शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

चॅटो – स्वातंत्र्यासाठी झटणारा साम्राज्यवादविरोधी ‘वैश्विक कार्यकर्ता’!

        

          हिटलर आणि नाझीवादाच्या विरुद्ध लढणारा फॅसिझमविरोधी नेता, पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वाच्या साखळदंडातून आशियाई देशांना मुक्त करण्याचे स्वप्ने पाहणारा सकल आशियावादी कार्यकर्ता, भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणारा राष्ट्रवादी हिरो, चीन आणि कोरियामधील जपानच्या आक्रमणाला विरोध करणारा अराज्यवादी चिंतक  आणि जगाच्या शोषणमुक्तीसाठी झटणारा  अव्वल भारतीय साम्यवादी म्हणजे विरेंद्रनाथ चटोपाध्याय उर्फ चॅटो! साम्राज्यवादविरोधी राष्ट्रवाद, अराज्यवाद आणि साम्यवाद यांची संमिश्र वैचारिक परंपरेचे मेरुमणी म्हणजे विरेंद्रनाथ चटोपाध्याय. 

कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि लेखन !  

           निझामाची राजधानी हैद्राबादमध्ये प्राध्यापक असलेल्या बंगाली डॉ. अघोरीनाथ चटोपाध्यायांचा मुलगा म्हणजे विरेंद्रनाथ. डॉ. अघोरीनाथांना एकूण आठ अपत्य होते. त्यामध्ये विरेंद्रनाथ सर्वात मोठे होते. भूपेंद्रनाथ, रनेन्द्रनाथ, हरीन्द्रनाथ ( भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रसिद्ध स्त्रीवादी – समाजवादी नेत्या असलेल्या कमलादेवी चटोपाध्यायांचा नवरा), सरोजिनी नायडू ( स्त्रीवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीच्या नेत्या), मृणालिनी, सुभाषिणी नांबियार ( ए. सी. नंबियार यांची बायको), सुनालिनी आणि रुखमिनी, ही विरेंद्रनाथांची भावंडे होती.

          ३१ ऑक्टोबर१८८० रोजी विरेंद्रनाथांचा हैद्राबादमध्ये जन्म झाला.  मद्रास विद्यापीठात मॅट्रीक्युलेशन झाल्यांनतर बंगालमधील कलकत्ता विद्यापीठात कलाशाखेत पदविचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९०२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. दोनदा प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत अपयश आले. त्यामुळे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी १९०९ मध्ये मिडल टेम्पल येथे प्रवेश घेतला. विरेंद्रनाथ हे बहुभाषी होते. त्यांना अनेक भारतीय भाषा उदाहरणार्थ तेलगु, तमिळ, बंगाली, उर्दू, पर्शियन, अरेबिक,  हिंदी, इंग्रजी  आणि परदेशी भाषांमध्ये फ्रेंच, इटालियन, जर्मन, डच, रशियन आणि स्कॅंडीनेव्हीयन भाषा – स्वीडिश, डॅनिश आणि नॉर्वजीयन अस्खलितपणे बोलता येत होत्या. १९२० नंतर जर्मनीमध्ये भाषाशास्त्राचे विद्यार्थी म्हणूनही त्यांनी काम केले. पुढे, १९३३ मध्ये सोविएत रशियामध्ये स्थाईक झाल्यावर त्यांनी मानवशास्त्र विभागामध्ये काम केले.

        ब्रिटीश साम्राज्यविरुद्ध अनेक प्रचारकी लेखन त्यांनी केले. कम्युनिस्ट इंटरनॅशनल म्हणजे कॉमिटर्नमध्ये भारतीय क्रांतीविषयक सैद्धांतिक लिखाणही केले. तसेच, राजकारणासोबत इथ्नोग्रपी, भाषाशास्त्रावर त्यांनी अकादेमिक लेखनही त्यांनी केले आहे.

क्रांतीकारी चळवळीत सहभाग!

         शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेलेल्या विरेंद्रनाथांवर बंगाली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते बिपीनचंद्र पाल यांचा प्रभाव पडला होता. विसाव्या शतकातील पहिली काही दशके युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा काळ आहे. या काळातच पहिले महायुद्ध झाले.  रशियन क्रांती झाली आणि राष्ट्र संघाची स्थापनाही झाली. या सगळ्या घडामोडींनी आणि घटनांनी संपूर्ण विसाव्या शतकाच्या जागतिक, वैचारिक, राजकीय आणि आर्थिक अशा समग्र बाबींवर प्रभाव टाकला आहे. कारण, या काळात अनेक वैचारिक चळवळींची जडणघडण युरोपात होत होती. साम्राज्यवादामुळे जगभरातील वसाहतींमधील विद्यार्थी (उदाहरणार्थ- चीन, जपान, आफ्रिका, इंडिया, इंडोनेशिया इत्यादी)  युरोपातील अनेक शहरांमध्ये शिकत होती आणि सोबतच, वैचारिक आणि राजकीय चळवळींमध्ये सहभागी होत होती.

इंडिया हाउस आणि चॅटो !

          लंडनमधील श्यामजी कृष्ण वर्मांनी सुरु केलेले ‘इंडिया हाउस’ भारतीय आणि आशियाई क्रांतिकारकांच्या चळवळींचा प्रसिद्ध अड्डा बनले होते. वेलेटाईन चिरोल ( संपादक टाइम्स न्यूजपेपर) यांनी भारताबाहेरील सर्वात खतरनाक संस्था म्हणून इंडिया हाउसचे वर्णन केलेले आहे.  इंडिया हाउसमध्ये अनेक क्रांतिकारी मंडळी होती. त्यामधील   वीर वि. दा. सावरकरांचा प्रभाव विरेंद्रनाथ चटोपाध्यायांवर पडला. १९०८  पासून विरेंद्रनाथ चटोपाध्याय हे बिपीनचंद्र पाल यांच्या ‘स्वराज’ या राष्ट्रवादी मासिकाचे सहसंपादक म्हणून काम करत होते. तसेच, त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मांच्या ‘इंडियन सोसिओलोजीस्ट’ पत्रात लिखाण करायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी कर्जनची हत्या केली. कर्जनच्या हत्येनंतर लंडनमधील वातावरण भारतीय क्रांतिकारी लोकांसाठी सोयीचे नव्हते. अशा काळात सावरकरांनी मदनलाल धिंग्रांच्या कृतीचे समर्थन करणारा ठराव लंडनमधील बैठकीत मांडला. त्यावर टाईम्स वृत्तपत्राने कठोर टीका केली. त्यावेळी टाईम्स वृत्तपत्राला दिनांक ६ जुलै १९०९ रोजी विरेंद्रनाथांनी पत्र पाठवून सावरकरांच्या कृतीचे समर्थन केले. त्यामुळे मिडल टेंपलने त्यांना काढून टाकले. सावरकरांच्या अटकेनंतर लंडनमधील ‘फ्री इंडिया सोसायटी’चे उपाध्यक्ष म्हणून विरेंद्रनाथांची नेमणूक झाली. लॉर्ड कर्जनच्या हत्येमुळे ब्रिटीश गुप्तचर पोलीसांचा ससेमिरा भारतीय क्रांतीकारांच्या मागे लागला होता. म्हणून १९१० मध्ये त्यांनी लंडन सोडून पॅरीसमध्ये आले. पॅरीसमध्ये आल्यावर त्यांनी ‘तलवार’ आणि मादाम भिकाजी कामा यांच्या ‘वंदे मातरम’ या वृत्तपत्रांचे संपादकत्व घेतले. तसेच, कामाबाईंची  ‘पॅरीस इंडिया सोसायटी’चे भाग बनले.  याकाळात विरेंद्रनाथांचा संबंध फ्रेंच अराज्यवादी आणि समाजवादी चळवळींशी आला. तसेच त्यांनी फ्रेंच समाजवादी पार्टीचे सभासदस्व घेतले.

पहिले महायुद्ध आणि चॅटो!

         सावरकरांच्या भारतीय रवानगीनंतर पॅरीसमध्येही ब्रिटीशांची ‘नजर’ भारतीय क्रांतिकारकांवर वाढल्यावर विरेंद्रनाथांनी  पॅरीस सोडले. थोड्या काळासाठी ते स्वित्झर्लंड गेले आणि तेथून ते अमेरिकेत गेले. याच काळात अमेरिकेत लाला हरदयाळ आणि इतर मंडळी ‘गदर पार्टी’ची बांधणी करत होते. या दरम्यानच्या काळात विरेंद्रनाथांनी मिस रेनोल्ड यांच्याशी विवाह केला होता. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी भारतीय क्रांतीकारींनी जर्मनीची मदत घेवून भारतातील ब्रिटीश सत्ता उलथवून टाकायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांना बर्लिनला जायचे होते. त्यामुळे मिस रेनोल्ड आणि विरेंद्रनाथ वेगळे झाले. बर्लिनमध्ये येवून त्यांनी ब्रिटीशविरोधी प्रचार चालवला होता.  विरेंद्रनाथांची सर्व राजकीय कारवाया ह्या गुप्त पद्धतीने चालत असत कारण त्यावेळी त्यांच्यावर ब्रिटीश गुप्तचरांची नजर होती म्हणून ते पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्लिन मध्ये ‘तुलनात्मक भाषाशास्त्रा’चे विद्यार्थी म्हणून वावरत असत. जर्मनीमधील ३१ विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांशी विरेंद्रनाथांनी संबंध स्थापित केला होता. १९१४ च्या सप्टेंबरमध्ये ‘भारतीयांचे जर्मन मित्र’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. त्यामध्ये वरील सर्व विद्यापीठातील विद्यार्थी होते. त्यामध्ये स्वतः चॅटो, डॉ. मोरेश्वर गोविंदराव प्रभाकर, डॉ. अब्दुल हाफिज, सी. पद्मनाभन, डॉ. ज्ञानेंद्र दासगुप्ता, धीरेन सरकार, नरेन मराठे, विष्णू सुकटणकर,गोपाल परांजपे, करंदीकर, शिरीष चंद्र सेन  इत्यादी जर्मन विद्यापीठातील विद्यार्थी होते. त्यामध्ये हरदयाळ, तारकनाथ,  मोहमद बरकतुल्ला, ए. आर. पिल्लई, विष्णू गणेश पिंगळे आणि इतरांचा नंतर समावेश झाला.  हिंद-जर्मनी मैत्रीकरार म्हणून भारतीय क्रांतिकारक आणि जर्मन सरकारमधील कराराला ओळखले जाते.  त्यालाच पुढे ‘इंडो-जर्मन कारस्थान’ असे ब्रिटिशांनी म्हटले. गदर पार्टीच्या उठावाला पूर्ण मदत ‘भारतीयांचे जर्मन मित्र’ ही संस्था करत होती. १९१४ मध्ये कर्तारसिंह आणि सत्येन सेन आणि पिंगळे यांना विरेंद्रनाथांनी कलकत्याला पाठविले. तेथे जतीन मुखर्जी यांच्याशी आणि रासबिहारी बोस यांच्याशी चर्चा करून लष्करी उठावाची तयारी करण्याचे नियोजन केले.  स्वित्झर्लंडमध्ये राजा महेंद्र वर्मांना भेटले आणि त्यांना जर्मन राजा कैसर विल्यम दुसरा याचे निमंत्रण दिले. यावेळी ब्रिटीश गुप्तचर विरेंद्रनाथांवर पाळत आणि नजर ठेवून होते. डोनाल्ड गुलिक या गुप्तचराने त्यांचा खून करण्याचा डाव आखला होता असे त्या गुप्तचाराच्या लिखाणावरून समोर आले आहे. पुढे, गदर पार्टीच्या या उठावाला अपयश आले.

महायुद्धाचा काळ, रशियन क्रांती आणि साम्यवाद !

         गदर पार्टीच्या उठावाला अपयश आले तसेच इंडो-जर्मन नियोजनसुद्धा अपयशी ठरले होते. त्यामुळे १९१७ मध्ये विरेंद्रनाथांनी ‘बर्लिन कमिटी’ स्टॉकहोम येथे हलवली. दरम्यानच्या काळात रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी क्रांती केली होती.  १९१८ मध्ये विरेंद्रनाथांचा कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे पहिले सचिव अन्जेलिका बालाबानोवा यांच्याशी संपर्क झाला. याकाळात डॉ. पांडुरंग खानखोजे आणि विरेंद्रनाथ भारतीय क्रांतीसंदर्भात रशियन क्रांतीकारांसोबत चर्चा करत होते असे संदर्भ मिळतात. तसेच, याकाळातच विरेंद्रनाथांचा आणि लोकमान्य टिळकांचा पत्रव्यवहार झाला होता असे य. दि. फडकेंच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसते. १९१९ मध्ये भारतीय क्रांतीकारकांची गुप्त सभा घेतली. १९२० मध्ये एम. एन. रॉय यांच्या माध्यमातून सोविएत कडून भारतीय क्रांतीकारकांना आर्थिक आणि राजकीय मदत झाली पाहिजे अशी चर्चा विरेंद्रनाथ करत होते. त्यासाठी त्यांनी सोविएतला भेट दिली.  तिसऱ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या कॉंग्रेसमध्ये लेनिनसोबत त्यांची भेट झाली.

महायुद्धोत्तर काळ, अराज्यवादी प्रभाव आणि साम्राज्यवाद विरोधी लीगची स्थापना!

           महायुद्धोत्तर काळात विरेंद्रनाथांच्या जीवनात अनेक बदल झाले कारण १९२१ ते १९२७ च्या काळात बर्लिनमध्ये अनेक बदल झाले. १९२१ मध्ये त्यांनी अग्नेस स्मेडली या अमेरिकन समाजवादी पत्रकार मैत्रिणीशी त्यांनी सहजीवन सुरु केले होते. १९२८ मध्ये दोघे वेगवेगळे झाले. विरेंद्रनाथांविषयी अग्नेस लिहिते की,  His mind was modern, but his emotional roots were in Hinduism and Islam. Everyone understood and loved Viren, few understood me. दरम्यानच्या काळातच इमा गोल्डमन या अराज्यवादी विचारवंत कार्यकर्तीशी त्यांची मैत्री झाली. तिच्या अराज्यवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर बराच पडला होता. त्या संदर्भात इमा गोल्डमन लिहिते की, “He called himself an anarchist, though it was evident that it was Hindu nationalism to which he had devoted himself entirely”. अग्नेस आणि इमा दोन्ही मैत्रिणी होत्या.

        १९२१ मध्ये त्यांनी ‘ इंडियन न्यूज अँड इन्फोर्मेशन ब्युरो’ सुरु केले. या ब्युरोशी अमेरिका, अफगानिस्तान आणि जपानमधील भारतीय क्रांतिकारी लोक जोडले गेले होते. १९२१ मध्येच त्यांनी इंडियन असोशिएशन ऑफ सेन्ट्रल युरोप फॉर स्टुडंट अँड युथ’ ची स्थापना केली. १९२३ (काहींच्या मते १९२६) मध्ये त्यांनी जर्मन कम्युनिस्ट पार्टीशी जोडून घेतले. याकाळात जर्मनीमध्ये ‘जर्मनी अगेन्स्ट वार आणि फॅसिझम’ आणि ‘असोशिएशन ऑफ रिव्होल्युशनरी एशिएन्स’ अशा दोन संघटना स्थापन झाल्या होत्या दोन्हींमध्ये विरेंद्रनाथांचा सक्रीय सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ, चीनी क्रांतीची चळवळ आणि जपानमधील युद्ध विरोधी चळवळीला वरील दोन्ही संस्थांचा पाठींबा होता. बर्लिनमध्येच ‘साम्राज्यवाद विरोधी लीग’ची स्थापना झाली आणि तिचे सचिव म्हणून विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांची निवड झाली. १९२७ मध्ये साम्राज्यवाद विरोधी लीगची पहिली परिषद भरली होती. त्यामध्ये जगभरातील साम्राज्यवादविरोधी अराज्यवादी, राष्ट्रवादी, साम्यवादी मंडळींनी सहभाग घेतला होता. भारतातून पंडित जवाहरलाल नेहरू सहभागी झाले होते.

       १९२९ मध्ये जवाहरलाल नेहरू कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर विरेंद्रनाथांनी त्यांना काही पत्रे पाठवली होती. त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये ब्रिटीश साम्राज्यवाद विरोधी भारतीय संपूर्ण स्वातंत्र्याचा क्रांतिकारी कार्यक्रम राबवावा अशी भूमिका घेतली होती. १९३० ते १९३२ मध्ये  भारतीय कम्युनिस्ट पार्टीने घेतलेल्या भूमिकांवर भाष्य करणारी जवळपास २८ लेख विरेंद्रनाथांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या मुखपत्रात लिहिले आहेत.

जर्मनीतील सत्तास्पर्धा, हिटलर आणि चॅटोचा फॅसिझमविरोधी लढा !

        साम्राज्यवादविरोधी लीगमुळे विरेंद्रनाथांना बहुतेकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळ, जपानी युद्ध विरोधी चळवळ, चीनी क्रांती यांच्या संदर्भात सक्रीय असलेला कार्यकर्ता आणि नेता म्हणून पाहिले जाते. परंतू याकाळात त्यांनी  फॅसिझमविरोधी लढलेल्या लढ्याची तेवढी चर्चा होत नाही. जर्मनीमध्ये हिटलर आणि नाझीवादाचा उदय आणि विस्तार होत असतांना विरेंद्रनाथ त्यावेळी जर्मन कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते. नाझींनी जोरदारपणे कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. इटलीमध्येही मुसोलिनीचा उदय झाला होता. संपूर्ण युरोपमध्ये फॅसिझमचा धोका वाढत होता म्हणून संपूर्ण युरोपातील फॅसिझमविरोधी कार्यकर्त्यांना घेवून १९३० पासूनच विरेंद्रनाथ आणि त्यांचे सहकारी फॅसिझमविरोधी जाळे निर्माण करत होते. त्याचाच भाग म्हणून १९३२ मध्ये त्यांनी अॅमस्टरडॅममध्ये युद्धविरोधी परिषद घेतली. त्यातूनच पुढे ‘फॅसिझम आणि युद्ध विरोधी संयुक्त आघाडी’ स्थापन करण्यात आली. एवढे सर्व प्रयत्न करूनही युद्ध आणि फॅसिझमचा विस्तार विरेंद्रनाथ आणि त्यांचे सहकारी थांबवू शकले नाही. १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आला. सत्तेवर येताच हिटलरने राजकीय विरोधकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु केल्यामुळे १९३३ मध्ये विरेंद्रनाथांना जर्मनीतून पळून जावे लागले.

स्टॅलीनच्या एकाधिकारशाहीचा  बळी !

         जर्मनीमध्ये नाझीवाद्यांनी सत्ता हस्तगत करताच कम्युनिस्टविरोधी कारवाया सुरु केल्यामुळे जर्मनीमध्ये वास्तव्य असलेल्या भारतीय, चीनी आणि जपानी क्रांतीकराकांना जर्मनी सोडावी लागली. बहुतेकजण कम्युनिस्ट होते आणि त्यांचा संबंध कम्युनिस्ट इंटरनॅशनलशी असल्यामुळे अनेकांनी सोविएत मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच विरेंद्रनाथही सोविएतमध्ये गेले. तेथे त्यांनी डॉ. लिडिया कारुनोस्काया या सहकारी कॉम्रेडशी सहजीवनाला सुरुवात केली आणि लेनिनग्राडच्या अकॅडेमी ऑफ सायन्समधील ‘इंस्टीट्यूट ऑफ इथ्नोग्रफी’ मध्ये काम केले. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी अनेक लेख, पुस्तके आणि मोनोग्राप लिहिले आहेत पण सोविएतमधील विरेंद्रनाथांच्या शेवटच्या आयुष्याविषयी जास्त माहिती मिळत नाही. १९३४ मध्ये लेनिनच्या बायकोची त्यांचा पत्रव्यवहार झाला होता आणि त्यानंतर कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे सचिव ग्रोगरी दिमित्रोव यांना पत्र लिहून कळवले होते की, ‘माघील तीन वर्षांपासून कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या कामापासून वेगळे केले आहे.’ विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांचा शेवट कसा झाला. याविषयी अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. स्टॅलीन जिवंत असेपर्यंत आणि नंतर स्टॅलीनवादाचे प्रभुत्व असल्यामुळे विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांच्यासोबत काय झाले हे स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. काहींनी ते १९३७ मध्ये वारले असे लिहिले आहे. काहींनी १९४०, काहींनी १९४१ मध्ये आजारपणामुळे वारले असे लिहिले आहे. आणि काहींनी ते १९६० मध्ये वारले असेही लिहिले आहे.

          भारतातील वेगवेगळ्या कम्युनिस्ट मंडळीनी त्यांच्याविषयी लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांनीही त्यांच्यावर लिहिले आहे तसेच ब्रिटीश गुप्तचरांनी त्यांच्याविषयी नोंदी केल्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये संदिग्धता आहे. शेवटी, सोविएत रशियाचे विघटन झाल्यावर अनेक रशियन कागदपत्रे खुली झाली आहेत. त्यानुसार चॅटो हे स्टॅलीनवादाचे बळी आहेत हेच स्पष्ट होते. कारण, १९३७ मध्ये त्यांना आणि जपानी कम्युनिस्टांना अटक करण्यात आली होती. विरेंद्रनाथ आणि जपानी कम्युनिस्ट हे बर्लिनपासून सोबतच वेगवेगळ्या राजकीय चळवळींमध्ये सक्रीय होते. जपानी कम्युनिस्ट हे जपान चे गुप्तचर आहेत असा आरोप ठेवून मारून टाकण्यात आले. विरेंद्रनाथांना कोणत्या आरोपाखाली मारण्यात आले हे माहिती नाही. विरेंद्रनाथांचे एम. एन. किरोव यांच्याशी जवळकीचे संबंध होते. १९३० च्या दशकात किरोव हे स्टॅलीननंतर कम्युनिस्ट पार्टीत  दुसरे प्रसिद्ध नेते होते. तसेच, दुष्काळ आणि शेतीच्या सहकारीकारणामुळे स्टॅलीनची प्रसिद्धी उतरंडीला लागली होती. त्यामुळे पक्षातील स्वतःची सत्ता बळकट आणि दृढ करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधकांना संपवणे क्रमप्राप्त बनले होते म्हणून १९३४ मध्ये किरोव यांची हत्या करण्यात आली. किरोव यांच्याशी विरेंद्रनाथांची जवळीक होती म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली असावि असाही काहींचा तर्क आहे. अटक केल्यापासून काही दिवसातच म्हणजे २ सप्टेंबर १९३७ रोजी मारण्यात आले. परंतू त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या रशियन बायकोला तीन वर्षांनी सांगण्यात आली.

समकालीन जग आणि चॅटोचा वैचारिक वारसा! 

          विरेंद्रनाथ चटोपाध्यायांनी संपूर्ण आयुष्य साम्राज्यवादविरोधी लढाईत घालवले सोबतच, वेगवेगळ्या वैचारिक परंपरेशी संवाद ठेवला. त्यामुळेच अराज्यवादी, राष्ट्रवादी आणि साम्यवादी लोकांना घेऊन ते फॅसिझमविरोधी संयुक्त आघाडी उघडू शकले. स्वातंत्र्याच्या चळवळींशी बांधिलकी असल्यामुळे त्यांनी कोरिया आणि चीनवरआक्रमण केलेल्या जपानी कारवायांचा निषेध केला. तसेच, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद विरुद्ध सकल एशियातील क्रांतिकारी लोकांची मोट बांधली. आज, जग पुन्हा युद्ध, धर्मांधता, दहशतवाद आणि फॅसिझमकडे जात आहे अशावेळी चॅटोची आठवण काढणे आणि त्याचा सतत संघर्षाचा आणि कृतीशील असण्याचा वारसा जपणे अत्यंत जिकरीचे बनले आहे.

सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवादातील संपर्कबिंदू क्रांतिकारी मौलाना बरकतुल्ला

 

           मौलवी बरकतुल्ला हे साम्राज्यवादविरोधासाठी सकल इस्लामवाद, साम्यवाद आणि भारतीय स्वातंत्र्य लढयांमध्ये संवाद ठेवण्याचे काम करत होते. त्यांनी या संवाद्प्रक्रीयेत खूपच महत्वाची भूमिका निभावली आहे. भारतीय लोकांनी भारताबाहेर चालवलेल्या क्रांतिकारी चळवळीतील महत्वाच्या नेत्यांपैकी महत्वाचे क्रांतिकारक म्हणून बरकतुल्ल्ला ओळखले जातात.

बालपण आणि शिक्षण :

           ७ जुलाई १८५४ रोजी त्यांचा भोपळ येथे जन्म झाला. तेथीलच सुलेमानिया या मदरसामध्ये त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. भोपाळमध्येच त्यांनी अरेबिक, पर्शियन भाषांचा आणि धार्मिक शस्त्रांचा अभ्यास केला. विद्यार्थी असतांना त्यांना साम्राज्यवाद विरोधी आणि सकल इस्लामवादी नेते जमालुद्दीन अफगाणी यांना भेटण्याची संधी मिळाली होती. जमालुद्दीन अफगाणी यांचा साम्राज्यवाद विरोधी लढ्याचा प्रभाव बरकतुल्ला यांच्यावर आयुष्यभर राहिलेला दिसतो. मदरसामधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना तेथेच शिक्षकाची नोकरी मिळाली. परंतु, काही काळातच सुलेमानिया मदरसामध्ये संपूर्ण शिक्षण मिळत नाहीये याची जाणीव झाली म्हणून त्यांनी जबलपूर येथील ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.

           ख्रिस्ती मिशनरींसोबत ते मुंबईला गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी इंग्रजी भाषेच्या ज्ञानात कौशल्य मिळवले. पुढील काही वर्षांनी ते इंग्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले.  ‘ओरीएंटल युनिव्हरसिटी ऑफ लिव्हरफूल’मध्ये त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथेच काही वर्ष ते प्राध्यापक होते. इंग्लंडमधून ते अमेरिका आणि नंतर जपानमध्ये गेले. तेथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केली. जपानच्या वास्तव्यात त्यांनी जपानी भाषा शिकून घेतली आणि टोकियो विद्यापीठामधील परकीय भाषा विभागात ते शिकवत होते. मौलाना बरकतुल्ला यांना अरेबिक, पर्शियन, उर्दू, तुर्किश, इंग्रजी, जर्मन, आणि जापनीज अशा भाषा येत होत्या.

परदेशांतून भारतमुक्तीचा लढा !

         जमालुद्दीन अफगानींच्या भेटीमुळे साम्राज्यवाद विरोध आणि सकल इस्लामवादाची दीक्षा त्यांनी घेतली होती. पण, त्यांच्या राजकीय कृतींची खरी सुरुवात इंग्लंडमधील आठ वर्षांच्या वास्तव्यात झाली. त्यावेळी लंडन हे भारतीय राष्ट्रवादी लोकांचे केंद्र बनले होते. गोपाल कृष्ण गोखले आणि इतर कॉंग्रेसच्या लोकांचे भाषणे त्यांनी त्यावेळी ऐकली परंतु त्यांच्या मवाळ मांडणीमुळे बरकतुल्लांचा भ्रमनिरास झाला. लंडनमध्येच त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा भेटले. त्याकाळात श्यामजी कृष्ण वर्मा हे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ लंडनमधून चालवत होते. भारतातील अनेक तरुणांना शिष्यवृत्त्या देवून लंडनला बोलवत असत.

        १८९५ मध्ये लिव्हरपूलमध्ये येथेच काबूलचा राजपूत्र नसरुल्ला याची भेट झाली. पुढे या भेटीचा खूपच फायदा झाला आहे. इंग्लंडच्या तुर्कस्थान धोरणावर बरकतुल्लांनी टीका केल्यामुळे त्यांना इंग्लंड सोडावे लागले. ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. भारतीय लोकांना जागृत करण्याचे आणि ब्रिटीश धोरणांची चिकित्सा करण्याचे काम ते करत होते. पाच वर्ष अमेरिकेत राहिले. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात भारतातील मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी चळवळीचा आणि सकल इस्लामवादी चळवळीचा प्रसार होत असतांना त्यांनी हसरत मोहानींना लिहिले होते की, “There are two duties of the Muslims residing in India. One is the duty for the country and the other of their religion. The love for the country demands that one should not shirk in serving the country with wealth and his own life. The history of mankind stands witness that he who has no love for the country is devoid of humanity... The religious duty demands that the Indian Muslims on account of Islamic brotherhood are friends to the Muslims of the world. And whenever there is a challenge they should extend all possible support. The fulfilment of these religious and country's duty depends upon only one action, the complete unity between the Hindus and Indian Muslims.”

            बरकतुल्लांचे विचार तत्कालीन मुस्लीम विद्वानांना पटत होती. त्यामुळेच १९१० मध्ये चीनला पाठवण्यात आलेल्या कमिटीमध्ये बरकतुल्लांची निवड मकबूर रहेमान सरहिंदी यांनी केली. चीन मधील राष्ट्रवादी घडामोडींचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी केली होती. परंतु, कमिटी चीनला पोहचू शकली नाही आणि बरकतुल्ला जपानला पोहचले. जपानमध्ये त्यांची भेट इजिप्तशीयन क्रांतिकारी फजली यांच्यासोबत झाली. फजली त्यावेळी ‘इस्लामिक बंधुत्व’ (Islamic Fraternity) चे संपादक होते. फजलींच्या निधनानंतर बरकतुल्ला त्याचे संपादक झाले आणि त्यांनी ब्रिटीश विरोधी प्रचार आणि सकल इस्लामवाद याविषयी लिखाण करायला सुरुवात केली. त्यामुळे जपानमधील ब्रिटीश राजदूताच्या दबावामुळे ‘इस्लामिक बंधुत्व’ बंद करावे लागले. याकाळात बरकतुल्ला जापनीज भाषा शिकले आणि टोकियो विद्यापीठात प्राध्यापक झाले. भगवान सिंह, मथुरा सिंह आणि इतरांसोबत बरकतुल्ला जपानमध्ये एक  क्रांतीकारांकांचा गुप्त गटाचाही भाग होते. १९१३ मध्ये ‘ऐलान – ए- आझादी’ हा त्यांनी लिहिला. त्यामध्ये तलवारीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे ब्रिटिशांनी जपान सरकारवर दबाव आणून त्यांना जपानमधून बाहेर काढले.

            १९१३ मध्येच अमेरीकेत लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली गदर पार्टीची स्थापना झाली होती. त्यांनी जगभरात त्यांचा संदेश पाठवला होता. त्यामुळे जपानमधून काढल्या गेल्यावर मौलाना बरकतुल्ला अमेरिकेत आले.  गदर पक्षाच्या हालचालींवर ब्रिटीश सरकारचे लक्ष होते. ब्रिटीशांच्या सांगण्यावरून अमेरिकन सरकारने लाला हरदयाळ यांना अमेरिकेतून बाहेर काढले. त्यावेळी हरदयाळ यांनी गदरच्या मुखपत्राची जबाबदारी बरकतुल्ला यांच्यावर सोपवली होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१४-१९१९) ब्रिटीश विरोधी प्रपोगंडा गदर चळवळीने सुरु केला. त्यावेळी इंग्लंडचा शत्रू जर्मनी होता. त्यामुळे बहुतेक भारतीय क्रांतिकारी जर्मनीमध्ये स्थायिक झाले होते कारण, जर्मनीच्या साहय्याने ब्रिटीश सत्तेचा पराभव करण्याचे ते स्वप्ने पाहत होते. १९१४ मध्येच ‘ बर्लिन इंडियन नॅशनल पार्टी’ची स्थापना झाली. तिचे रुपांतर पुढील काळात ‘युरोपातील भारतीय स्वातंत्र्याची बर्लिन कमिटी’ असे झाले. कमिटीच्या स्थापनेत बरकतुल्ला यांच्यासोबत राजा महेंद्र वर्मा, सी. एन. पिल्लाई, डॉ. हाफिज मन्सूर, अब्दुल वाहिद, डी. के. सरकार, भूपेंद्रनाथ दत्त  आणि इतरांचा सहभाग होता.

          पाहिल्या महायुद्धाचा फायदा घेवून गदर क्रांतिकारींनी काबुल येथे भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. राजा महेंद्र वर्मा हे अध्यक्ष झाले तर मौलवी बरकतुल्ला आणि मौलवी ओबुदुल्ला सिंधी हे अनुक्रमे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री झाले. परंतु फितुरीमुळे सशस्त्र क्रांतीची योजना फसली आणि गदर पक्षाचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले. काहींना फाशी झाली तर काहींना अंदमानमध्ये जन्मठेप भोगावी लागली. अफगाणीस्थानातील हंगामी सरकारचा प्रयत्न फसल्यानंतर बरकतुल्लांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे चालवलेले प्रयत्न थांबविले नाहीत.. दरम्यानच्या काळात त्यांनी तुर्कस्थान, इजिप्त, अरेबिया इकडे जावून साम्राज्यवाद विरोधी प्रचार केला आणि सकल इस्लामवादाची मांडणी केली. १९१७ मध्ये रशियामध्ये क्रांती झाल्यामुळे जगभर क्रांतिकारी मंडळींसाठी महत्वाचा संदेश गेला. बरकतुल्ला, राजा महेंद्र वर्मा आणि इतरांसोबत मास्कोमध्ये रशियन क्रांतीचा नेता लेनिन यांना भेटले. त्या भेटीत बरकतुल्ला लेनिनच्या विचारांनी प्रभावित झाले असे म्हटले जाते. कारण, बरकतुल्ला यांनी तुर्किश भाषेत ‘बोल्शेव्हीझम’ चा मुस्लिमांमध्ये प्रसार व्हावा म्हणून एक पत्रक काढले होते.

       १९२२ मध्ये बरकतुल्ला गंभीर आजारी पडले. त्यामुळे राजा महेंद्र वर्मा त्यांना घेवून जर्मनीला गेले. तेथे त्यांची प्रकृती सुधारली. १९२३ मध्ये स्वित्झरलँडमध्ये पाहिल्या महायुद्धातील विजेत्या राष्ट्रांची बैठक होती. त्यावेळी तुर्की आणि अरब लोकांमध्ये मैत्री व्हावी यासाठी तिकडे गेले होते. त्यांनी अरब राष्ट्रांतील लोकांच्या काही बैठका त्यावेळी आयोजित केल्या होत्या. १९२८ मध्ये त्यांनी मुस्लीम जगात संदेश पाठवला की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी मक्का आणि मदिना इकडे पाठवा असा संदेश दिला आणि खलिफा ची निवड करा असेही म्हटले. बरकतुल्ला यांचा खलिफा पदाचा पुनरुज्जीवनाचा प्रयत्न हा ब्रिटीश सत्ताधारी लोकांना साम्राज्यविरोधी वाटत होता.  पॅरीसमध्ये बसून त्यांनी हे कार्य चालवले होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारने फ्रेंच सरकारला सांगून त्यांना फ्रांस बाहेर काढले.  याकाळात राष्ट्राच्या विकासाठी काय केले पाहिजे याविषयी त्यांनी लिखाण केले. भारताच्या दयनीय स्थितीवर भाष्य करतांना ते लिहितात की, “"Nations and peoples physical development and spiritual advancement depends upon their economic condition. In countries where bread is available to eat, clothes to wear and houses to people complete the work which they take up. But the people who day and night search for their livelihood had hardly time to think of acquisition of high learning and great arts and sciences. India is the only country where most of its inhabitants are paupers. They have neither access to a full meal nor sufficient clothes to cover themselves, nor a suitable house to live in. There are more than three hundred nawabs and rajas over 300 million people. Apparently they possess every pomp and show, but internally they are hollow. The same is the condition of the Zamindars and traders. After all what expectation can be had of their living together with hungry, naked, homeless people who are unaccountable like ants and insects. They have hardly any moments of respite to think of setting right the condition of their own and their nation.”

            १९२६-२७ याकाळात मौलाना बरकतुल्ला हे जिनेव्हा मध्ये हिंदुस्थान गदर पार्टीचे काम करत होते. १९२७ मध्ये ब्रुसेल येथे झालेल्या ‘ आंतरराष्ट्रीय साम्राज्यवाद विरोधी परिषदे’ला ते उपस्थित होते. ब्रुसेलवरून ते जर्मनीला गेले. गदर पार्टीच्या निमंत्रणामुळे ते जर्मनीवरून सनफ्रान्सिस्को ( अमेरिका) येथे गेले. मौलाना बरकतुल्ला यांची तब्येत खूपच खराब झाल्यामुळे १२ सप्टेंबर १९२७ रोजी अमेरिकेतील सनफ्रान्सिस्को येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या दफनविधीला हिंदू, मुस्लीम आणि शीख असे सर्व धर्मीय मंडळी होती आणि त्या सगळ्यांनी आपापल्या धर्माच्या प्रार्थना म्हटल्या. ऑक्टोबर १९२७ च्या हिंदुस्थान गदर पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकीय मध्ये म्हटले की, “ The loss will not easily be forgotten nor will the gap created soon be filled. Hero’s like Baraktullah are not born every day.” बरकतुल्लांच्या राजकीय कामाची दखल घेत संपादक पुढे लिहितात की, “For thirty five long years – the period of his exile from India – he wandered from place to place as a political refugee, with a price on his head.”  याच लेखात बरकतुल्लांच्या योगदानाची चर्चा करतांना म्हटले गेले की, “ He lived for India; he died for India.” अंजूप एस. धिल्लन यांनी “MAULANA HAS COME AND GONE”  या लेखात बरकतुल्ला यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यात ते म्हणतात की, “ In the eyes of British government Maulana was a rebel, “ a dangerous person,” but for Indians, he is a national hero, a martyr, whose glory will grow when Indians learn more about the life of this hoary Indian sage.”

          इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, अफनिस्थान, रशिया, तुर्कस्थान, इजिप्त, अरेबिया  फ्रान्स, स्वित्झरलँड अशा देशांमध्ये सातत्याने साम्राज्यवाद विरोधी कारवाया करण्यासाठी मौलाना बरकतुल्ला भटकंती करत राहिले. सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यांचा मिश्रण असलेली त्यांची दृष्टी आजकालच्या झापडबंद लोकांना कळणे सोपी नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्राज्यवाद विरोधासाठी धार्मिक, प्रादेशिक आणि वैचारिक क्षेत्रात अनेक घुसळणी झाल्या होत्या आणि त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्या विचारधारांचा प्रभाव लोकांवर दिसतो.

 

 

            

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !

 


          वासाहतिक काळामध्ये एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तर दुसरीकडे आधुनिक भारताची वैचारिक जडणघडण आणि बांधणी चालू होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या विचारांची मंडळी कॉंग्रेसच्या छत्राखाली जशी एकत्र होती तशीच कॉंग्रेसच्या वर्तुळाला बाहेरही कार्यरत होती. वेगवेगळ्या कल्पना आणि अनेकप्रकारचे स्वप्ने घेवून आधुनिक भारताच्या निर्मितीचा प्रकल्प चालू होतो. या प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या दृष्ट्या नेत्यांमध्ये आचार्य नरेंद्र देव यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे. कारण, स्वातंत्र्योत्तर भारतात सत्ताधारी कॉंग्रेस सरकारला जनतेच्या प्रश्नांवरून कोंडीत पकडणाऱ्या  विरोधकांमधील समाजवादी पक्षांची सैद्धांतिक आचार्य देवांनी विकसित केली होती. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांना स्वातंत्र्योत्तर काळात जशी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली तशी त्यांचे पूर्वसुरी आणि मार्गदर्शक असलेल्या आचार्य देवांना मिळालेली दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना जास्त आयुष्य लाभले नाही हे त्यातील एक कारण आहे. परंतु,  सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आचार्य नरेंद्र देव यांचा विविधांगी आणि बौद्धिक वारसा चालवणारी लोक पुढील काळात नाहीशी झाली. एकाचवेळी मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य असलेल्या नरेंद्र  देवांचा वैचारिक वारसा चालवणे नंतरच्या लोकांना थोडेसे कठीण झालेले दिसते. 

बालपण आणि शिक्षण!

          उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये आचार्य नरेंद्र देवांचा जन्म दिनांक ३० ऑक्टोबर १८८९ रोजी झाला. काहीवेळा ३१ ऑक्टोबर असाही उल्लेख येतो. त्यांचे वडील बलदेव प्रसाद हे पेशाने वकील होते. तसेच, कॉंग्रेसचे सदस्य सुद्धा होते. फैजाबादमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर अलाहाबादमधील मीर सेन्ट्रल कॉलेजमध्ये पदवी शिक्षण (१९०८-११) घेतले आणि बनारसमधील क्वीन्स कॉलेजमध्ये पुराततत्वशास्त्रात पदवीत्तर शिक्षण (१९११-१९१३) घेतले. पुरातत्वशास्त्रामध्ये रुची निर्माण झाल्यावर त्यांना त्यातच काम करायचे होते परंतू जागा नसल्यामुळे त्यांना पुढे कायद्याची पदवी घेवून १९२१ पर्यंत वकिली व्यवसाय करावा लागला. १९२१ मध्ये काशी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर नरेंद्र देव तिकडे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काशी विद्यापीठातइतिहास, पुरातत्वशास्त्र, धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृती अभ्यासाठी प्रसिद्ध  असतांनाच ते भाषातज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले कारण त्यांना पाली, फ्रेंच, संस्कृत, पर्शियन, जर्मन, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये गती आणि रस होता. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य नरेंद्र देव अनुक्रमे लखनऊ विद्यापीठ (१९४७-१९५१) आणि बनारस हिंदू विद्यापीठ (१९५२-५४) कुलगुरू होते.

स्वातंत्र्य चळवळ, समाजवाद आणि आचार्य देव

         आचार्य नरेंद्र देवांचे वडीलच कॉंग्रेसचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या घरी काँग्रेसी नेत्यांची उठबैस होती. पंडित मदनमोहन मालवीय हे त्यांच्या घरी येत असत.  १८९९ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी नरेद्र देवांनी कॉंग्रेसचे लखनऊ अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल आणि गोपालकृष्ण गोखले यांच्यासारख्या कॉंग्रेस नेत्यांना ऐकता आले. १९१५ मधील गदर आंदोलनातील क्रांतिकारी नेते लाला हरदयाळ यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता.  आर्य समाजाची पार्श्वभूमी असलेल्या लाला हरदयाळ यांनी बौद्ध तत्वज्ञानात पीएचडी केली होती. तसेच, त्यांच्यावर मार्क्सवादाचाही प्रभाव होता. हरदयाळांनी ‘महर्षी कार्ल मार्क्स’ असा ग्रंथ लिहिलेला आहे. बौद्ध धर्म अभ्यासाचा आणि मार्क्सवाद प्रभावाचा वैचारिक वारसा आचार्य नरेंद्र देवांना लाला हरदयाळ यांच्याकडून मिळालेला असू शकतो. कारण, देवांवर त्यांचा प्रभाव होता आणि  आचार्य नरेंद्र देव स्वतःला मार्क्सवादी म्हणून घेत होते आणि बौद्ध धर्माचे ते अभ्यासक होतेच.

        रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाल्यावर त्यांनी मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि तत्कालीन महत्वाच्या मार्क्सवादी लोकांच्या साहित्याचा अभ्यास केला. ते पक्के मार्क्सवादी झाले होते पण तरीही त्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी’त सहभाग घेतलेला नव्हता. १९२६ मध्ये स्वामी संपूर्णानंद यांच्यासमवेत तयार केलेला आचार्य नरेंद्र देवांचा  ‘समाजवादी शेती कार्यक्रम’  १९२९ च्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने मान्य केला. १९३१ च्या कराची अधिवेशनात पंडित नेहरूंनी समाजवादी पद्धतीचा विकासाचा आराखडा हे कॉंग्रेसचे ध्येय आहे मांडले आणि त्याचे मूळ ही १९२९ च्या समाजवादी शेती कार्यक्रमात असे म्हटले. कॉंग्रेसचा कल डावीकडे म्हणजे समाजवादाकडे झुकतो आहे असे दिसताच कॉंग्रेसमधील जमीनदार, भांडवलदार आणि सनातनी मंडळीनी आपली मोर्चेबांधणी केली. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये वैचारिक वाद आणि प्रश्न उद्भवू लागले. १९३३ मध्ये कॉंग्रेस अंतर्गत टिळकवादी मंडळीनी  महाराष्ट्रात ‘लोकशाही स्वराज्य पक्ष’ स्थापन केला  आणि १९३४ मध्ये उत्तरप्रदेश आणि सयुंक्त प्रांतात मालवीय, अणे यांनी कॉंग्रेसअंतर्गतच ‘कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्ष’ स्थापन केला.  

          कॉंग्रेसमधील उजवी आणि जमीनदार-भांडवलदार समर्थक मंडळी संघटीत होवून कॉंग्रेसवर वर्चस्व निर्माण करू पाहत होती आणि समाजवादी आणि मार्क्सवादी मंडळींना वेगळे पाडू पाहत होती. म्हणून कॉंग्रेसमधील वेगवेगळ्या प्रकारची समाजवादी मंडळी सुद्धा एकत्रित झाली आणि त्यातून १९३४ मध्ये पटना शहरात कॉंग्रेसअंतर्गत ‘कॉंग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना करण्यात आली.  कॉंग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापना अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य नरेंद्र देव होते आणि सभासदांमध्ये देशभरातील लोकांचा सहभाग होता. उदा. जयप्रकाश नारायण, रामविरकश बेनिपुरी, मिनू मसानी, कमलादेवी चटोपाद्धाय,राममनोहर लोहिया, युसुफ मेहेरअली, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद, अच्युत पटवर्धन. कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये  जयप्रकाश नारायण, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारखे मार्क्सवादी समाजवादी, मिनू मसानी आणि अशोक मेहता सारखे फेबियन समाजवादी आणि अच्युत पटवर्धन आणि राम मनोहर लोहिया यांच्यासारखे   गांधीवादी समाजवादी आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासारखे क्रांतिकारी लोक होते. या सगळ्यांमध्ये काही वैचारिक मतभेद होते पण या सगळ्या प्रवाहांना कॉंग्रेस समजवादी पक्षात बांधून ठेवण्याची बौद्धिक कसरत आणि वैचारिक ताकत आचार्य नरेंद्र देव करत होते कारण, त्यांच्याकडे वरील सगळ्या वैचारिक गटांमध्ये सन्मानाने पाहिले जात होते.

       १९३० च्या दशकात  जर्मनी आणि इटली या देशांमध्ये फासीवाद फोफावत होता. तसेच, १९३७ मध्ये लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात लष्कराने उठाव केला होता. त्यामुळे जगभरातील तरुण स्पेनमधील गृहयुद्धात सहभागी होत होते. अशावेळी भारतात  फासीवाद विरोधी  कॉंग्रेस समाजवादी पक्ष (CSP) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) यांची संयुक्त आघाडी घडवण्यामध्येही आचार्य नरेंद्र देव यांची महत्वाची भूमिका होती. १९३६ मध्ये आचार्य उत्तरप्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष झाले. १९३७ च्या प्रांतिक निवडणुकींमध्ये उत्तरप्रदेशात कॉग्रेसला यश मिळाले. त्यामध्ये आचार्य देवांचा मोठा वाटा होता असे म्हटले जाते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात आचार्य नरेंद्र देवांना अटक करण्यात आली. त्यांना अहमदनगर जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी पंडित नेहरू, मौलाना आझादही तेथेच होते. अहमदनगरमध्येच नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, आझादांनी ‘गुबर-ए-खातीर’ लिहिले आणि आचार्य नरेंद्र देवांनी बौद्ध दार्शनिक वसुबंधूच्या अभिधर्म कोश या ग्रंथाच्या १० फ्रेंच खंडांचे हिंदीत भाषांतर पूर्ण केले. त्यामुळेच श्रीप्रकाश म्हणतात की, ‘ भारतीय राजकारणात बौद्ध धर्माला आणण्याचे आणि नेहरूंवर बौद्ध विचारांचा प्रभाव पाडण्याचे श्रेय आचार्य नरेंद्र देवांना जाते.’

 आचार्या नरेंद्र देवांच्या राजकारणाचा व जीवनाचा शेवट

            १९४६ च्या घटना समितीच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला लोकांचा मोठा पाठींबा मिळाला. त्यामुळे देशभरात केंद्रात आणि प्रांतांमध्ये कॉंग्रेसची सरकारे स्थापन झाली. सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवरून कॉंग्रेसमध्ये मतभेद उत्पन्न होवू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळातील वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या  लोकांची चळवळ असलेली कॉंग्रेस ही सत्ताधारी पक्ष झाली होती.  सत्तेचे अतिरेकी केंद्रीकरण होत होते. तसेच, सरकारच्या धोरणांवर वचक ठेवण्यासाठी आणि लोकशाही शासनव्यवस्थेच्या यशस्वितेसाठी विरोधी पक्षांची गरज होती.  अशा काळांत सरकारी धोरणांच्या मतभेदांवरून कॉंग्रेस समाजवादी पक्ष कॉंग्रेसमधून बाहेर पडला आणि १९४८ साली ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. तत्पूर्वी आचार्य नरेंद्र देव हे १९४६ च्या निवडणुकींमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी कोणी मागितला नसतांना मूल्यांसाठी आमदारकीचा राज्यानामा दिला. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून आचार्य देव उमेदवार असतांना कॉंग्रेसने बाबा राघव दास नामक एका संन्याशी व्यक्तीला तिकीट दिले.  निवडणूक प्रचारात बाबाने आणि कॉंग्रेसने आचार्य देवांना ‘नास्तिक’, ‘कम्युनिस्ट’ आणि अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याचा शत्रू म्हणून रंगविले. त्यामुळे आचार्य नरेंद्र देवांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. लोकशाही व्यवस्थेत सरकारइतकाच विरोधीपक्ष महत्वाचा असतो कारण, सत्ताधारी पक्षावर जर विरोधी पक्षाचा वचक नसला तर सत्ताधारी लोक हुकुमशहा होवू शकतात ही जाणीव असल्यामुळे कॉंग्रेसला प्रबळ विरोधी पक्ष असावा यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्यातून १९५२ मध्ये समाजवादी पक्ष आणि कृषक मजदूर प्रजा पक्ष यांचे एकीकरण झाले आणि त्यातून प्रजा समाजवादी पक्षाची निर्मिती झाली. याकाळात आचार्य नरेंद्र देव शैक्षणिक चळवळीमध्ये कुलगुरू म्हणून महत्वाचे कामे करत होते. तसेच, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते म्हणूनही काम करत होते.

          १९ फेब्रुवारी १९५६ रोजी आचार्य नरेंद्र देव यांचे आजारपणामुळे निधन झाले. १९५६ आधुनिक बौद्ध चळवळीच्या निमित्ताने महत्वाचे वर्ष आहे. प्रधानमंत्री नेहरू यांनी सरकारी पाठींब्याने बौद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती. कारण, यावर्षी तथागत सिद्धार्थ बुद्धाच्या धर्मचक्र परिवर्तनाला अडीच हजार वर्ष पूर्ण झाली होती. याचवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. आचार्य देव काही महिने अजून जगले असते तर त्यांनी दोन्ही कार्यक्रम पाहिले असते. दोन्ही कार्यक्रमांमुळे त्यांच्यातील बौद्ध अभ्यासकाला निश्चितच आनंद झाला असता. कारण, सक्रीय राजकारण करत असतांनाही त्यांनी कधीच बौद्धधर्म आणि तत्वज्ञान अभ्यासात त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. त्यांचा  ‘बौद्धधर्मदर्शन’ नामक ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे एवढा महत्वाचा आहे.

आचार्य नरेंद्र देव आणि आजची समकालीन स्थिती!

         आजच्या काळात आचार्य देवांच्या वैचारिक वारश्याची आणि बौद्धिक परंपरेची अत्यंत गरज आहे. तसेच, त्यांची सामाजिक, राजकीय आणि नैतिक दृष्टीही आजच्या काळात आपणास मार्गदर्शक ठरू शकते. वेगवेगळ्या विचार परंपरेची नेहमी संवाद ठेवणे आणि सामाजिक, आर्थिक समतेसाठी आणि कष्टकरी, शेतकरी लोकांसाठी सातत्याने संघर्ष आणि अभ्यास करत राहणे हाच धडा आपणास त्यांच्या जीवनातून मिळतो. त्यासाठी लोकशाही शासनव्यवस्थेत विरोधी पक्ष आणि चळवळ मजबूत असली तरच लोकशाही मजबूत आणि शाबूत असू शकते म्हणून विरोधी पक्ष आणि चळवळ सशक्त आणि प्रबळ केली पाहिजे.  आचार्य नरेद्र देव म्हणतात, ‘ आर्थिक समतावाद आणि लोकशाही व्यक्तिवाद यांच्या एकत्रित येण्यानेच जातीव्यवस्था आधारित सामाजिक रचना नष्ट होईल.’ आजही आचार्य नरेंद्र देव यांचा हा विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे.


पूर्वप्रसिद्धी- असंतोष वेबपोर्टल 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...