१) माझ्या एका कश्मिरी मुस्लिम मित्राला सांगलीतील एका मराठी मुस्लिम मित्राच्या घरी घेवून गेलो होतो. सांगलीतील मित्राचे भावाचे लग्न होते. कश्मिरी मुस्लिम मित्राला विश्वासच बसत नव्हता की, हे मुस्लीमांचे लग्न आहे.
२) पुण्यात आमच्या एका देशस्थ ब्राह्मण मित्राचे आंतरजातीय लग्न होते. त्यात नवरदेव असलेल्या आमच्या मित्राचे आई-वडील आणि नातेवाईक मराठवाड्यातून आले होते. त्याच लग्नात आमचा नवबौध्द मित्रही होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, अरे यार! ही मंडळी ब्राह्मण वाटत नाही. ते आपल्या सारखेच दिसत आहेत.
३) पुण्यात माझा एक मित्र मला म्हणाला की, ती बौध्द नसेल कारण, एवढे काळे लोक बौद्ध नसतात. औरंगाबादमध्येही माझ्या सोबत शिकणारा माझा मराठा मित्र, आमच्या वर्गातील एक अत्यंत सुंदर असलेली मुलगी बौध्द आहे हे ऐकतच नव्हता. तसेच, दुसरीच्या आडनावावरूनच त्याने मराठाच आहे असे ठरवून ठाकले होते.
४) महाराष्ट्रात एका सुन्नी जेष्ठ मित्रवर्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळी, आमच्या अहमदीया जेष्ठ मित्रांविषयी सुन्नी मित्र म्हणाले की,.... वह बहोत अच्छा इंसान है लेकीन, मुसलमान नही है.
५) जापनीजच्या वर्गात एक ब्राह्मण आजीबाई होत्या. जापनीज सून आणि अमेरिकेत जवाई असलेल्या आजीबाई चर्चेत म्हणाल्या की, 'त्यांच्या' रक्तातच हिंसा असते. मी म्हणालो की, रक्तात हिमोग्लोबिन असते. हिंसा असते असा काही अभ्यास झाला आहे का? त्यावर म्हणाल्या की, त्यांच्यात माझे मित्र आहेत.
६) जम्मूत एका डोग्रा मित्राकडे थांबलो होतो. कश्मिरी पंडीत सगळ्यात जास्त कारस्थानी आहेत असे तो म्हणाला. त्याआधीच, त्याने मला भांडवलशाहीमुळे संपूर्ण पर्यावरण आणि मानवता धोक्यात येईल असे सांगितले होते.
७) कश्मिर व्हैलीत जात असतांना शिक्षक असलेला शेख मित्र म्हणाला की, आमच्या पुर्वजांनी सांगितले आहे की, साप, शेर से पहले बकरवाल को मारना चाहिए. मग, मी म्हणालो की, बकरवाल भी तो मुस्लीम है ना.
अशा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आपल्या समाजात आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांची, समुहांची, जातीची, धर्माची 'साचेबध्द प्रतिमा' निर्माण केली जाते. त्यातून भय, द्वेष, तिरस्कार सगळं सहज जन्माला घालता येवू शकते कारण, आपल्याला आपल्या कंपूच्या पलीकडे काही दिसत नाही. आपली दृष्टीसुद्धा झापडबंद असते. झापडे तोडली तर साचेबद्ध प्रतिमेला तडा बसू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा