ज्ञान आणि कौशल्ये यांना सोईस्करपणे वेगवेगळे केले गेल्यामुळे ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातून अनेकांना वगळले गेले असा आपला दिर्घकालीन इतिहास आहे. त्यामुळे ज्ञानावर 'विशिष्टां'ची मक्तेदारी बनते आणि 'सामान्यजन' त्यापासून वेगळे पडतात किंबहुना पाडले जात. उदा. कुणब्यांनी रुमणे धरणे हेच त्याचे वर्तुळ बनते. आपल्याकडील अलीकडच्या किंवा नजीकच्या इतिहासतही 'सर्वसामान्य' ज्ञानवर्तुळापाशी भटकतही नव्हते.
काळाच्या ओघात विद्यापीठे, कॉलेज स्थापन झाली त्यातही परंपरेने सांस्कृतिक, कौटुंबिक आणि सामाजिक भांडवल असलेली 'विशिष्ट मंडळी'च विद्यापीठे आणि कॉलेजांत येवू शकली. पुढे, सत्तेच्या गरजेपोटी, बाजाराच्या निकडेपोटी आणि खालून वाढणाऱ्या दबावामुळे विद्यापीठे आणि कॉलेजांतील वातावरण आणि प्रवेशप्रक्रिया थोडी सैल होवून मोकळी झाली. त्यामुळे अनेकांनी प्रवेश मिळवला.
नव्याने प्रवेशित झालेल्या मंडळींमुळे वेगवेगळ्या समूहांना प्रतिनिधित्व मोजक्या प्रमाणात का होईना पण मिळाले. त्यामुळे काहीसे लोकशाहीकरण झाले असे म्हणता येते. नव्याने आलेली मंडळी आपल्या अनुभवविश्वासोबत आणि आपल्या प्रश्नांसोबत आलेली असल्यामुळे ते प्रश्न विचारु लागतात. जुन्या मान्यतांना प्रश्नांकित करु लागतात. अशावेळी ज्ञानावरील मक्तेदारी असलेली 'विशिष्ट मंडळी'मधील काही मंडळी स्वतःला दुरुस्तकरुन घेतात आणि काही मंडळी जुनाच रेटा लावून धरतात मग, ज्ञानशाखांमध्ये वैचारिक धुमचक्री, घुसळण आणि झगडा सुरू होतो.
'ज्ञानाची मक्तेदारी' आणि 'सामाजिक धुरिणत्व' ह्यांचा अत्यंत जवळचा संबध असल्यामुळे ह्या 'सांस्कृतिक राजकारणा'चाही संदर्भ असतो. अशावेळी सजगपणे, संवादीपणे पण तेवढ्याच चिकित्सकपणे वादविवाद झाले पाहिजे. नाहीतर वादविवादांची दिशा भरकटते. पारंपरिक मंडळी नव्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंडळींना काहीवेळा सामाजिक आणि ज्ञानात्मक दंभामुळे क्षुल्लक समजते. त्यांच्यातील ह्या दंभाला मोठ्या सामाजिक-सांस्कृतिक भांडवलाचा आधार असतो. तसेच, नव्याने प्रश्न विचारणारी मंडळी विशिष्टांच्या पारंपरिक मक्तेदारीमुळे नेहमी त्याला कारस्थान स्वरूपात पाहतात. त्यामुळे त्यांचा प्रश्न कितीही महत्वाचा असलातरी पारंपरिक विशिष्टांना तेच कारस्थानी वाटतात.
आपल्याकडे शैक्षणिक समाजशास्त्राचा म्हणजे विद्यापीठ शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आणि विषयांचा 'सोशयो-हिस्टॉरीकल अभ्यास' केला तर शिक्षण घेणाऱ्या आणि देणार्या विद्यार्थी - शिक्षकांचे समाजशास्त्र टप्याटप्याने कसे बदलत गेले हे आपण सहज सांगू शकतो. ह्या बदलत्या समाजशास्त्रामुळे विषयांचे आशय, स्वरूप, अभ्यासपध्दती आणि अभ्यासक्रमही बदलले दिसतात. बदलणारे राजकारण आणि अर्थकारण ह्यांचाही ह्या बदलात तेवढाच मोठा सहभाग आहे.
अजूनही काही विषय, काही संस्था ह्या विशिष्टांच्या मुठीत आहेत किंवा विशिष्टच तिकडे मुशाफिरी करता असेही आपण म्हणू शकतो. तिकडे सर्वसामान्य गेल्यामुळे प्रश्न निर्माण होतात. वैचारिक वाद आणि घुसळण होती. तसेही, सामाजिक-सांस्कृतिक धुरिणत्वाला धक्का बसला की, राजकीय रचनेलाही धक्का बसतो. त्यामुळे ह्या क्षेत्रातील वादविवाद महत्वाचे ठरतात. त्यांना अस्मितावादी राजकारणाचा आणि वैचारिक राजकारणाचा (आपल्याकडे जातीय राजकारणाचा ) संदर्भ नेहमी असतोच.
म्हणून, ज्ञानशाखांचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. इहवादीकरण झाले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे सदरील विषयांचे प्रोफेशनल मुल्ये जपली पाहीजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा