजनांची संस्कृतीही ठरते.
           बीफचे जातीवादी आणि जमातवादी राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. विशेषता समकालीन भारतात बिफवरून सातत्याने राजकारण पेटत आहे. भारतात प्राचीन कालपासूनच गोमांस खाण्यात आले आहे. यज्ञांमध्ये मोठ्याप्रमाणात पशूंची आहुती दिली जात होती. त्यामध्ये अनेक प्राण्याचा समावेश होत होता. विशेषत गाय आणि बैल यांचा. जैन-बुद्ध काळात प्राण्याच्या आहुतीला मोठ्याप्रमाणात विरोध करण्यात आला त्यातून यज्ञसंस्कृतीविरोधी कृषकसंस्कृती हा संघर्ष झाला. प्राणीहत्या वर्ज्य झाली. अहिंसा हे तत्व धार्मिकतेचे अधिष्टान बनले नंतरच्या काळात जैन-बौद्धांची अहिंसा ब्राम्हणधर्माने स्वीकारली. इसवी सनाच्या ६-७ शतकानंतर भारतात तंत्रधर्माचा प्रभाव वाढला. तंत्राच्या पाच मकारांपैकी मांस खाणे हा एक विधी आहे. त्यामुळे पुन्हा मांस खाण्याला तात्विक अधिष्टान तंत्रधर्माने मिळवून दिले. -८ व्या शतकात तुर्क-मोघल राज्यकर्त्यावर्गाबरोबर इस्लाम धर्म भारतात शासकांचा धर्म म्हणून आला. परंतू प्रजेचा धर्म आणि लोकाचार प्रदेशागणिक वेगळा असल्याने सर्व लोकांनाच राज्यकर्त्यालोकांनी हिंदू हि भू-राजकीय संकल्पना धार्मिक अर्थाने वापरली. परंतू हिंदू नावाच्या या लोकसमुहांचे अनेक जाती-गटात विभागणी होत होती. प्रत्येक जातीचा खाद्यव्यवहार हा काहीप्रमाणात सारखा आणि बर्याचप्रमणात वेगळा होता. तुर्क-मोघल काळात गोवध वरून अनेकवेळा प्रश्न निर्माण झाले आहेत. गायी ही शेतीसाठी उपयोगी प्राणी असल्याने कृषीकेंद्री अर्थव्यवस्थेत न कळत गायीचे महत्व वाटते. तसेच अभिजन हिंदूजातीय लोकांसाठी गाय धार्मिकदृष्ट्या पवित्र ही समजली जात होती. परंतू अश्पृश जातीमध्ये गायीला धार्मिकदृष्ट्या तसे काहीसे महत्व नव्हते. मुस्लिमांमध्ये बीफ खाण्यात येते.सरावाच मुसलमान बीफ खातात हासुद्धा भ्रम आहे.विशेषत मुजावर जातीचे मुसलमान बीफ खात नाहीत. अनेक मुसलमान राजकर्त्यांनी हिंदू प्रजेच्या भावनेचा आदर करून गोवधबंधी केलेली दिसते. तर काही वेळा गोवध सर्रास केलेला दिसतो. यामध्ये राजकीय करणे आणि काहीवेळा धार्मिक करणेसुद्धा होती. शासनकर्ता वर्ग सामाजिक-राजकीय-धार्मिक आणि मानसिक अशा सगळ्याच प्रकारे प्रजेवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.  उदार आणि कर्मठ विचारांच्या राज्यकर्त्यांच्या धोरणातही बदल झालेला दिसतो.
          वसाहतीक काळात जमातवादी राजकारणाला चालना खऱ्या अर्थाने मिळाली. वसाहतीकपूर्व काळात विभिन्न धर्मीय-पंथीय जनसमूहांमध्ये तान-तणाव झालेले दिसतात पान त्याला जमातवादी स्वरूप व्यापक पातळीवर मिळालेले दिसत नाही.वसाहतीक सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे मोठ्याप्रमाणात दुष्काळाला सामोरे जावे लागले. मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी आणि प्राणीहानी झालेली दिसते. वसाहतीक काळातच ख्रिस्ती धर्माचिंतनाला आणि वाढत जाणाऱ्या धर्मप्रभावाला विरोध म्हणून हिंदूमध्ये शुद्धी आणि संघटन आणि मुसलमांमध्ये तबलिक आणि तंजीम या चळवळी सुरु झाल्यात. सोबतच वसाहतीक राजकीय अर्थकारणामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक बदल घडून येत होते. त्यातून असुरक्षितता निर्माण झाल्याने लोकांमध्ये वरील धार्मिक चळवळीना मोठ्याप्रमाणात पाठबळ मिळू लागले. त्यातूनच पश्चिम भारतात पहिल्यांदा पारशी मिल मालकाने आणि नंतर आर्य समाजाशी संबंधित असणाऱ्या गुजराथी मिल मालकाने गोरक्षणी सभा काढली. त्यातून गोवध विरोधाला राजकीय चळवळीचे स्वरूप मिळाले त्यातून जमातवादी राजकारण उभे राहिले. हे जमातवादी राजकारण हिंदू-मुस्लीम अभिजन जातवर्गीय समूहाचे होते. कारण याच काळात सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण चळवळीचे उद्देश गाय वाचवणे नसून पैसे कमविणे हा आहे.असा प्रचार केलेला दिसतो.
           १८९३ च्या दंगलीत गुजराथी मिल मालकाने हिंदू कामगारांची सभा गोरक्षणी चळवळीच्या माध्यमातून घेतलेली दिसते. यातून जमातवादी चळवळीचे राजकीय अर्थशास्त्र स्पष्ट होते. मिल मालकाने स्थापन केलेल्या गो रक्षणी चळवळीत सहभागी होवून हिंदू कामगार आपल्याच सोबत काम करणाऱ्या मुस्लीम कामगारावर चालून गेले. नारायण मेघाजी लोखंडे यांनी हि फुट पडू नये म्हणून अनेक प्रयत्न केलेले दिसतात. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे राजकारण झालेले दिसते. मागच्या आठवड्यातच गुजरात राज्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दलित युवकांना मारहाण करण्याच्या बातम्या येवून गेल्यात. या सगळ्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा विचार केल्याशिवाय आपणास बिफच्या लोकसंस्कृती,लोकानुरंजनवादी संस्कृती,पर्यायी संस्कृती आणि कनिष्ट-अभिजन संस्कृती याचा विचार करता येणार नाही म्हणून ह्या मुद्याची सविस्तर चर्चा केली.
लोकसंस्कृती:                                                 
            बीफमध्ये बैल,गाय,म्हैस आणि रेडा यांचे मांस खाण्यात येते. दलित जातींमध्ये महार,मांग,भंगी या सारख्या समूहातील लोक हे खातात. ख्रिस्ती आणि मुस्लीम या अल्पसंख्यायक समाजातील अनेक जातसमूहसुद्धा हे खातात.दलितांमध्ये गावातील स्वछेतेचे काम असल्याने गावातील मेलेली जनावरे हि लोक खपून खात असत आणि बर्याचदा खाण्यासाठी काही नसले की, गावातील लोकांच्या जनावरांना ही लोक काहीतरी करून मारून टाकत आणि मग पुन्हा यांनाच त्याची विल्हेवाट लावावी लागे. नंतरच्या काळात शिक्षणामुळे झालेल्या बदलांमुळे दलित समाजातील लोक मेलेली जनावरे खाण्यापेक्षा मार्केटमध्ये जावून विकत घेवून खातात. मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजांमध्ये सणांच्यावेळी किंवा लग्नाच्यावेळी बिफचे जेवण असते.  परंतू सध्या संस्कृतीकरण, राजकीय बदल यामुळे या समूहातील लोकांच्या या खाण्याच्या लोकसंस्कृतीवर नकळत दडपण येत आहे. सरकार काय खायचे, काय खायचे नाही? हे ठरवत असल्याने लोकांचा अन्न सेवनाचा मुलभूत अधिकार नाकारला जात आहे.
लौकिक संस्कृती:
             बीफ हे परंपरेनुसार खाणाऱ्या लोकांपेक्षा नवीन प्रकारच्या लोकांचेही खाणे होत आहे. दलित, ख्रिस्ती आणि मुस्लीम या लोकांच्या पलीकडेही बीफ खाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून तर जगात सगळ्यात जास्त बीफ बाहेर पाठवणारा देश भारत ठरला आहे. अनेक लोक आवड म्हणून बीफ खातात. अनेकांना शरीरासाठी बीफ चांगले असते म्हणून खातात. इतर मांसाहारापेक्षा सकस आणि स्वस्त असल्यामुळेही अनेकजण बीफ खाण्याला प्राधान्य देतात. प्रत्यक्ष बीफ जरी खात नसले तरी बीफपासून बनलेल्या अनेक वस्तूंचा वापर करणारा खूप मोठा वर्ग भारतात आणि भारताबाहेर आहे. अनेकांना हे माहितही नसते कि, आपण जे वापरतो आहे. त्याच्या कंटेंटमध्ये बीफचा विशिष्ट प्रकारचा भाग आहे.भारतातील मोठे बीफ विक्रेते हे दलित,मुस्लीम आणि ख्रिस्ती नाहीत.

पर्यायी संस्कृती:
      बीफ खाण्याला पर्यायी संस्कृतीचे प्रतिक म्हणूनही पहिले जाते. बर्याचवेळा पुरोगामी,विज्ञानवादी,आधुनिक,नास्तिक असण्याचे लक्षण म्हणूनही बीफ खाल्ले जाते.हे मुळात: सिम्बोलिक आहे. बीफ पार्टी ही संस्कृतीच शाकाहारी मूलतत्ववादाला प्रतीरोध म्हणून जन्माला आली आहे. बीफ खाण्याला वाईट आणि निषिद्ध मानणाऱ्या विचारसरणीच्या विरोधी बंड म्हणून बीफ पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. या कार्यक्रमाचे यश हे कि, ज्यांना गोमाता मारल्यामुळे वाईट वाटते ते लोक गोमातेच्या प्रेमापोटी माणसांही मारून टाकायला कमी करत नाहीत.बीफ खाल्याने लोक हिंस्र होतात असे म्हणणारे शाकाहारी लोक बिफ खाणाऱ्यांच्या विरोधात मोठी हिंस्रता पसरवतात. शाकाहारींच्या अशा दांभिकवृत्तीमुळे बीफपार्टी संस्कृतीला महत्व येत आहे. कारण हा नुसता खाण्याचा प्रश्न नसतो तर विचारांचा संघर्ष असतो.
              बीफ पार्टीचे आयोजन करण्यात दलित विद्यार्थ्यांचा पुढाकार मोठ्याप्रमाणात देशभरात दिसून आला आहे. कारण  दलित लोकांच्या लोकसंस्कृतीचा आणि आहाराचा अविभाज्य भाग आहे बीफ. परंतू देशातील अभिजनजात वर्गातील लोक आपला शाकाहारी मूलतत्ववाद या लोकांवर लादत आहेत. आणि दलितांच्या आहाराला वाईट आणि निषिद्ध ठरवत आहे. भारतातील अभिजनजातवर्गांमध्ये बीफ खाण्याविषयी अनेक भ्रम आहेत.सगळे भ्रम अवैज्ञानिक आहेत. पर्यायी सांस्कृतिक राजकारणाच्या माध्यमातून आपली लोकसंस्कृती जपण्याचे प्रयत्न बीफ पार्टीच्या निमित्ताने केले जात आहे. परंतू लोकसंस्कृती म्हणून जसे व्यवहार केले जात होते त्याप्रकारचे व्यवहार पर्यायी संस्कृतीत केले जात नाही. कारण लोकसंस्कृती बीफ खाणे हि नैसर्गिक मानले असल्याने ती राजकीय लढाई होत नाही परंतू पर्यायी संस्कृतीत आम्ही जे खातो त्यालाच निषिद्ध तरवून वर्ज्य केले जाते. त्याच्या विरोधात प्रतिकार हा पर्यायी संस्कृतीत केला जातो. पर्यायी संस्कृतीत बर्याच गोष्टी जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक केल्याजातात त्यामुळे पर्यायी संस्कृती ही मुलत: राजकीय लढाई असते
खाद्यसंस्कृतीत बीफ चे वेगळेपण :
               भारतातील सगळ्यात जास्त वादग्रस्त खाद्य म्हणजे बीफ होय. अनेक प्रकारचे भ्रम असल्यामुळेसुद्धा बीफ जास्त वादग्रस्त होत असते. सगळ्यात महत्वाचा भ्रम म्हणजे बीफ म्हणजे गायीचे मांस. परंतू हे वास्तव नाहीये हे आपण वर पहिलेच आहे. त्यानंतर बीफ खाल्याने मानूस हिंस्र बनतो म्हणून तो अन्याय-अत्याचार करतो. कारण बीफ खाणे हे वाईट आहे. दुर्गुणांचे लक्षण आहे. नंतर बीफ खाल्याने बुद्धी चालत नाही. त्यामुळे सगळ्याच महत्वाच्या जागांवर अभिजनजातीय हिंदूच का असतात कारण त्यांचा आहार हा शुद्ध आणि सात्विक असतो. अशाप्रकारचे अवैज्ञानिक भ्रमासुद्धा पसरविले जातात.


फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...