गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !

 


          वासाहतिक काळामध्ये एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तर दुसरीकडे आधुनिक भारताची वैचारिक जडणघडण आणि बांधणी चालू होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या विचारांची मंडळी कॉंग्रेसच्या छत्राखाली जशी एकत्र होती तशीच कॉंग्रेसच्या वर्तुळाला बाहेरही कार्यरत होती. वेगवेगळ्या कल्पना आणि अनेकप्रकारचे स्वप्ने घेवून आधुनिक भारताच्या निर्मितीचा प्रकल्प चालू होतो. या प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या दृष्ट्या नेत्यांमध्ये आचार्य नरेंद्र देव यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे. कारण, स्वातंत्र्योत्तर भारतात सत्ताधारी कॉंग्रेस सरकारला जनतेच्या प्रश्नांवरून कोंडीत पकडणाऱ्या  विरोधकांमधील समाजवादी पक्षांची सैद्धांतिक आचार्य देवांनी विकसित केली होती. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांना स्वातंत्र्योत्तर काळात जशी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली तशी त्यांचे पूर्वसुरी आणि मार्गदर्शक असलेल्या आचार्य देवांना मिळालेली दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना जास्त आयुष्य लाभले नाही हे त्यातील एक कारण आहे. परंतु,  सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आचार्य नरेंद्र देव यांचा विविधांगी आणि बौद्धिक वारसा चालवणारी लोक पुढील काळात नाहीशी झाली. एकाचवेळी मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य असलेल्या नरेंद्र  देवांचा वैचारिक वारसा चालवणे नंतरच्या लोकांना थोडेसे कठीण झालेले दिसते. 

बालपण आणि शिक्षण!

          उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये आचार्य नरेंद्र देवांचा जन्म दिनांक ३० ऑक्टोबर १८८९ रोजी झाला. काहीवेळा ३१ ऑक्टोबर असाही उल्लेख येतो. त्यांचे वडील बलदेव प्रसाद हे पेशाने वकील होते. तसेच, कॉंग्रेसचे सदस्य सुद्धा होते. फैजाबादमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर अलाहाबादमधील मीर सेन्ट्रल कॉलेजमध्ये पदवी शिक्षण (१९०८-११) घेतले आणि बनारसमधील क्वीन्स कॉलेजमध्ये पुराततत्वशास्त्रात पदवीत्तर शिक्षण (१९११-१९१३) घेतले. पुरातत्वशास्त्रामध्ये रुची निर्माण झाल्यावर त्यांना त्यातच काम करायचे होते परंतू जागा नसल्यामुळे त्यांना पुढे कायद्याची पदवी घेवून १९२१ पर्यंत वकिली व्यवसाय करावा लागला. १९२१ मध्ये काशी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर नरेंद्र देव तिकडे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काशी विद्यापीठातइतिहास, पुरातत्वशास्त्र, धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृती अभ्यासाठी प्रसिद्ध  असतांनाच ते भाषातज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले कारण त्यांना पाली, फ्रेंच, संस्कृत, पर्शियन, जर्मन, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये गती आणि रस होता. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य नरेंद्र देव अनुक्रमे लखनऊ विद्यापीठ (१९४७-१९५१) आणि बनारस हिंदू विद्यापीठ (१९५२-५४) कुलगुरू होते.

स्वातंत्र्य चळवळ, समाजवाद आणि आचार्य देव

         आचार्य नरेंद्र देवांचे वडीलच कॉंग्रेसचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या घरी काँग्रेसी नेत्यांची उठबैस होती. पंडित मदनमोहन मालवीय हे त्यांच्या घरी येत असत.  १८९९ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी नरेद्र देवांनी कॉंग्रेसचे लखनऊ अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल आणि गोपालकृष्ण गोखले यांच्यासारख्या कॉंग्रेस नेत्यांना ऐकता आले. १९१५ मधील गदर आंदोलनातील क्रांतिकारी नेते लाला हरदयाळ यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता.  आर्य समाजाची पार्श्वभूमी असलेल्या लाला हरदयाळ यांनी बौद्ध तत्वज्ञानात पीएचडी केली होती. तसेच, त्यांच्यावर मार्क्सवादाचाही प्रभाव होता. हरदयाळांनी ‘महर्षी कार्ल मार्क्स’ असा ग्रंथ लिहिलेला आहे. बौद्ध धर्म अभ्यासाचा आणि मार्क्सवाद प्रभावाचा वैचारिक वारसा आचार्य नरेंद्र देवांना लाला हरदयाळ यांच्याकडून मिळालेला असू शकतो. कारण, देवांवर त्यांचा प्रभाव होता आणि  आचार्य नरेंद्र देव स्वतःला मार्क्सवादी म्हणून घेत होते आणि बौद्ध धर्माचे ते अभ्यासक होतेच.

        रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाल्यावर त्यांनी मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि तत्कालीन महत्वाच्या मार्क्सवादी लोकांच्या साहित्याचा अभ्यास केला. ते पक्के मार्क्सवादी झाले होते पण तरीही त्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी’त सहभाग घेतलेला नव्हता. १९२६ मध्ये स्वामी संपूर्णानंद यांच्यासमवेत तयार केलेला आचार्य नरेंद्र देवांचा  ‘समाजवादी शेती कार्यक्रम’  १९२९ च्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने मान्य केला. १९३१ च्या कराची अधिवेशनात पंडित नेहरूंनी समाजवादी पद्धतीचा विकासाचा आराखडा हे कॉंग्रेसचे ध्येय आहे मांडले आणि त्याचे मूळ ही १९२९ च्या समाजवादी शेती कार्यक्रमात असे म्हटले. कॉंग्रेसचा कल डावीकडे म्हणजे समाजवादाकडे झुकतो आहे असे दिसताच कॉंग्रेसमधील जमीनदार, भांडवलदार आणि सनातनी मंडळीनी आपली मोर्चेबांधणी केली. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये वैचारिक वाद आणि प्रश्न उद्भवू लागले. १९३३ मध्ये कॉंग्रेस अंतर्गत टिळकवादी मंडळीनी  महाराष्ट्रात ‘लोकशाही स्वराज्य पक्ष’ स्थापन केला  आणि १९३४ मध्ये उत्तरप्रदेश आणि सयुंक्त प्रांतात मालवीय, अणे यांनी कॉंग्रेसअंतर्गतच ‘कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्ष’ स्थापन केला.  

          कॉंग्रेसमधील उजवी आणि जमीनदार-भांडवलदार समर्थक मंडळी संघटीत होवून कॉंग्रेसवर वर्चस्व निर्माण करू पाहत होती आणि समाजवादी आणि मार्क्सवादी मंडळींना वेगळे पाडू पाहत होती. म्हणून कॉंग्रेसमधील वेगवेगळ्या प्रकारची समाजवादी मंडळी सुद्धा एकत्रित झाली आणि त्यातून १९३४ मध्ये पटना शहरात कॉंग्रेसअंतर्गत ‘कॉंग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना करण्यात आली.  कॉंग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापना अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य नरेंद्र देव होते आणि सभासदांमध्ये देशभरातील लोकांचा सहभाग होता. उदा. जयप्रकाश नारायण, रामविरकश बेनिपुरी, मिनू मसानी, कमलादेवी चटोपाद्धाय,राममनोहर लोहिया, युसुफ मेहेरअली, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद, अच्युत पटवर्धन. कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये  जयप्रकाश नारायण, ई. एम. एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारखे मार्क्सवादी समाजवादी, मिनू मसानी आणि अशोक मेहता सारखे फेबियन समाजवादी आणि अच्युत पटवर्धन आणि राम मनोहर लोहिया यांच्यासारखे   गांधीवादी समाजवादी आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासारखे क्रांतिकारी लोक होते. या सगळ्यांमध्ये काही वैचारिक मतभेद होते पण या सगळ्या प्रवाहांना कॉंग्रेस समजवादी पक्षात बांधून ठेवण्याची बौद्धिक कसरत आणि वैचारिक ताकत आचार्य नरेंद्र देव करत होते कारण, त्यांच्याकडे वरील सगळ्या वैचारिक गटांमध्ये सन्मानाने पाहिले जात होते.

       १९३० च्या दशकात  जर्मनी आणि इटली या देशांमध्ये फासीवाद फोफावत होता. तसेच, १९३७ मध्ये लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात लष्कराने उठाव केला होता. त्यामुळे जगभरातील तरुण स्पेनमधील गृहयुद्धात सहभागी होत होते. अशावेळी भारतात  फासीवाद विरोधी  कॉंग्रेस समाजवादी पक्ष (CSP) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) यांची संयुक्त आघाडी घडवण्यामध्येही आचार्य नरेंद्र देव यांची महत्वाची भूमिका होती. १९३६ मध्ये आचार्य उत्तरप्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष झाले. १९३७ च्या प्रांतिक निवडणुकींमध्ये उत्तरप्रदेशात कॉग्रेसला यश मिळाले. त्यामध्ये आचार्य देवांचा मोठा वाटा होता असे म्हटले जाते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात आचार्य नरेंद्र देवांना अटक करण्यात आली. त्यांना अहमदनगर जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी पंडित नेहरू, मौलाना आझादही तेथेच होते. अहमदनगरमध्येच नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, आझादांनी ‘गुबर-ए-खातीर’ लिहिले आणि आचार्य नरेंद्र देवांनी बौद्ध दार्शनिक वसुबंधूच्या अभिधर्म कोश या ग्रंथाच्या १० फ्रेंच खंडांचे हिंदीत भाषांतर पूर्ण केले. त्यामुळेच श्रीप्रकाश म्हणतात की, ‘ भारतीय राजकारणात बौद्ध धर्माला आणण्याचे आणि नेहरूंवर बौद्ध विचारांचा प्रभाव पाडण्याचे श्रेय आचार्य नरेंद्र देवांना जाते.’

 आचार्या नरेंद्र देवांच्या राजकारणाचा व जीवनाचा शेवट

            १९४६ च्या घटना समितीच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला लोकांचा मोठा पाठींबा मिळाला. त्यामुळे देशभरात केंद्रात आणि प्रांतांमध्ये कॉंग्रेसची सरकारे स्थापन झाली. सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवरून कॉंग्रेसमध्ये मतभेद उत्पन्न होवू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळातील वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या  लोकांची चळवळ असलेली कॉंग्रेस ही सत्ताधारी पक्ष झाली होती.  सत्तेचे अतिरेकी केंद्रीकरण होत होते. तसेच, सरकारच्या धोरणांवर वचक ठेवण्यासाठी आणि लोकशाही शासनव्यवस्थेच्या यशस्वितेसाठी विरोधी पक्षांची गरज होती.  अशा काळांत सरकारी धोरणांच्या मतभेदांवरून कॉंग्रेस समाजवादी पक्ष कॉंग्रेसमधून बाहेर पडला आणि १९४८ साली ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. तत्पूर्वी आचार्य नरेंद्र देव हे १९४६ च्या निवडणुकींमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी कोणी मागितला नसतांना मूल्यांसाठी आमदारकीचा राज्यानामा दिला. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून आचार्य देव उमेदवार असतांना कॉंग्रेसने बाबा राघव दास नामक एका संन्याशी व्यक्तीला तिकीट दिले.  निवडणूक प्रचारात बाबाने आणि कॉंग्रेसने आचार्य देवांना ‘नास्तिक’, ‘कम्युनिस्ट’ आणि अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याचा शत्रू म्हणून रंगविले. त्यामुळे आचार्य नरेंद्र देवांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. लोकशाही व्यवस्थेत सरकारइतकाच विरोधीपक्ष महत्वाचा असतो कारण, सत्ताधारी पक्षावर जर विरोधी पक्षाचा वचक नसला तर सत्ताधारी लोक हुकुमशहा होवू शकतात ही जाणीव असल्यामुळे कॉंग्रेसला प्रबळ विरोधी पक्ष असावा यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्यातून १९५२ मध्ये समाजवादी पक्ष आणि कृषक मजदूर प्रजा पक्ष यांचे एकीकरण झाले आणि त्यातून प्रजा समाजवादी पक्षाची निर्मिती झाली. याकाळात आचार्य नरेंद्र देव शैक्षणिक चळवळीमध्ये कुलगुरू म्हणून महत्वाचे कामे करत होते. तसेच, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते म्हणूनही काम करत होते.

          १९ फेब्रुवारी १९५६ रोजी आचार्य नरेंद्र देव यांचे आजारपणामुळे निधन झाले. १९५६ आधुनिक बौद्ध चळवळीच्या निमित्ताने महत्वाचे वर्ष आहे. प्रधानमंत्री नेहरू यांनी सरकारी पाठींब्याने बौद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती. कारण, यावर्षी तथागत सिद्धार्थ बुद्धाच्या धर्मचक्र परिवर्तनाला अडीच हजार वर्ष पूर्ण झाली होती. याचवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. आचार्य देव काही महिने अजून जगले असते तर त्यांनी दोन्ही कार्यक्रम पाहिले असते. दोन्ही कार्यक्रमांमुळे त्यांच्यातील बौद्ध अभ्यासकाला निश्चितच आनंद झाला असता. कारण, सक्रीय राजकारण करत असतांनाही त्यांनी कधीच बौद्धधर्म आणि तत्वज्ञान अभ्यासात त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. त्यांचा  ‘बौद्धधर्मदर्शन’ नामक ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे एवढा महत्वाचा आहे.

आचार्य नरेंद्र देव आणि आजची समकालीन स्थिती!

         आजच्या काळात आचार्य देवांच्या वैचारिक वारश्याची आणि बौद्धिक परंपरेची अत्यंत गरज आहे. तसेच, त्यांची सामाजिक, राजकीय आणि नैतिक दृष्टीही आजच्या काळात आपणास मार्गदर्शक ठरू शकते. वेगवेगळ्या विचार परंपरेची नेहमी संवाद ठेवणे आणि सामाजिक, आर्थिक समतेसाठी आणि कष्टकरी, शेतकरी लोकांसाठी सातत्याने संघर्ष आणि अभ्यास करत राहणे हाच धडा आपणास त्यांच्या जीवनातून मिळतो. त्यासाठी लोकशाही शासनव्यवस्थेत विरोधी पक्ष आणि चळवळ मजबूत असली तरच लोकशाही मजबूत आणि शाबूत असू शकते म्हणून विरोधी पक्ष आणि चळवळ सशक्त आणि प्रबळ केली पाहिजे.  आचार्य नरेद्र देव म्हणतात, ‘ आर्थिक समतावाद आणि लोकशाही व्यक्तिवाद यांच्या एकत्रित येण्यानेच जातीव्यवस्था आधारित सामाजिक रचना नष्ट होईल.’ आजही आचार्य नरेंद्र देव यांचा हा विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे.


पूर्वप्रसिद्धी- असंतोष वेबपोर्टल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...