समजा, तुम्ही धर्माधिकारी, कांबळे, पाटील, शेख, खान, जैन असाल तर लोक काय विचार करतात? तसेच, या नावांची लोक तुमच्या समोर आली तर तुमचे काय विचार असतात? नावामुळे काय, काय कळते. तसेच, नाव कुठे, कुठे शोधले जाते? काही लोक नाव जाहीर करून मिरवतात तर काही लोक नाव लपवतात.
नावाचा शोध आपण का घेत असतो? नावामुळे जसा फायदा होता तसाच तोटाही होता. काहींचे नाव गुण, ज्ञानवर्धक आणि काहींचे अपमानास्पद, हीनता दर्शक! काहींचा नावामुळे जीव सुद्धा जावू शकतो. तसेच, काहींना वगळले ही जावू शकते.
विशिष्ट नावाचा उच्चार झाला की, काहींना विशिष्ट भावना का येतात? त्यांच्या डोक्यात विशिष्ट कॉग्नेटिव चित्र का निर्माण होते? असे अनेक समाजशास्त्रीय- ऐतिहासिक प्रश्न पडू शकतात.
नावे बदलण्याचा प्रकारही आपल्याकडे सर्रास आहे. गल्ली, गाव, शहर, रोड यांच्या नावावरून नेहमी वाद ही होत असतात. डॉ. आंबेडकरांनी ' नामांतर ' हाही एक अस्पृश्य उन्नतीचा मार्ग सांगितला होता. नामांतरावरून आठवले, महाराष्ट्रात विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी मोठा लढा झालेला आहे. त्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.
तर, मुद्दा आहे 'प्रियंका चुतीया' या नावाच्या मुलीच्या निमित्ताने जी चर्चा चालू आहे. ती आपण वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे. एकदा, बंगालमध्ये असतांना, आमच्यापैकी कोणीतरी ' चुतीया ' हा शब्द वापरला. त्यावेळी आमच्या एका बंगाली स्नेह्याने - साथीने आम्हाला खूपच झापले. कारण, काय तर ' चुतीया ' ह्या शब्दामुळे आपण आपण संपूर्ण चुतिया समाजाचा अपमान करतो असे त्याचे म्हणणे होते. त्या समाजाची ही साचेबद्ध प्रतिमा घातक आहे असेही आम्हाला पटल्यामुळे आम्ही मान्य केले.
नकळतपणे काही लोक अशा शब्दांचा वापर करतात आणि काही जाणीवपूर्वक करतात त्यामुळे आपण समाज साक्षरता वाढवली पाहिजे. जे शब्द निंदानालस्ती करतात, एखाद्या समाजाची साचेबद्ध प्रतिमा निर्माण करतात ते टाळले पाहिजे. तसेच, नवीन शब्द घडवले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा